पंतप्रधान कार्यालय

सुरत येथील सौराष्ट्र पटेल सेवा समाजने बांधलेल्या वसतिगृहाच्या पहिल्या टप्प्याच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 15 OCT 2021 11:04PM by PIB Mumbai

 

नमस्कार!

कार्यक्रमाला उपस्थित गुजरातचे मुख्यमंत्री भूपेन्द्र भाई पटेल, केंद्र सरकारमधील माझे सहकारी मनसुख़ मांडवीया पुरुषोत्तम भाई रुपाला, दर्शना बेन, लोकसभेतील माझे सहकारी खासदार आणि गुजरात भारतीय जनता पार्टीचे अध्‍यक्ष  सीआर पाटील , सौराष्ट्र पटेल सेवा समाजचे अध्यक्ष  कानजी भाई, सेवा समाजचे सर्व सन्मानित  सदस्यगण आणि मोठ्या संख्येने  उपस्थित माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,  'सौराष्ट्र पटेल सेवा समाज' द्वारा आज विजया दशमीच्या दिवशी एका पुण्य कार्याचा शुभारंभ होत आहे. मी तुम्हा सर्वांना आणि संपूर्ण देशाला विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. "

 

मित्रांनो,

रामचरित मानसमध्ये प्रभु श्रीरामाच्या भक्तांबाबत, त्यांच्या अनुयायांबाबत , अतिशय योग्य वर्णन केले आहे  रामचरित मानसमध्ये म्हटले आहे -

''प्रबल अबिद्या तम मिटि जाई।

हारहिं सकल सलभ समुदाई''

अर्थात्, भगवान रामाच्या आशिर्वादाने, त्यांचे अनुसरण केल्याने अविद्या, अज्ञान आणि  अंधकार नाहीसा होतो. ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत, त्या हार मानतात. आणि  भगवान रामाच्या  अनुसरणचा  अर्थ आहे - मानवतेचे  अनुसरण, ज्ञानाचे  अनुसरण ! म्हणूनचगुजरातच्या भूमीवरून बापूंनी रामराज्याच्या आदर्शांवर चालणाऱ्या समाजाची  कल्पना केली होती. मला आनंद आहे की गुजरातचे लोक  ती मूल्ये  मजबूतीने पुढे नेत आहेत.  'सौराष्ट्र पटेल सेवा समाज' द्वारा शिक्षण क्षेत्रात  आज हाती घेण्यात आलेला उपक्रम त्याचाच एक भाग आहे.  आज वसतिगृहाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन झाले आहे.

पर्यंत दोन्ही टप्प्यांचे काम पूर्ण केले जाईल. कितीतरी युवकांना, मुलामुलींना तुमच्या या प्रयत्नांमुळे एक नवी दिशा मिळेल, त्यांना त्यांची स्वप्ने साकार करण्याची संधी मिळेल. मी या प्रयत्नांबद्दल सौराष्ट्र पटेल सेवा समाजाचे आणि विशेषतः अध्यक्ष  कानजी भाई यांचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे खूप-खूप अभिनंदन करतो. मला याचाही खूप आनंद झाला आहे की या सेवाकार्यांमध्ये  समाजाच्या प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन चालण्याचा प्रयत्न आहे.

 

मित्रांनो,

जेव्हा मी विविध क्षेत्रांमध्ये अशा प्रकारचे सेवाकार्य पाहतो, तेव्हा मला अभिमान वाटतो की  गुजरात कशा प्रकारे सरदार पटेल यांचा वारसा पुढे चालवत आहे. सरदार साहेबांनी म्हटले होते आणि सरदार साहेबांचे वाक्य आपण आपल्या जीवनात जपून ठेवायचे आहे.  सरदार साहेबांनी म्हटले होते- जाती आणि धर्म यांना आपण अडथळा बनू द्यायचा नाही. आपण सर्व सर्व भारताची लेकरे आहोत. आपण सर्वांनी आपल्या देशावर प्रेम केले पाहिजे, परस्पर स्नेह आणि सहकार्याने आपले नशीब घडवले पाहिजे. आपण सर्व याचे साक्षीदार आहोत की सरदार साहेबांच्या या  भावनांना गुजरातने कशा प्रकारे नेहमीच बळकटी दिली आहे.  राष्ट्र प्रथम, हा  सरदार साहेबांच्या सुपुत्रांचा जीवन मंत्र आहे. तुम्ही देशात जगात कुठेही जा, गुजरातच्या लोकांमध्ये हा जीवन मंत्र तुम्हाला प्रत्येक  ठिकाणी दिसेल.

