माहिती आणि प्रसारण मंत्रालय

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मन की बात @100 संदर्भात आयोजित राष्ट्रीय परिषदेचे केले उद्घाटन


मन की बात पूर्णपणे अराजकीय आहे आणि आपल्या संस्‍कृतीचे प्रतिबिंब आहे : उपराष्ट्रपती

2047 मध्ये भारत@100 साठी मन की बात @100 मजबूत पायाभरणी करत आहे: जगदीप धनखड

जागतिक नैराश्याच्या काळात भारत आशेचा किरण : माहिती आणि प्रसारण मंत्री

प्रत्येक महिन्यात प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रम सामान्य लोकांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकणारा तसेच त्यांचे नाव घराघरात पोहचवणारा : अनुराग ठाकूर

Posted On: 26 APR 2023 5:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 एप्रिल 2023

 

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित मन की बात @100 या दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर हे देखील उपस्थितीत होते. संपूर्ण भारतातील 100 कोटी जनतेपर्यंत पोहोचलेल्या, प्रत्येक महिन्यात रेडीओद्वारे प्रसारित होणाऱ्या पंतप्रधानांच्या 'मन की बात' या कार्यक्रमच्या निरंतर प्रसारणयशाचा आनंद अधोरेखित करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.  

2014 हा वर्ष भारतासाठी एक युगप्रवर्तक विकास वर्ष ठरले असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी यावेळी बोलताना सांगितले. या वर्षाने भारताच्या भविष्याला नवा आकार देत प्रगतीच्या मार्गावर आणि न थांबविता येणार्‍या वाढीच्या मार्गावर स्थापित केले, असे ते म्हणाले. आघाड्यांची सरकारे हा भारताच्या विकासातील मोठा अडसर असल्याचे सांगत, 30 वर्षांच्या कालावधीनंतर 2014 मध्ये भारताला एका पक्षाच्या बहुमताच्या सरकारच्या रूपाने संसदेत राजकीय स्थैर्य प्राप्त झाल्याचे आपले निरीक्षण उपराष्ट्रपतींनी नोंदवले. 2014 मध्ये पंतप्रधानांनी मन की बातच्या रूपाने लोकांशी वैयक्तिक संवाद साधण्याचा प्रयोग सुरू केला, असे त्यांनी सांगितले. या प्रयोगाचा आणखी एक परिणाम म्हणजे आतापर्यंत अस्तित्वासाठी लढा देणारे रेडिओ हे संवादाचे माध्यम पुन्हा एकदा आघाडीवर पोहोचले. 

हे मासिक प्रसारण पूर्णपणे अराजकीय असल्याबद्ल तसेच हा कार्यक्रम शंभरी गाठत असल्याबद्ल उपराष्ट्रपतींनी यांची प्रशंसा केली. 'मन की बात' हे आपल्या सभ्यतेचे प्रतिबिंब आहे असे उपराष्ट्रपतींनी सांगितले.

प्रखर प्रतिभावान आणि आदिवासी महिला असलेल्या आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे उदाहरण देत नारी शक्तीसाठी हा सर्वोत्तम काळ असून देशातील महिला कर्तृत्वाच्या नव नवीन क्षेत्रात प्रवेश करत आहेत, असे उपराष्ट्रपतींनी सांगितले. उद्घाटन कार्यक्रमानंतर झालेल्या सत्रामध्ये उपराष्ट्रपती बोलत होते. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध देश स्वतःचे योगदान विसरला आहे आणि त्या भावना पुनरुज्जीवित करण्यात पंतप्रधानांनी मन की बातद्वारे दिलेले योगदान उल्लेखनीय आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले.

2047 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळून 100 वर्षे पूर्ण होतील त्यावेळच्या भारताचे वर्णन उपराष्ट्रपतींनी केले. भारत @100 चा भक्कम पाया आणि तेंव्हाच्या देशाच्या भवितव्याचा भक्कम पाया मन की बात @100 ने घातला आहे, असे त्यांनी सांगितले. देशातील नकारात्मकता कमी होण्याचे आणि सर्वांगीण सकारात्मक भावना वाढविण्याचे श्रेयही त्यांनी या कार्यक्रमाला दिले. पूर्वी देश उज्वल भविष्याची आशा गमावत होता आणि आपली जगभरातील प्रतिमा मलिन झाली होती, पण आता मात्र आपण भारताच्या शीर्षस्थानी असल्याचे आपल्याला दिसून येत आहे, असे उपराष्ट्रपतींनी सांगितले. 

“मन की बात ने अतिशय कमी कालावधीत स्थानिक कारागीर, प्रतिभावंत आणि कौशल्यवंतांना प्रसिद्धी मिळवून दिली आहे. आपला देश एक विविध रंगांच्या फुलांचा गुच्छ आहे जो जाती, पंथ आणि धर्माने विभागलेला असल्यामुळे देशातील प्रतिभेचा योग्य वापर केला जात नव्हता. पंतप्रधानांनी कारवाईचे आवाहन केल्यानुसार जनता कर्फ्यू ही घडामोड एक चळवळ बनली होती असे उपराष्ट्रपतींनी उदाहरणादाखल सांगितले. हा कार्यक्रम आपल्या लोकांच्या आकांक्षांना पंख देतो, त्यांना पुढे पाहण्यास प्रेरित करतो”, असे धनखड यांनी सांगितले. 

