पंतप्रधान कार्यालय
गुजरात रोजगार मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला व्हिडिओ संदेश
Posted On:
29 OCT 2022 3:46PM by PIB Mumbai
नमस्कार!
लाभ पंचमीच्या शुभ दिनी गुजरातमधील युवकांसाठी महा रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जाणे हा दुग्धशर्करा योग आहे. आज गुजरातच्या हजारो युवक युवतींना एकाच वेळी राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागांच्या कार्यालयात काम करण्यासाठी नियुक्ती पत्र, निवड पत्र, पसंती पत्रांचे वितरण केले जात आहे. मी तुम्हा सर्व तरुणांना, युवक युवतींना या क्षणाच्या अनेक अनेक शुभेच्छा देत आहे.
धनत्रयोदशीच्या दिवशी जेंव्हा मी दिल्लीत राष्ट्रीय स्तरावर रोजगार मेळाव्याची सुरुवात केली होती तेव्हा मी म्हणालो होतो की, भारत सरकार तर हा मेळावा आयोजित करतच आहे, पण भारत सरकारच्या आयोजनाबद्दल जाणून इतर राज्य सरकार देखील असा मेळावा आयोजित करतील. आणि मला याचा आनंद आहे की गुजरात सरकारने या क्षेत्रातही आपली परंपरा पुढे नेत या उपक्रमाला प्रोत्साहन दिले आहे. ज्या प्रमाणे भारत सरकारचा मेळावा यशस्वी झाला त्याही पेक्षाही जास्त उत्साहाने गुजरातसारख्या राज्याने याप्रकारच्या मेळावा आयोजनाची जबाबदारी उचलली तर गुजरात अभिनंदनाला पात्र ठरेल.
गुजरात सेवेच्या पंचायत पसंती बोर्डाने 5000 हून जास्त मित्रांना आज नियुक्ती पत्र दिल्याचे मला सांगण्यात आले आहे. याचप्रकारे गुजरातमध्ये पोलिस उप निरीक्षक, हा जो भर्ती बोर्ड आहे, त्यात लोकरक्षक पदांची भर्ती आहे, त्यातही सुमारे 8000 हून जास्त उमेदवारांना आज नियुक्ती पत्र दिली जाणार आहेत. त्वरित पावले उचलत इतक्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मी भूपेंद्रभाई आणि त्यांच्या सरकारचे अभिनंदन करतो. इतकेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी दुसऱ्या वेगवेगळ्या भर्ती आयोजनात 10 हजार युवकांना यापूर्वीच नियुक्ती पत्र दिल्याचे मला सांगण्यात आले आहे. याचा अर्थ असा की त्यांनी जे 35 हजार पदं भर्तीचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे त्यात त्यांनी मोठी मजल मारली आहे.
मित्रांनो,
गुजरात आज विकासाच्या ज्या उंचीवरुन पुढे अग्रेसर होत आहे, आणि त्यातही भूपेंद्र भाईंच्या नेतृत्वाखाली जो गुजरात नवे औद्योगिक धोरण घेऊन आला आहे, त्याचे ज्याप्रकारे स्वागत झाले आहे, मला ज्याप्रकारे देशभरात वेगवेगळ्या क्षेत्रात असे साहसी लोक भेटले आहेत, जे गुजरातच्या औद्योगिक धोरणाची खूप प्रशंसा करतात आणि त्यातून एक बाब स्पष्ट अधोरेखित होत आहे की औद्योगिक धोरणांमुळे उद्योग तर येतीलच, देश - विदेशातून येतील, पण सर्वात महत्वपूर्ण बाब आहे रोजगाराच्या संधी, आणि खरोखरच प्रत्यक्षात रोजगाराचे नव नवीन क्षेत्र खुले होत आहेत. इतकेच नव्हे तर यामुळे स्वयंरोजगाराच्या नव्या वाटा चोखाळता येणार आहेत. आणि गुजरात सरकारने तंत्रज्ञानाच्या मदतीने ओजस सारखे जे डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केले आहेत, तिसऱ्या आणि चौथ्या श्रेणीतील पदांसाठी, मुलाखतीची प्रथा समाप्त झाली आहे, भर्ती प्रक्रिया एकदम सुलभ झाली, आणि त्याच बरोबर पारदर्शकही झाली आहे. रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी गुजरात सरकारने जे अनुबंधम नावाचे मोबाईल ॲप आणि वेब पोर्टल विकसित केले आहे ते पारदर्शकता आणि सहज उपलब्धता यावी यासाठीच, ही व्यवस्था देखील गुजरातच्या युवकांसाठी सुवर्णसंधी बनली आहे. या सुविधेद्वारे रोजगार शोधणारे आणि ज्यांना नवयुवकांची गरज आहे, नवनवीन कौशल्याची गरज आहे, अशा दोन्ही बाजूंची प्रक्रिया जलद गतीने होत आहे. प्राप्त करणारे आणि देणारे या दोघांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
गुजरात लोकसेवा आयोगाने जो सुनियोजित आणि तत्काळ भर्ती प्रक्रियेचा आराखडा बनवला आहे, मला शंभर टक्के खात्री आहे की राष्ट्रीय स्तरावर देखील या आराखड्याचा सर्व राज्य अभ्यास करतील आणि नक्कीच आपल्या आवश्यकतेनुसार यात बदल करून देशासाठी उत्तम शासन प्रणाली निर्माण करतील. यासाठीही गुजरात सरकार आणि भूपेंद्र भाईंच्या संपूर्ण चमूची जितकी प्रशंसा केली ती कमीच असेल.