 

बंधू आणि भगिनींनो,

भारत आता आपल्या स्वातंत्र्याच्या  75 व्या वर्षात आहे. हा  अमृतकाळ आपल्याला नवीन संकल्पांबरोबरच त्या व्यक्तिमत्त्वांचे स्मरण करण्याची प्रेरणा देतो ज्यांनी जनचेतना जागृत करण्यात मोठी भूमिका बजावली. आजच्या पिढीला त्यांच्याबद्दल माहिती असणे खूप महत्वाचे आहे. आज गुजरात ज्या उंचीवर पोहचले आहे, त्यामागे अशा अनेक लोकांचा  तप-त्याग आणि तपस्या आहे. विशेषतः शिक्षण क्षेत्रात अशी व्यक्तिमत्वे होऊन गेली ज्यांनी गुजरातची शिक्षण व्यवस्था मजबूत करण्यात मोठी भूमिका बजावली.

आपल्याला सर्वांना कदाचित हे माहित असेल, उत्तर गुजरातमध्ये त्यांचा जन्म झाला आणि  आज गुजरातच्या कानाकोपऱ्यात त्यांची आठवण काढली जाते . असेच एक  महापुरुष होते  छगनभाइ . त्यांचा दृढ़ विश्वास होता की शिक्षण हेच समाजाच्या  सशक्तिकरणाचे सर्वात मोठे माध्यम आहे. तुम्ही कल्पना करू शकता , 102 वर्षांपूर्वी 1919 मध्ये त्यांनी  'कडी' मध्ये सर्व विद्यालय केलवणी मंडळाची  स्थापना केली होती. हे  छगन भाऊ, हे  दूरदृष्टिचे  काम होते. ही त्यांची दूरदृष्टि होती. त्यांचा  जीवन मंत्र होता -कर भले, होईल भले. आणि याच प्रेरणेने ते भावी पिढ्यांचे भविष्य घडवत राहिले. जेव्हा  1929 मध्ये गांधी जी, छगनजी यांच्या मंडळात आले होते तेव्हा ते म्हणाले होते की - छगनभाई खूप मोठे सेवाकार्य करत आहेत. त्यांनी लोकांना मोठ्या संख्येने आपल्या मुलांना छगनभाई यांच्या ट्रस्टमध्ये शिकण्यासाठी पाठवायचे आवाहन केले होते.

 

मित्रांनो,

देशाच्या भावी पिढीच्या भविष्यासाठी  आपला  वर्तमान खर्ची घालणाऱ्या अशाच आणखी एका व्यक्तीचा उल्लेख करायला मला नक्की आवडेल - ते होते भाई काका. भाई काका यांनी आनंद आणि  खेड़ाच्या  आसपासच्या परिसरात शिक्षण व्यवस्था  मजबूत करण्यासाठी खूप काम केले होते.  भाई काका स्वतः तर इंजीनियर  होतेकरियर उत्तम चालले होते मात्र  सरदार साहेबांनी एकदा सांगितल्यावर त्यांनी नोकरी सोडली. आणि अहमदाबाद महानगरपालिकेत काम करायला आले होते. काही काळानंतर ते चरोतर इथे गेले जिथे त्यांनी आनंद इथे चरोतर एजुकेशन सोसायटीचे काम सांभाळले. नंतर ते चरोतर विद्या मंडळात सहभागी झाले. त्याकाळी  भाईकाका यांनी एका ग्रामीण विद्यापीठाचे स्वप्न देखील पाहिले होते.  एक असे विद्यापीठ जे गावात असेल आणि ज्याच्या केंद्रस्थानी  ग्रामीण व्यवस्था  विषय असेल. याच प्रेरणेने त्यांनी सरदार वल्लभभाई विद्यापीठ निर्मितीत महत्वाची  भूमिका पार पाडली होती. असेच  भीखाभाई पटेल देखील होते ज्यांनी भाईकाका आणि  सरदार पटेल यांच्याबरोबर काम केले होते.

 

मित्रांनो,

ज्या लोकांना गुजरात बाबत कमी माहिती आहे त्यांना मला  आज वल्लभ विद्यानगर बद्दल देखील सांगायचे आहे. तुमच्यापैकी अनेकांना माहित असेल, हे ठिकाण , करमसद-बाकरोल आणि  आनंद यांच्या मध्ये आहे. हे स्थान यासाठी विकसित करण्यात आले होते जेणेकरून शिक्षणाचा प्रसार केला जाऊ शकेल , गावाच्या विकासाशी संबंधित कामांना गती देता येईल.  वल्लभ विद्यानगर बरोबर नागरी सेवेतील दिग्गज अधिकारी एच एम पटेल हे देखील जोडले गेले होते. सरदार साहेब जेव्हा देशाचे  गृह मंत्री होते, तेव्हा एच एम पटेल हे त्यांच्या निकटवर्तीय लोकांपैकी एक मानले जायचे. नंतर ते जनता पार्टीच्या  सरकारमध्ये अर्थमंत्री देखील बनले.

 

मित्रांनो,

अशी कितीतरी नावे आहेत जी आज मला आठवत आहेत.  सौराष्ट्र बद्दल बोलायचे तर आपले  मोहनलाल लालजीभाई पटेल ज्यांना आम्ही मोला  पटेल नावाने ओळखायचो.  मोला पटेल यांनी एक भव्य शैक्षणिक  परिसर निर्माण केला होता. आणखी  एक  मोहनभाई विरजीभाई पटेल यांनी शंभर वर्षांपूर्वीच्याही  आधी  'पटेल आश्रम' नावाने एक वसतिगृह स्थापना करून  अमरेली येथे शिक्षण व्यवस्था मजबूत करण्याचे काम केले होते. जामनगर मध्ये  केशावाजी भाई अरजीभाई विराणी आणि  करसनभाई बेचरभाई विराणी, यांनी अनेक दशकांपूर्वी मुलींना साक्षर करण्यासाठी शाळा आणि  छात्रालय बांधली होती. आज नगीनभाई पटेल, साकलचंद पटेल, गणपतभाई पटेल अशा लोकांनी केलेल्या प्रयत्नांचा विस्तार आपल्याला  गुजरातच्या वेगवेगळ्या विद्यापीठांच्या रूपात दिसतो.  आजची ही सुसंधी , त्यांचे स्मरण करण्याचा देखील उत्तम दिवस आहे. आपण अशा व्यक्तींच्या जीवनगाथेकडे पाहिले तर आपल्याला आढळेल की  कशा प्रकारे छोट्या छोट्या प्रयत्नांमधून त्यांनी मोठमोठी लक्ष्ये साध्य करून दाखवली. प्रयत्नांची हीच सामूहिकता मोठमोठे परिणाम घडवून दाखवते.

 

मित्रांनो,

तुम्हा सर्वांच्या  आशीर्वादाने माझ्यासारख्या अत्यंत  सामान्य व्यक्तीला , ज्याची कोणतीही कौटुंबिक किंवा राजकीय पार्श्वभूमी  नव्हती, ज्याच्याकडे जातीयवादी राजकारणाचा काही आधार नव्हता अशा माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला तुम्ही आशीर्वाद देऊन  गुजरातची सेवा करण्याची  2001 मध्ये संधी दिली. तुमच्या आशीर्वादाची ताकद एवढी मोठी आहे की आज वीस वर्षांहून अधिक काळ लोटला , तरीही  अखंडपणे , आधी गुजरातची आणि आज संपूर्ण देशाची सेवा करण्याचे सौभाग्य लाभत आहे.

 

मित्रहो,

'सबका साथ, सबका विकास' या मूलमंत्राचे सामर्थ्य काय आहे हे ही मी गुजरात कडून जाणले आहे.  एके काळी गुजरातमध्ये चांगल्या शाळांचा अभाव होता,चांगल्या शिक्षकांची कमतरता होती. उमिया मातेचा   आशीर्वाद घेऊनखोड़ल धामचे दर्शन घेऊन या समस्येचे निराकरण करण्यासाठी मी लोकांकडून सहकार्य मागितले, लोकांनाही यात सहभागी करून घेतले. आपल्याला स्मरत असेल,ही परिस्थिती बदलण्यासाठी गुजरातने प्रवेशोत्सव सुरु केला. शाळांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता वाढावी, यासाठी साक्षरदीप आणि गुणोत्सव सुरु करण्यात आला होता.

त्यावेळी गुजरातमधे, मुलींचे शिक्षण मधेच सोडून देण्याची मोठी समस्या होती. आपले मुख्यमंत्री भूपेंद्र भाई यांनी आताच याबाबत सांगितले. यामध्ये काही सामाजिक कारणेही होती, काही व्यावहारिक कारणेही होती. अनेक मुलींची इच्छा असूनही त्या शाळेत जाऊ शकत नव्हत्या कारण शाळेत मुलींसाठी शौचालयाची सुविधा नसे. या समस्येच्या निराकरणासाठी गुजरातने पंचशक्तीकडून प्रेरणा घेतली. पंचामृत म्हणजे ज्ञान शक्ती,जन शक्ती, जल शक्ती, उर्जा शक्ती आणि संरक्षण शक्ती.  शाळांमध्ये मुलींसाठी शौचालयांची निर्मिती करण्यात आली.  विद्या लक्ष्मी बॉन्ड, सरस्वती साधना योजना, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय अशा अनेक प्रयत्नांचा परिपाक म्हणजे गुजरात मध्ये शिक्षणाचा स्तर तर सुधारलाच त्याच बरोबर शाळा मधेच सोडण्याचे मुलींचे प्रमाणही वेगाने कमी झाले.

मुलींच्या शिक्षणासाठी, त्यांच्या भविष्यासाठी सातत्याने प्रयत्न वृद्धिंगत होत आहेत याचा मला आनंद आहे. मला स्मरत आहे की आपण लोकांनीच सुरत ते संपूर्ण गुजरातमध्ये बेटी बचाओ अभियान चालवले,त्या काळी मी समाजात आल्यानंतर या संदर्भात कटू बाब सांगितल्याशिवाय रहात नसे आपल्याला पटो किंवा न पटो याची तमा न करता मी नेहमीच कटू बाब सांगितली. मुलीना वाचवण्याचे आवाहन केले. मला आनंद आहे की आपण सर्वांनी प्रतिसाद दिला.सुरतहून आपण  जी यात्रा  काढली, संपूर्ण गुजरातमध्ये, समाजाच्या सर्व स्तरात जाऊन गुजरातच्या काना-कोपऱ्या त जाऊन मुलीना वाचवण्यासाठी लोकांना शपथ दिली होती.आपल्या या प्रयत्नात सहभागी होण्याची संधी मलाही मिळाली होती. आपणा सर्वांनी  सर्वतोपरी प्रयत्न केले. गुजरात ने, रक्षा शक्ती  विद्यापीठ, आताच भूपेंद्र भाई यांनी विस्ताराने या विद्यापीठाचे वर्णन केले,मात्र मी सुद्धा पुन्हा हे सांगू इच्छितो.ज्यायोगे आज देशातले लोक हा कार्यक्रम पाहत आहेत त्यानाही याबाबत माहिती मिळेल.गुजरातने अतिशय कमी काळात,रक्षा शक्ती विद्यापीठ, जगातले पहिले न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ, विधी विद्यापीठ, दीन दयाल एनर्जी विद्यापीठ,याबरोबरच जगातले पहिले बालक विद्यापीठ, शिक्षक प्रशिक्षण विद्यापीठ, क्रीडा विद्यापीठ, कामधेनु विद्यापीठ यासारख्या अनेक कल्पक उपक्रमांची सुरवात करून देशाला नवा मार्ग दाखवला आहे.या सर्व प्रयत्नांचा लाभ आज गुजरातच्या युवा पिढीला मिळत आहे. आपल्या पैकी बऱ्याच जणांना याची माहिती आहे हे मी जाणतो, आताच भूपेंद्र भाई यांनी सांगितले आहे, मात्र आज मी हे पुन्हा सांगत आहे कारण या प्रयत्नामध्ये आपण सर्वांनी मला सहकार्य केले, माझ्या बरोबरीने वाटचाल केली, आपण कधी मागे वळून पाहिले नाही.  यातून मिळालेले अनुभव आज देशात मोठे परिवर्तन घडवत आहेत.

 

मित्रहो,

आज नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून देशाची शिक्षण व्यवस्थाही आधुनिक करण्यात येत आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात व्यावसायिक अभ्यासक्रम स्थानिक भाषेत, मातृभाषेत शिकण्याचा पर्याय  देण्यात आला आहे.याचा केवढा मोठा परिणाम घडणार आहे याची जाणीव फारच कमी लोकांना आहे. गावातल्या, गरीबाचे मूलही आता आपली स्वप्ने साकार करू शकते. भाषेच्या कारणामुळे आता त्याच्या आयुष्यात कोणताही अडथळा येणार नाही. आता शिक्षणाचा अर्थ केवळ पदवी पर्यंतच मर्यादित नाही, तर शिक्षणाची सांगड कौशल्याशी घातली जात आहे. देश आपली पारंपरिक कौशल्ये आता आधुनिक संधींशी जोडत आहे.

 

मित्रहो,

कौशल्याचे महत्व काय  असते हे आपल्याशिवाय आणखी कोण जाणू शकते. एक काळ होता जेव्हा आपल्यापैकी बहुतांश लोक  सौराष्ट्रमधले आपले घर दार सोडून, शेती- वाडी, मित्र-आप्तेष्ट सोडून हिऱ्याला पैलू पाडण्यासाठी सुरतमध्ये येत असत. एका लहान खोलीत 8-8, 10-10 लोक रहात असत. आपले हे कौशल्य आहे, ज्यामुळे आपण सर्वांनी इथपर्यंत मजल मारली आहे.पांडुरंग शास्त्री जी यांनी तर आपल्याला रत्न कलाकार म्हटले होते. आपले कानजी भाई स्वतः याचे एक उदाहरण आहेत. आपल्या वयाची तमा न बाळगता,ते शिकत गेले, नव-नवी कौशल्ये आत्मसात करत गेले त्यांना आजही विचारले की कानजी भाई काही शिकत आहात का तर कदाचित ते आजही काही वाचतच असतील. ही फार मोठी बाब आहे.

 

मित्रहो,

कौशल्य आणि परिसंस्था मिळून आज नव भारताचा पाया घालण्यात येत आहे. स्टार्ट अप इंडियाचे यश आपणा समोर आहे. आज भारताचे स्टार्ट अप्स संपूर्ण जगात आपली ओळख निर्माण करत आहेत, आपल्या  युनीकॉर्न्सची संख्या विक्रम घडवत आहे. करोनाच्या खडतर काळानंतर आपली अर्थव्यवस्था ज्या वेगाने पूर्वपदावर येऊ लागली आहे, ते पाहता अवघे जग भारताकडून आशा बाळगत आहे.  एका जागतिक संस्थेने नुकतेच सांगितले आहे की भारत पुन्हा एकदा जगातली सर्वात वेगाने आगेकूच करणारी अर्थव्यवस्था होऊ लागला आहे. राष्ट्र निर्माण कार्याच्या आपल्या प्रयत्नात नेहमीच प्रमाणेच गुजरात सर्वश्रेष्ठ राहील, सर्वश्रेष्ठ कार्य करेल याचा मला विश्वास आहे. आता तर भूपेंद्र भाई पटेल आणि त्यांचे सर्व सहकारी नव्या उर्जेने गुजरातच्या  प्रगतीच्या या अभियानामध्ये काम करत आहेत.

 

मित्रहो,

भूपेंद्र भाई यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आज प्रथमच गुजरातच्या जनतेला इतक्या विस्ताराने संबोधित करण्याची संधी मला प्राप्त झाली आहे.एक सहकारी कार्यकर्ता म्हणून भूपेंद्र भाई यांच्याशी माझा परिचय 25 वर्षाहून अधिक काळ आहे. भूपेंद्र भाई हे असे मुख्यमंत्री जे तंत्रज्ञानाचे जाणकारही आहेत. वेगवेगळ्या स्तरावर काम करण्याचा त्यांचा अनुभव, गुजरातच्या विकासासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे.कधी एका छोटयाश्या नगरपालिकेचा सदस्य,नंतर नगरपालिकेचा अध्यक्ष,मग अहमदाबाद महानगरपालिकेचे नगर सेवक, मग अहमदाबाद महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष,सुमारे 25 वर्षे त्यांनी अगदी तळापासूनच्या स्तरावरून शासन- प्रशासन पाहिले आहे, पारखले आहे आणि त्याचे नेतृत्वही केले आहे. आज अशी अनुभवी व्यक्ती गुजरातचा विकासाचा प्रवास, वेग अधिक वाढवण्यासाठी गुजरातचे नेतृत्व करत आहे याचा मला आनंद आहे.

 

मित्रहो,  

आज प्रत्येक गुजराती व्यक्तीला याचा अभिमान आहे की इतक्या दीर्घ काळ सार्वजनिक जीवनात राहिल्यानंतरही, इतक्या मोठ्या पदांवर राहिल्यानंतरही, 25 वर्षे कार्य  केल्यानंतरही भूपेंद्र भाई संदर्भात यांच्या कोणताही विवाद नाही. भूपेंद्र भाई खूप कमी बोलतात मात्र  कार्यात कोणतीही कमतरता ठेवत नाहीत. एका शांत कार्यकर्त्याप्रमाणे, एका मूक सेवकाप्रमाणे काम करणे हा त्यांच्या कार्यशैलीचा भाग आहे. खूप कमी लोकांना माहित असेल की भूपेंद्र भाई यांचे कुटुंब नेहमीच अध्यात्माप्रती समर्पित राहिले आहे.त्यांचे वडील अध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित आहेत. असे उत्तम संस्कार असणारे भूपेंद्र भाई यांच्या नेतृत्वाखाली गुजरातचा सर्वागीण विकास होईल असा मला विश्वास आहे.

 

मित्रहो,

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाशी निगडीत माझी आपणा सर्वाना  एक विनंती आहे.  या अमृत महोत्सवात आपणा सर्वानी एखादा संकल्प घ्यायला हवा,देशाला काही देण्याचे अभियान सुरु करायला हवे. हे अभियान असे हवे, ज्याचा प्रभाव गुजराथच्या कानाकोपऱ्यात दिसायला हवा. आपणामध्ये इतके सामर्थ्य आहे, आपण सर्वजण एकत्रित येऊन हे करू शकता हे मी जाणतो. आपली भावी पिढीने, देशासाठी, समाजासाठी जीवन जगावे याची प्रेरणाही आपल्या प्रयत्नांचा महत्वाचा भाग असली पाहिजे. सेवा से सिद्धीहा मंत्र घेऊन वाटचाल करताना आपण गुजरातला, देशाला विकासाच्या नव्या शिखरावर घेऊन जाल.प्रदीर्घ काळानंतर आपणा सर्वांमध्ये येण्याची संधी मला मिळाली. मी दूर दृश्य प्रणाली द्वारे आपणा सर्वांचे दर्शन घेतो आहे. सर्व जुने परिचित चेहरे माझ्या समोर आहेत.

या शुभेच्छेसह आपणा सर्वाना खूप-खूप धन्यवाद !       

***

Jaydevi PS/N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1764330) Visitor Counter : 257