पंतप्रधान कार्यालय

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावाला पंतप्रधानांनी राज्यसभेत दिले उत्तर


"नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आणि त्यांना सक्षम करणे हे आमच्या सरकारचे उद्दिष्ट"

“आधुनिक भारताच्या उभारणीसाठी पायाभूत सुविधा, व्याप्ती आणि गतीचे महत्त्व आम्ही जाणून आहोत”

"आमची विचारसरणी खंडित नसून आमचा दिखावेगिरीवर विश्वास नाही"

"आम्ही यशस्वी झालो असून; सामान्य नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी तंत्रज्ञानाचा आम्ही वापर करत आहोत"

"डिजिटल इंडियाच्या यशाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे"

"आम्ही राष्ट्रीय प्रगतीवर लक्ष केंद्रित करत प्रादेशिक आकांक्षांकडेही लक्ष दिले आहे"

“भारत 2047 पर्यंत "विकसित भारत" बनविणे, हा आमचा संकल्प"

Posted On: 09 FEB 2023 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी  2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या संसदेतील अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावाला उत्तर दिले. आपल्या अभिभाषणात ‘विकसित भारता’चे दर्शन सादर करत दोन्ही सभागृहांना मार्गदर्शन केल्याबद्दल राष्ट्रपतींचे आभार मानूनपंतप्रधानांनी उत्तराची सुरुवात केली.

पंतप्रधान म्हणाले की, पूर्वीच्या काळाच्या अगदी उलट "नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आणि त्यांना सक्षम करणे हे आमच्या सरकारचे उद्दिष्ट आहे." लोकांच्या समस्या सोडवणे ही आधीच्या काळातील सरकारची जबाबदारी होती, परंतु त्यांचे प्राधान्य आणि हेतू वेगळे होते असे ते म्हणाले. "आम्ही आज समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधत आहोत", असेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी पाण्याच्या समस्येचे उदाहरण देत स्पष्ट केले की दिखावेगिरी ऐवजी, पाण्याच्या पायाभूत सुविधा, जल प्रशासन, गुणवत्ता नियंत्रण, जलसंधारण आणि सिंचन नवकल्पना तयार करण्याचा सर्वांगीण एकात्मिक दृष्टीकोन अवलंबण्यात आला आहे. संबंधित उपायांमुळे आर्थिक समावेशन, जन धन-आधार-मोबाईल या माध्यमातून लाभार्थींना थेट हस्तातंरण , पंतप्रधान गतिशक्ती बृहत आराखड्याच्या माध्यमातून  पायाभूत सुविधांचे नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये कायमस्वरूपी उपाय  करण्‍यात आले आहेत.

आधुनिक भारताच्या उभारणीसाठी पायाभूत सुविधा, त्याचे प्रमाण आणि गतीचे महत्त्व आपण जाणतो,असे पंतप्रधान म्हणाले. तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याने देशातील कार्यसंस्कृती बदलली असून, त्याची गती आणि प्रमाण वाढवण्यावर सरकार लक्ष केंद्रित करत आहे, यावर त्यांनी भर दिला.

महात्मा गांधी म्हणायचे, ‘श्रेय’ आणि ‘प्रिय’ यापैकी आम्ही श्रेयाचा म्हणजेच गुणवत्तेचा  मार्ग निवडला आहे,पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी अधोरेखित केले, की सरकारने निवडलेला मार्ग हा विश्रांतीला प्राधान्य देणारा नाही, सर्वसामान्य लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही अहोरात्र अथक परिश्रम करत आहोत.

स्वातंत्र्याच्या अमृत काळात परिपूर्णतेचे शिखर गाठण्यासाठी सरकारने महत्वाचे पाउल उचलल्याचे पंतप्रधानांनी विशेष नमूद केले. देशातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत 100 टक्के लाभ पोहोचवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा त्यांनी पुनरुच्चार केला. ही खरी धर्मनिरपेक्षता आहे. यामुळे भेदभाव आणि भ्रष्टाचार दूर होतो, मोदी म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले, दशकांपासून आदिवासी समाजाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले. आम्ही त्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात आदिवासींच्या कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात आली असून आदिवासी समुदायाच्या कल्याणासाठी ठोस कार्यक्रम  हाती घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

लहान शेतकरी हा भारताच्या कृषी क्षेत्राचा कणा आहे, यावर भर देत पंतप्रधान म्हणाले, आम्ही त्यांचे हात बळकट करण्यासाठी काम करत आहोत. पंतप्रधान म्हणाले की, लहान शेतकऱ्यांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष करण्यात आले. सध्याच्या सरकारने त्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रित केले आणि लहान शेतकर्‍यांसह लहान विक्रेते आणि कारागीरांसाठी अनेक संधी निर्माण केल्या. पंतप्रधानांनी महिला सक्षमीकरणासाठी सरकारने उचललेल्या पावलांची माहिती दिली आणि भारतातील महिलांच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर सक्षमीकरण आणि सन्मान सुनिश्चित करण्यासाठी तसेच जगण्याची सुलभता निर्माण करण्यासाठी सरकारने घेतलेल्या पुढाकाराबद्दल ते बोलले.

जेव्हा भारतातील शास्त्रज्ञ, नवोन्मेषी  आणि लस उत्पादकांना काही लोकांनी  निराश करण्याचा प्रयत्न केला त्या दुर्दैवी घटनांकडे लक्ष वेधत पंतप्रधान म्हणाले की,  "आपल्या  शास्त्रज्ञांच्या आणि नवोन्मेषकांच्या  नैपुण्याने , भारत जगातील एक औषध उत्पादन (फार्मा ) केंद्र  बनत आहे". अटल नवोन्मेष अभियान  आणि टिंकरिंग लॅब यांसारख्या उपाययोजनांद्वारे वैज्ञानिक क्षेत्राकडील  कल  वाढवण्याविषयी पंतप्रधानांनी यावेळी भाष्य केले.  सरकारने निर्माण केलेल्या संधींचा पुरेपूर उपयोग करून खाजगी उपग्रह प्रक्षेपित केल्याबद्दल त्यांनी तरुणांचे आणि शास्त्रज्ञांचे कौतुक केले  "आपण यशस्वी झालो आहोत आणि तंत्रज्ञानाचा वापर सामान्य नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी करत आहोत.", असे ते म्हणाले.

देश आजही डिजिटल व्यवहारात जगात आघाडीवर आहे. डिजिटल इंडियाच्या यशाने आज संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. जेव्हा भारत मोबाईल फोन आयात करत असे त्या काळाची आठवण करून देत ते म्हणाले की, आज  मोबाईल फोन इतर देशांमध्ये निर्यात होत आहेत, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.

2047 पर्यंत भारताला  ‘विकसित  भारत’ बनण्याचा आमचा संकल्प आहे, असे  पंतप्रधानांनी नमूद  केले. आपण ज्या संधी शोधत होतोत्या मिळवण्यासाठी सरकारने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. भारत मोठी झेप घेण्यास सज्ज आहे आणि आता मागे वळून पाहणार नाही, असे पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप करताना सांगितले.  

 

 

 

 

S.Bedekar/Vinayak/Rajashree/Sonal C/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1897715) Visitor Counter : 169