पंतप्रधान कार्यालय
नवी दिल्लीत प्रगती मैदान इथे झालेल्या जैवतंत्रज्ञान स्टार्टअप एक्सपो- 2022 च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
Posted On:
09 JUN 2022 1:06PM by PIB Mumbai
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी,जैव-तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित सर्व मान्यवर,देश-विदेशातून आलेले अतिथी, तज्ञ, गुंतवणूकदार , लघु आणि मध्यम कंपन्या आणि स्टार्टअप्स सह उद्योगक्षेत्रातील सर्व सहकारी, बंधू आणि भगिनींनो,
देशातल्या पहिल्या जैव-तंत्रज्ञान 'स्टार्ट अप एक्सपो'च्या या आयोजनासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी तसेच भारताच्या या शक्तीची जगाला ओळख करुन देण्यासाठी मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. हे प्रदर्शन, भारताच्या जैव-तंत्रज्ञान क्षेत्राच्या वेगाने होणाऱ्या विकासाचे प्रतिबिंब आहे. गेल्या आठ वर्षात, भारताच्या जैव विविधतेत आठ टक्के वाढ झाली आहे. 10 अब्ज डॉलर्स पासून आपण 80 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले आहोत. भारत लवकरच जैवतंत्रज्ञानाच्या जागतिक व्यवस्थेत पहिल्या दहा देशांच्या यादीत पोहोचणार आहे. नव्या भारताच्या या नव्या उडीत, जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहायक परिषद म्हणजेच,‘BIRAC’ ची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. गेल्या काही वर्षात, भारतात जैव-तंत्रज्ञानाचे, संशोधन आणि नवोन्मेषाचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. BIRAC च्या या यशस्वी प्रवासाची दहा वर्षे पूर्ण करण्याचा महत्त्वाचा टप्पा गाठल्याबद्दल, मी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो. इथे जे प्रदर्शन लागले आहे, त्यात भारताचे युवा कौशल्य, भारतातील जैव-तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट अप्स, यांचे सामर्थ्य आणि जैव-तंत्रज्ञान क्षेत्रासाठी भविष्याचा आराखडा, अत्यंत उत्तम प्रकारे, सुरेखपणे सादर करण्यात आला आहे. आणि सध्या जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, त्यात पुढच्या 25 वर्षांसाठी नवी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.
अशावेळी बायोटेक क्षेत्र, देशाच्या विकासाला नवी गती देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. या प्रदर्शनात दाखवण्यात आलेले जैव-तंत्रज्ञान स्टार्टअप्स आणि गुंतवणूकदार तसेच, इनक्युबेशन सेंटर्स, नव्या भारताच्या आशा-आकांक्षांसोबत वाटचाल करत आहेत. आज इथे थोड्यावेळापूर्वी ज्या ई-पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले, त्यात आपल्या साडेसातशे जैव-तंत्रज्ञानाच्या उत्पादनांची यादी करण्यात आली आहे. हे भारताच्या जैव-अर्थव्यवस्थेचे सामर्थ्य आणि त्यांचा विस्तार, वैविध्य हेही दर्शवणारे आहे.
मित्रांनो,
या सभागृहात जैवतंत्रज्ञानाशी संबंधित जवळपास प्रत्येक क्षेत्राचा प्रतिनिधी उपस्थित आहे. आपल्यासोबत, ऑनलाईन स्वरूपातही, जैव-तंत्रज्ञान क्षेत्रातले तज्ज्ञदेखील यात सहभागी झाले आहेत. येत्या दोन दिवसात आपण या एक्सपोमध्ये जैवतंत्रज्ञान क्षेत्रासाठी असलेल्या संधी आणि क्षेत्रासमोरील आव्हाने, यावर चर्चा करणार आहोत. गेल्या काही दशकात आम्ही, जगभरात आपले डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांची प्रतिष्ठा वाढतांना पाहिले आहे. जगभरात आपल्या आयटी व्यवसायिकांच्या कौशल्याबाबत जे विश्वासाचे वातावरण आहे, ते आता एका वेगळ्या उंचीवर पोहोचले आहे. आणि हाच विश्वास, हीच प्रतिष्ठा,या दशकात, भारताच्या बायोटेक म्हणजे जैव तंत्रज्ञान क्षेत्राविषयी, भारताच्या जैवतंत्रज्ञ व्यावसायिकांविषयी निर्माण होतांना आपण सगळे बघतो आहोत. हा मला आपल्याविषयी विश्वास वाटतो. भारताच्या बायोटेक क्षेत्राविषयी विश्वास वाटतो आणि मला हा विश्वास का वाटतो, यावर सविस्तर बोलायला मला आवडेल.
मित्रांनो,
आज जर भारताला जैवतंत्रज्ञान क्षेत्रांत संधींची भूमी समजले जात असेल, तर त्यासाठी असलेल्या अनेक कारणांपैकी, पांच मोठी कारणे मला दिसतात. पहिले कारण—वैविध्यपूर्ण लोकसंख्या, विविध हवामानाचे प्रदेश, दुसरे कारण- भारताचे गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ, तिसरे कारण- भारतात उद्योगस्नेही वातावरण निर्मितीसाठी सुरु असलेले प्रयत्न, चौथे – भारतात सातत्याने वाढत असलेली, जैव-उत्पादनांची मागणी आणि पाचवे कारण- भारताच्या जैवतंत्रज्ञान क्षेत्राचा म्हणजे आपल्या यशस्वी कारकीर्दीचा इतिहास. हे पाचही घटक एकत्र येऊन, भारताची शक्ती कित्येक पटीने वाढवतात.
मित्रांनो,
गेल्या आठ वर्षात, सरकारने देशाची ही ताकद वाढवण्यासाठी सातत्याने काम केले आहे. आम्ही सर्वंकष आणि संपूर्ण सरकारच्या दृष्टिकोनावर भर दिला आहे. जेव्हा मी असे म्हणतो की सबका साथ-सबका विकास, तेव्हा हे भारताच्या वेगवेगळ्या क्षेत्रांवरही लागू होत असते. एक काळ असा होता, जेव्हा देशात अशा विचारांचे प्राबल्य होते, ज्यानुसार केवळ काहीच क्षेत्रांना भक्कम करण्यासाठी प्रयत्न केले जात असत. इतर क्षेत्रांना त्यांच्या नशिबावर सोडून दिले जात होते. मात्र, आम्ही हा विचार बदलला आहे, हा दृष्टिकोन बदलला आहे. आजच्या नव्या भारतात, प्रत्येक क्षेत्राला त्याचा विकास करुन, देशाच्या विकासाला गती देण्याची संधी आहे. म्हणूनच प्रत्येक क्षेत्राला साथ, प्रत्येक क्षेत्राचा विकास, ही आज देशाची गरज आहे. म्हणूनच आम्ही अशा प्रत्येक मार्गाचा शोध घेतो आहोत, जो आमच्या विकासाला गती देऊ शकेल. विचार आणि दृष्टिकोनात हा जो महत्त्वाचा बदल झाला आहे, त्याचे परिणामसुद्धा आपल्याला दिसत आहेत. आम्ही आपल्या भक्कम अशा सेवा क्षेत्रावर भर दिला, तर सेवा क्षेत्राने 250 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचा विक्रम केला. आम्ही मालाच्या निर्यातीवर भर दिला , तर 420 अब्ज डॉलर्सच्या उत्पादनांच्या निर्यातीचाही विक्रम बनवला. यासोबत, इतर क्षेत्रांकडेही त्याच गांभीर्याने लक्ष देण्याचे आमचे प्रयत्न सुरूच आहेत.म्हणूनच, आम्ही जर वस्त्रोद्योग क्षेत्रात पीएलआय योजना लागू केली, तर दुसरीकड़े ड्रोन, सेमी-कंडक्टर्स आणि उच्चक्षमतेच्या सौर पीव्ही मोडयूल्सच्या क्षेत्रातही आपण ही योजना पुढे नेत आहोत. जैव-तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासासाठी भारत आज जेवढी पावले उचलत आहे, ते अभूतपूर्व आहे.
मित्रांनो,
सरकारच्या प्रयत्नांविषयी आपल्याला जाणून घ्यायचे असेल, तर आपण आपल्या देशातील स्टार्ट अप व्यवस्था आणि त्याचा विस्तार याकडे नक्कीच बघू शकता. गेल्या आठ वर्षात देशात स्टार्ट अप्सची संख्या काही शेकड्यांनी वाढून 70 हजार पर्यंत पोहोचली आहे. हे 70 हजार स्टार्ट अप्स सुमारे 60 वेगवेगळ्या उद्योगक्षेत्रांत तयार झाले आहेत. त्यापैकी देखील 5 हजारपेक्षा अधिक स्टार्ट अप्स, जैव विविधतेशी संबंधित आहेत.म्हणजेच, भारतातील प्रत्येक 14 वी स्टार्ट अप कंपनी, जैवतंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित आहे. यापैकी अकराशेपेक्षा अधिक स्टार्ट अप्स तर गेल्या वर्षीच सुरु झाले आहेत. यावरून आपण अंदाज बांधू शकता की देशातील किती मोठी गुणवत्ता जलग गतीने बायोटेक क्षेत्राकडे वळते आहे.