मित्रांनो,
येत्या काही दिवसातच संपूर्ण देशात राष्ट्रीय स्तरावर,आणि विविध राज्ये देखील यात सहभागी झाली, भारत सरकारने रोजगार मेळाव्याना प्रारंभ केल्यापासून,आज काही दिवसातच गुजरात यात सहभागी झाला आहे.जवळजवळ सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशही यात सामील होण्यासाठी पुढे असल्याची माहिती माझ्याकडे येत आहे.भारत सरकारने एका वर्षात 10 लाख रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.ज्या प्रकारे विविध राज्ये यात सामील होत आहेत, ते पाहून मला वाटते, की हा आकडा लाखांच्या पेक्षा कितीतरी जास्त पुढे जात आहे.याचा अर्थ असा आहे की केंद्र आणि राज्य सरकारे आज अशा पिढीला शासनात सहभागी करत आहेत,ज्यांच्यामुळे भारत सरकारचे, सर्वांना संधी उपलब्ध करण्याचे आणि अखेरच्या स्तरावर असलेल्या माणसांपर्यंत मदत पोहोचवण्याचे जे उद्दिष्ट आहे त्याची 100% अंमलबजावणी होईल.त्यामुळे नवीन कार्यशक्ती तयार होईल,ही तरुण मुले-मुली उत्साहाने येतील,त्यामुळे या कार्याला चांगलीच गती मिळेल आणि मला आशा आहे, की हे नव्याने रोजगार मिळालेले आपले नवयुवक,नवी मुले-मुली आपल्या समाजासाठी,आपल्या गावासाठी, आपल्या प्रदेशासाठी,आपल्या राज्यासाठी आपल्यातील प्रचंड ऊर्जेने उत्साहाने आणि बांधिलकीने आपण आपल्या समाजासाठी काहीतरी केले पाहिजे,या भावनेने संपूर्ण शासन प्रणालीची एक नवीन प्राणशक्ती बनतील;आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो,आज भारताने अमृत काळात प्रवेश केला आहे.आपण आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करत आहोत, 2047 मध्ये, जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील,त्यावेळेपर्यंत येत्या 25 वर्षात आपल्याला आपल्या देशाला इतकं पुढे न्यायचं आहे, इतकं पुढे न्यायचं आहे आणि गंमत म्हणजे हा कालावधी तुमच्या जीवनातील ही अमृतकाल असणार आहे.येणारी पुढील 25 वर्षे तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही तितकीच महत्त्वाची आहेत, तुमची स्वप्ने, तुमचे संकल्प, तुमची ऊर्जा, तुमच्या महत्त्वाकांक्षा,हे सर्व 2047 मध्ये भारताला इतक्या मोठ्या शिखरावर पोहोचवणार आहेत; ज्याचे तुम्ही सर्वात मोठे भागीदार असाल आणि तुम्हीच त्यांचे हक्कदारपण असणार आहात.
किती सोनेरी संधी आली आहे आणि या शुभ मुहूर्तावर सर्व नवयुवकांना आयुष्यात ही संधी मिळत आहे, पण या संधीतच अडकून राहू नका मित्रांनो, आता अनेक अभ्यासक्रम ऑनलाईन चालवले जातात, निरंतर स्वतःचा विकास साधत राहा, कुठेही थांबून राहू नका,तुम्हाला पुढे जायचं आहे,म्हणजे जायचंय,आणि मी असे अनेक लोक पाहिले आहेत की ज्यांनी महाविद्यालयात पट्टेवाल्याच्या नोकरीने सुरुवात केली आणि तिथेच राहून शिक्षण घेत घेत,त्याच महाविद्यालयात प्राध्यापक झाले. प्रगती साध्य करण्यासाठी कुठेही थांबून राहू नका. नवनवीन गोष्टी शिकायला हव्यात, आपल्यातील विद्यार्थी वृत्ती कायम जिवंत ठेवायला हवी.तुम्ही शासन व्यवस्थेत प्रवेश करत आहात, म्हणजे जीवनातील स्वप्नांच्या संकल्पांसाठी हा दरवाजा उघडला गेला आहे, पुढे खूप काही करायचे आहे, आणि आपल्याला पुढे जायचे आहे, एवढेच नाही तर सर्वांना पुढे न्यायचे आहे. मागासलेल्या,अतिवंचित माणसांच्या सुखासाठी जेव्हा आपण कष्ट करतो,ना तेव्हाच जीवनात समाधान मिळतं,मिळालेलं काम आपण जेव्हा परीश्रमपूर्वक करतो,ना तेव्हाच त्यातून मिळणारा जो आनंद आहे, तोच प्रगतीची दारे खुली करतो,आणि माझा विश्वास आहे की गुजरातमधील आमच्या मुलामुलींनो,येत्या 25 वर्षांचा भारताचा अमृत कालावधी हा जगाच्या कल्याणाचाही अमृत कालावधी आहे आणि तुम्ही त्याचे सारथी होत आहात. किती शुभ योगायोग आहे हा, किती उत्तम संधी आहे ही, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! जितक्या शुभेच्छा देईन तितक्या कमीच आहेत. खूप प्रगती करा, आपल्या मातापित्यांच्या स्वप्नांची पूर्तता करा!
धन्यवाद मित्रांनो!
***
R.Aghor/S.Mukhedkar/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1872014)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam