कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

ई-प्रशासनावरील चोविसाव्या राष्ट्रीय चर्चासत्राची हैदराबादमध्ये यशस्वी सांगता

Posted On: 08 JAN 2022 5:54PM by PIB Mumbai

 

केंद्र सरकारचा प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार विभाग (DARPG) आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) यांनी तेलंगण राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने 7–8 जानेवारी 2022 रोजी हैदराबादमध्ये चोविसाव्या  ई-प्रशासन राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले. "महामारीनंतरच्या काळातील डिजिटल प्रशासन- भारताची तांत्रिक झेप" अशी या चर्चासत्राचे मध्यवर्ती संकल्पना होती. दोन दिवस झालेल्या ऊहापोहानंतर आजच्या समारोप सत्रात, ई-प्रशासनावरील 'हैदराबाद घोषणापत्राचा' स्वीकार करण्यात आला..

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि भूविज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाचे राज्यमंत्री, अणू ऊर्जा विभागाचे आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन झाले होते. यावेळी तेलंगण सरकारचे नागरी प्रशासन तथा इलेक्ट्रॉनिक्स आणि संवाद कॅबिनेट मंत्री के.टी.रामा राव यावेळी अध्यक्षस्थानी होते.

ई-प्रशासनाला चालना देण्यासाठी काही अद्ययावत तंत्रज्ञानावरील विचारांच्या आणि कल्पनांच्या रचनात्मक देवाणघेवाणीसाठी हा मंच उपयुक्त ठरला.

या चर्चासत्रात सहभागी झालेल्या सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांच्या पथकांना इ-प्रशासनास चालना देण्याच्या दृष्टीने उपयुक्त अशा अत्याधुनिक संकल्पना व तंत्रांची सविस्तर माहिती देण्यात आली. त्या-त्या राज्य / केंद्रशासित प्रदेशात लागू करता येतील आणि प्रभावी ठरतील अशा तंत्रांचा त्यात समावेश होता.

ई-प्रशासन उपक्रमांचा उचित सन्मान करण्यासाठी 'राष्ट्रीय ई-प्रशासन पुरस्कार 2021' या पुरस्कारांचेही वितरण उद्घाटन समारंभात करण्यात आले.

***

S.Patil/J.Waishampayan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1788581) Visitor Counter : 252