मित्रांनो,
गेल्या काही वर्षांत अटल इनोव्हेशन मिशन, मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत आम्ही जी काही पावले उचलली आहेत त्यांचा देखील फायदा बायोटेक क्षेत्राला झाला आहे. स्टार्ट अप इंडिया सुरू झाल्यापासून आमच्या बायोटेक स्टार्ट अप्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या 9 पटीने वाढली आहे. बायोटेक इनक्यूबेटर्सची संख्या आणि एकूण निधीमध्येही जवळपास सात पटीने वाढ झाली आहे. 2014 मध्ये आपल्या देशात फक्त 6 बायो-इन्क्युबेटर होते, आज त्यांची संख्या 75 झाली आहे. 8 वर्षांपूर्वी आपल्या देशात 10 बायोटेक उत्पादने होती. आज त्यांची संख्या 700 च्या वर गेली आहे. भारत त्याच्या भौतिक पायाभूत सुविधा आणि डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये करत असलेल्या अभूतपूर्व गुंतवणुकीमुळे जैवतंत्रज्ञान क्षेत्रालाही फायदा होत आहे.
मित्रांनो,
आपल्या तरुणांमधील हा नवा जोष, हा नवा उत्साह, निर्माण होण्यामागे आणखी एक मोठे कारण आहे. ही सकारात्मकता यामुळे आहे कारण, आता देशामध्ये नवोन्मेषाची आणि संशोधन आणि विकासाची आधुनिक पाठबळ प्रणाली देशात उपलब्ध होत आहे. देशात धोरणापासून ते पायाभूत सुविधांपर्यंत आवश्यक असलेली प्रत्येक सुधारणा केली जात आहे.सरकारलाच सर्व काही माहीत आहे, सरकार एकट्यानेच सर्व काही करेल, ही कार्यसंस्कृती मागे टाकून आता देश 'सबका प्रयास' या भावनेने पुढे जात आहे. त्यामुळे आज भारतात अनेक नवीन इंटरफेस विकसित केले जात आहेत, BIRAC सारखे प्लॅटफॉर्म मजबूत केले जात आहेत. स्टार्ट-अपसाठी स्टार्टअप इंडिया मोहीम, अंतराळ क्षेत्रासाठी IN-SPACe, संरक्षण स्टार्ट-अपसाठी iDEX, सेमीकंडक्टरसाठी भारतीय सेमी-कंडक्टर मिशन असो, तरुणांमध्ये नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन असो, बायोटेक स्टार्ट-अप एक्स्पो असो, सबका प्रयासच्या भावनेने सरकार उद्योगातील सर्वोत्कृष्ट विचारांना एकाच व्यासपीठावर, नाविन्यपूर्ण संस्थांद्वारे, जास्तीत जास्त प्रयत्नांच्या भावनेने एकत्र आणत आहे. याचा आणखी एक मोठा फायदा देशाला होत आहे. देशाला संशोधन आणि शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून नवीन संधी मिळत आहे. जगाच्या वास्तविक दृष्टिकोनामध्ये उद्योगांकडून मदत मिळत आहे आणि सरकार आवश्यक धोरणात्मक वातावरण आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करत आहे.
मित्रांनो,
आम्ही कोविडच्या संपूर्ण काळात पाहिले आहे की जेव्हा हे तिघे एकत्रितपणे कार्य करतात तेव्हा अल्पावधीत अनपेक्षित परिणाम मिळू शकतात. अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे, वैद्यकीय पायाभूत सुविधांपासून ते लसींसाठी संशोधन, उत्पादन आणि लसीकरणापर्यंत भारताने अशी कामगिरी केली आहे ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. त्यानंतर देशात विविध प्रश्न उपस्थित केले जात होते. चाचण्यांसाठी प्रयोगशाळाच नसतील तर चाचण्या कशा होणार? विविध विभाग आणि खाजगी क्षेत्र यांच्यात समन्वय कसा असेल? भारताला लस कधी मिळणार? लस सापडली तरी एवढ्या मोठ्या देशात सर्वांना लस मिळायला किती वर्षे लागतील? असे अनेक प्रश्न आपल्यासमोर वारंवार येत होते. पण आज सबका प्रयासच्या बळावर भारताने सर्व शंकांना उत्तर दिले आहे. आम्ही देशवासीयांना लसींच्या सुमारे 200 कोटी मात्रा दिल्या आहेत. जैव तंत्रज्ञानापासून ते इतर सर्व क्षेत्रांपर्यंत, सरकार, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील समन्वयाने भारताला मोठ्या संकटातून बाहेर काढले आहे.
