संरक्षण मंत्रालय

भारतीय वायुदलाचे रत्नागिरीतील पूर मदतकार्य

Posted On: 23 JUL 2021 8:28PM by PIB Mumbai

 

महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण आणि खेड शहरांमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे मदतीची गरज असल्याचा संदेश भारतीय वायुदलाला दि. 22 जुलै 2021 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मिळाला. हवामान काहीसे अनुकूल होताच दुपारी 3:40 वाजता एमआय-17 IV प्रकारचे एक हेलिकॉप्टर मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने झेपावले आणि 5 वाजता रत्नागिरीत उतरले. मात्र खराब हवामानामुळे संध्याकाळपर्यंत मदतकार्यासाठी कोणतीही हालचाल करता आली नाही.

रत्नागिरीत पाठवलेल्या हेलिकॉप्टरच्या सहकार्यासाठी मुंबईहून आणखी एक हेलिकॉप्टर पाठवण्यात आले असून, दोन्हींच्या साहाय्याने आज मदतकार्याला पुन्हा सुरुवात झाली. एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 10 जवानांच्या पथकासह सुमारे एक टन वजनाची सामग्रीही भारतीय वायुदलाने रत्नागिरीला पाठवली आहे.

आज सकाळी 11:35 वाजता रत्नागिरीहून एका हेलिकॉप्टरने उड्डाण केले, मदत्कार्याच्या दृष्टीने परिसराचे सर्वेक्षण करून व रत्नागिरीत परतण्यापूर्वी या हेलिकॉप्टरने दोन व्यक्तींची सुखरूप सुटका केली. याखेरीज, भारतीय वायुदल पूरस्थितीतील मदतकार्यासाठी दोन एमआय-17V5 आणि दोन एमआय-17 पाठवत आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीची गरज उद्भवली असता, पुण्यात आणखी एक हेलिकॉप्टर मदतीसाठी तयार ठेवण्यात आले आहे.

  

***

G.Chippalkatti/J.Waishampayan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1738314) Visitor Counter : 152