युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी 1 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत महिनाभर चालणाऱ्या देशव्यापी स्वच्छ भारत 2.0 मोहीमेची केली घोषणा

Posted On: 29 SEP 2022 8:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2022

भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचा युवा व्यवहार विभाग 1 ऑक्टोबर 2022 पासून महिनाभर देशव्यापी स्वच्छ भारत 2.0 सुरू करणार आहे, अशी घोषणा केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी  ट्विटरद्वारे केली.

1 ऑक्टोबर 2022 रोजी प्रयागराज येथून स्वच्छ भारत 2.0 मोहीमेला प्रारंभ करण्यात येणार असून जनजागृती करणे, लोकांना एकत्र आणणे आणि भारत स्वच्छ करण्यात जनतेचा सहभाग सुनिश्चित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे, अशी माहिती ठाकूर यांनी दिली. या उपक्रमात विविध प्रांत, भाषा आणि पार्श्वभूमीचे लोक एकत्रितरित्या काम करतील आणि संपूर्णपणे ऐच्छिक तत्त्वावर सहभागी झालेले लोक कचऱ्याची विल्हेवाट लावतील, असेही त्यांनी सांगितले.

गेल्या वर्षी 75 लाख किलो प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे उद्दिष्ट केवळ साध्य झाले नाही तर त्याहून अधिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या वर्षीच्या स्वच्छ भारत मोहिमेच्या यशानंतर, या वर्षी युवा व्यवहार विभागाने 1 कोटी किलो प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. स्वच्छ भारत 2.0 उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे आणि जबाबदार नागरिक म्हणून एकमेकांना सहभागासाठी प्रेरित करावे, असे आवाहन ठाकूर यांनी देशवासीयांना केले आहे.

S.Kane /S.Mukhedkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1863497) Visitor Counter : 138