मन की बात या कार्यक्रमाची गुंफण 'एक भारत श्रेष्ठ भारत' या संकल्पने भोवती झाली आहे, असे ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले. भारतातील सामान्य लोकांच्या उपलब्धींवर प्रकाश टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या कार्यक्रमाच्या प्रसारणासाठी जनसंवादाचे मूळ माध्यम असलेल्या रेडिओ या माध्यमाची निवड करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.  

ठाकूर यांनी मन की बातच्या विविध आवृत्त्यांमध्ये पंतप्रधानांनी उल्लेख केलेल्या 106 मान्यवरांच्या उपस्थितीचा उल्लेख केला तसेच आतापर्यंत प्रसारित झालेल्या 99 भागांमध्ये 700 हून अधिक व्यक्ती आणि संस्थांच्या कामगिरीचा उल्लेख करण्यात आला आहे, असे सांगितले. क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या खेलो इंडिया अभियानाला, मन की बातने खेळाडूंच्या कामगिरीला देशातील प्रत्येक घरात पोहोचवून त्यांच्या प्रेरणेसाठी शक्ती गुणक म्हणून काम केले आहे, असे त्यांनी सांगितले. 

मन की बात ही वर्तनावर प्रभाव टाकणारी यंत्रणा बनली असल्याचे, आयआयएम रोहतकने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे, असे ठाकूर यांनी सांगितले.  

निधनानंतर आपल्या तान्ह्या मुलींचे अवयव दान करणार्‍या जोडप्याचे पंतप्रधानांनी या कार्यक्रमात कौतुक केले होते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबात अवयवदानाचा संदेश उत्साहाने स्वीकारला गेला, असे ठाकूर यांनी उदाहरणादाखल सांगितले.

पंतप्रधान जेव्हा परदेश दौऱ्यावर जातात तेव्हा ते देशाच्या छोट्या भागातून भेटवस्तू घेऊन जातात आणि यजमान देशाच्या मान्यवरांना भेटवस्तू देतात. त्यामुळे भारताच्या कानाकोपऱ्यातील भेटवस्तू आणि संस्कृती चिन्हे जगभरात ओळखली जात असल्याचा उल्लेख अनुराग ठाकूर यांनी केला. जगभरातील अनेक सर्वेक्षणांमध्ये पंतप्रधान मोदींना जागतिक नेत्यांमध्ये प्रथम पसंतीचे स्थान मिळाले आहे, ही मन की बातच्या प्रभावी संपर्काची साक्ष आहे, असेही ते म्हणाले.

आज जग भारताकडे आणि भारताच्या अर्थव्यवस्थेकडे आशेचे किरण म्हणून पाहत आहे, असे ठाकूर यांनी ऍपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांच्या नुकत्याच झालेल्या भारतभेटीचा दाखला देत सांगितले. 

पंतप्रधान त्यांच्या या रेडिओ प्रसारणासाठी भारतातील लोकांकडून सूचना आमंत्रित करतात. मन की बातच्या केवळ पहिल्या 15 भागांसाठी 61 हजार सूचना प्राप्त झाल्याचे ठाकूर यांनी सांगितले. 2017 मध्ये पंतप्रधानांच्या भाषणाचा विविध प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद प्रसारित करण्यास सुरुवात झाली त्यामुळे या कार्यक्रमाची व्याप्ती वाढली, असेही त्यांनी सांगितले. 

श्रोत्यांमध्ये उपस्थित असलेल्या 106 यशस्वी व्यक्ती या समुदायाच्या सहभागातून सामाजिक बदलांकडे घेऊन जाणाऱ्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहेत, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले. लोकांना प्रेरणा देऊन त्यांना सशक्त बनवत जबरदस्त सामाजिक प्रभाव पाडण्याचे श्रेय त्यांनी मन की बात कार्यक्रमाला दिले. ऑल इंडिया रेडिओच्या इतिहासातील मन की बात हा सर्वात लोकप्रिय कार्यक्रम बनला आहे, असे त्यांनी सांगितले. 

यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या पत्नी डॉ सुदेश धनखड आणि प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी हे देखील उपस्थित होते.

उद्घाटन कार्यक्रमात उपराष्ट्रपतींच्या हस्ते दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. पहिले पुस्तक ‘मन की बात@100’ वरील कॉफी टेबल बुक जे ‘मन की बात’ च्या प्रवासावर प्रकाश टाकते आणि या कार्यक्रमामुळे पंतप्रधान आणि नागरिक यांच्यातील थेट संवादाच्या नव्या युगाची सुरुवात कशी झाली याचे वर्णन करते. तर , प्रसार भारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस. वेमपती यांनी लिहीलेले 'कलेक्टिव्ह स्पिरिट, कॉंक्रिट ॲक्शन' हे दुसरे पुस्तक , जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीबरोबर सुरू असलेल्या संभाषणातील आकर्षक पैलूं जसे की, सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय, सांस्कृतिक, आरोग्य आणि आपल्या देशाच्या अगदी हृदयाशी प्रतिध्वनी करणारे इतर विषय यांचा लिखीत गोषवारा आहे.

दिवसभर चाललेल्या संमेलनात नारी शक्ती, विरासत का उत्थान, जन संवाद से आत्मनिर्भरता आणि आहवान से जन आंदोलन या विषयावर चार चर्चासत्रे होणार आहेत आणि त्यानंतर समापन सत्र होणार आहे.

मन की बात या मासिक रेडिओ प्रसारणाचा 100 वा भाग 30 एप्रिल 2023 रोजी प्रसारित केला जाईल.

 

* * *

G.Chippalkatti/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1919895) Visitor Counter : 107