मित्रांनो,
बायोटेक म्हणजेच जैवतंत्रज्ञान क्षेत्र हे सर्वाधिक मागणी असलेल्या क्षेत्रांपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात इज ऑफ लिव्हिंगच्या मोहिमांनी बायोटेक क्षेत्रासाठी नवीन संधींची दालने उघडली आहेत. आयुष्मान भारत योजनेंतर्गत खेडेगावातील आणि गरिबांसाठी उपचार परवडणारे आणि सुलभ करण्यात आल्यामुळे आरोग्य सेवा क्षेत्राची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बायो-फार्मासाठीही नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. आम्ही टेलिमेडिसिन, डिजिटल हेल्थ आयडी आणि ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे या संधींचा विस्तार करत आहोत. येत्या काही वर्षांत बायोटेकसाठी देशात मोठा ग्राहकवर्ग निर्माण होणार आहे.
मित्रांनो,
औषध निर्मिती क्षेत्रासोबतच कृषी आणि उर्जा क्षेत्रात भारत मोठे परिवर्तन घडवून आणत आहे. त्यामुळे देखील बायोटेक क्षेत्रात नव्या आकांक्षा निर्माण होत आहेत. रसायनविरहित शेतीला चालना देण्यासाठी भारतात आज जैविक खते आणि सेंद्रीय खतांना अभूतपूर्व प्रोत्साहन मिळत आहे. हवामान बदलाचा शेतीवरचा प्रभाव कमी करण्यासाठी, कुपोषणाच्या उच्चाटनासाठी, पोषण मूल्य वर्धक बियाण्याना देखील प्रोत्साहन दिले जात आहे.जैवइंधनाच्या क्षेत्रात वाढणारी मागणी, संशोधन आणि विकासविषयक पायाभूत सुविधांचा विस्तार यामुळे बायोटेकशी संबंधित लघु आणि मध्यम उद्योगा साठी, स्टार्ट अप्ससाठी एक खूप मोठी संधी आहे. अलीकडेच आम्ही पेट्रोलमध्ये इथेनॉलचे 10 टक्के मिश्रणाचे लक्ष्य साध्य केले. भारताने पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य देखील 2030 वरून 5 वर्षे कमी करून 2025 केले आहे. हे सर्व प्रयत्न बायोटेक क्षेत्रामध्ये रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणार आहेत, बायोटेक व्यावसायिकांसाठी नव्या संधी निर्माण करणार आहेत.सरकारने अगदी अलीकडेच गरिबांचे शंभर टक्के सक्षमीकरणाचे अभियान सुरू केले आहे ते देखील बायोटेक क्षेत्राला नवे बळ देऊ शकेल. म्हणजेच बायोटेक क्षेत्राच्या वृद्धीसाठी संधीच संधी आहेत.
भारताच्या जेनेरिक औषधांनी, भारताच्या लसींनी जगामध्ये जो विश्वास निर्माण केला आहे, जितक्या मोठ्या स्तरावर आपण काम करू शकतो, तो बायोटेक क्षेत्रासाठी आणखी एक खूप मोठा लाभ आहे. येणाऱ्या दोन दिवसात तुम्ही बायोटेक क्षेत्राशी संबंधित प्रत्येक शक्यतेबाबत विस्तृत चर्चा कराल याची मला खात्री आहे. आताच बायरॅकने(‘BIRAC’) 10 वर्षे पूर्ण केली आहेत. ज्यावेळी ‘BIRAC’ आपली 25 वर्षे पूर्ण करेल, त्यावेळी बायोटेक क्षेत्र कोणत्या उंचीवर असेल, त्यासाठी आपली लक्ष्ये आणि कृतीयोग्य बिंदूंवर आतापासूनच काम केले पाहिजे. या शानदार आयोजनासाठी देशाच्या युवा पिढीला या क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी आणि देशाच्या कौशल्याला जगाच्या समोर संपूर्ण सामर्थ्यानिशी सादर केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो, खूप खूप शुभेच्छा देतो.
खूप खूप धन्यवाद !
***
SonaliK/NilimaC/ShaileshP/RadhikaA/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1837265)
Visitor Counter : 140
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam