नौवहन मंत्रालय

देशातील पहिल्या जलमार्ग टॅक्सी सेवेचे तसेच नवी मुंबईतील बेलापूर जेट्टीचे उद्‌घाटन


बेलापूर जेट्टी आणि मुंबई बंदरावरील देशांतर्गत क्रूझ टर्मिनल दरम्यानच्या जलमार्ग टॅक्सी सेवेमुळे नवी मुंबई आणि मुंबई या शहरांना जोडणारा पहिला जलमार्ग नागरिकांसाठी उपलब्ध - केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल

Posted On: 17 FEB 2022 5:23PM by PIB Mumbai

मुंबई, 17 फेब्रुवारी 2022

मुंबई बंदर प्राधिकरण (MbPA)ने सर्वसामान्य नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी, जलमार्गाचा वापर करत, विविध प्रकल्प सुरु केले आहेत. आता याच मालिकेत प्राधिकरणाने जलमार्ग टॅक्सी सेवा सुरु केली असून, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वांनंद सोनोवाल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज17 फेब्रुवारी 2022 रोजी आभासी पद्धतीने या सेवेचे उद्‌घाटन झाले.

केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री कपिल पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री, केंद्र आणि राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकारी, खासदार, आमदार आणि स्थानिक पदाधिकारी बेलापूर इथे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

देशाच्या जनतेला उत्तम सुविधा मिळाव्यात, तसेच आपल्या अर्थव्यवस्थेचा जलद विकास व्हावा, यासाठी किनारपट्टी लगतची राज्ये, बंदरे आणि सागरमाला योजनेशी संलग्न मंत्रालये यांच्या  मदतीने विविध प्रकल्प राबवत आहेत, त्याचाच भाग म्हणून मुंबईत आज ही पहिली जलमार्ग टॅक्सी सेवा सुरु झाली आहे, अशा भावना केंद्रीय मंत्री सर्वांनंद सोनोवाल यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केल्या.

"आज आपल्या सर्वांसाठी, विशेषतः महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठबळामुळे आपण बेलापूर जेट्टीची उभारणी पूर्ण करू शकलो याबद्दल मी महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो," असे ते पुढे म्हणाले.

सागरमाला प्रकल्पाच्या माध्यमातून आज नवी मुंबईला बेलापूर येथे अत्याधुनिक जेट्टी मिळाली आहे. केंद्र सरकार आणि राज्य यांचा समसमान वाटा असलेल्या 8.37 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची मुंबई मेरिटाईम बोर्डाने यशस्वी अंमलबजावणी केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

बेलापूर जेट्टी प्रकल्पाची सुरुवात जानेवारी 2019 मध्ये झाली होती आणि सप्टेंबर 2021 पर्यन्त हा प्रकल्प पूर्ण झाला. कोविड-19 महामारीमुळे निर्बंध लागू असतांनाही, हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला.

बेलापूर जेट्टी आणि मुंबई बंदरावरील देशांतर्गत क्रूझ टर्मिनल दरम्यानच्या जलमार्ग टॅक्सी सेवेमुळे नवी मुंबई ते दक्षिण मुंबई दरम्यानचा साधारण दीड तासांचा प्रवासाचा वेळ, अर्ध्या तासापर्यंत कमी झाला आहे; या सेवेमुळे रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी होईल आणि मुंबई बंदराचा वाहतुकीसाठी उपयोग करण्यास प्रोत्साहन मिळेल,असेही त्यांनी सांगितले.

मुंबई बंदरात आणखी अनेक जेट्टी सेवा सुरु करण्याची केंद्र सरकारची योजना आहे, यात काटामरान आणि रो-पॅकस अशा दोन्ही सेवा असतील, असे ते म्हणाले.

केंद्र आणि राज्यातल्या  यंत्रणाच्या माध्यमातून 1.05 लाख कोटी रुपयांचे 131 प्रकल्प महाराष्ट्रात सुरु केले जाणार आहेत. या 131 प्रकल्पांपैकी, 2,078 कोटी रुपये किमतीच्या 46 प्रकल्पांना सागरमाला प्रकल्पाअंतर्गत वित्तीय सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही सोनोवाल यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यांमध्ये, नागरी जलमार्ग वाहतूक सेवेसाठी प्रचंड वाव असून, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीसाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो: केंद्रीय मंत्री बंदर समूहाअंतर्गत, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा ठिकाणी, मच्छीमारांचे जीवनमान उंचावण्यासाठी 32 पेक्षा अधिक प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. 4 मच्छिमार बंदर प्रकल्पांनाही सागरमाला अंतर्गत मंजूरी देण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की,आजचा दिवस राज्यासाठी महत्वाचा आणि आनंदाचा आहे. देशातील पहिली जलमार्ग टॅक्सीसेवा महाराष्ट्रात सुरु होत आहे. केंद्रीय मंत्र्यांनी या प्रकल्पाला प्राधान्य दिले त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.

आपल्याकडील साधनसंपत्तीचे महत्व ओळखून त्याचा जनतेसाठी उपयोग करणे महत्वाचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. एलिफंटाला जाण्यासाठी ही जलवाहतूक सेवा उपयोगी ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले.

जलमार्ग टॅक्सी सेवेविषयी माहिती

मुंबई बंदर प्राधिकरण सातत्याने लोकांच्या सेवेसाठी दक्ष असून, त्यासाठी अनेक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. दक्षिण मुंबईला जलमार्गाने, विविध ठिकाणांशी, जसे उरण, मांडावा, नवी मुंबई शी जोडले गेले आहे. भाऊचा धक्का ते मांडवा आणि अलिबाग दरम्यान रो-पॅकस फेरी सेवा देखील अतिशय यशस्वी झाली आहे.

कार्यालयीन वेळेत चाकरमान्यांना सोयीचे व्हावे, यासाठी या मार्गावरील प्रवासाचा वेळ 90 मिनिटांवरुन कमी करत, 35 ते 45 मिनिटांवर आणण्यात आला आहे. त्यामुळे, अंतर देखील 60 टक्क्यांनी कमी होणार आहे, ज्यामुळे इंधनाची तर बचत होईलच, शिवाय ही सेवा पर्यावरण पूरक देखील असेल. सध्या, सात स्पीड बोट्स ना प्रवासी वाहतूक करण्याचे परवाने मिळाले असून एका फेरीत 180 प्रवासी जाऊ शकतात. या जलमार्ग टॅक्सी, एका दिवसांत सहा फेऱ्या करु शकतात. मुंबई बंदर प्राधिकरण लवकरच, गरज पडल्यास या फेऱ्याची तसेच स्पीड बोट्सची संख्या वाढवणार असून लोकांच्या सेवेसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या जातील, असे प्राधिकरणाने म्हटले आहे. या सेवांमुळे, एलिफंटा लेण्या ते नवी मुंबई अशा पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे.नवी मुंबईतील प्रवाशांचा नवी मुंबई ते गेटवे ऑफ इंडिया हा तीन तास प्रवासाचा वेळ वाचणार आहे. तसेच हा प्रवास अतिशय सुखदायी असणार आहे.

नागरिकांच्या सोयीसुविधांसाठीचे उपक्रम सुरूच ठेवत, मुंबई बंदर प्राधिकरणाने रो-पॅकस टर्मिनल जवळच्या देशांतर्गत क्रूझ टर्मिनल पासून जलमार्ग टॅक्सी सुरु करण्यासाठीच्या सुविधाही विकसित केल्या आहेत. या जलमार्ग टॅक्सी सेवा नेरूळ, बेलापूर, एलिफंटा बेटे आणि जेएनपीटी इत्यादी स्थळांना जलमार्गाने जोडणार आहे. हा प्रवास आरामदायी तर असेलच, त्याशिवाय लोकांचा प्रवासाचा वेळ वाचेल आणि रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी देखील टळेल. त्याशिवाय ही वाहतूक पर्यावरण पूरक देखील ठरेल. जलमार्ग टॅक्सी पहिल्यांदाच मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांना जलद आणि विश्वासार्ह दळणवळण सेवेने जोडणार आहे. सर्व हितसंबंधियांच्या सहकार्याने, प्राधिकरण इतर ठिकाणी देखील या सेवेचा विस्तार करणार आहे.

 

 

 

 

S.Tupe/R.Aghor/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1799059) Visitor Counter : 372