पंतप्रधान कार्यालय

टोकियो ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या भारतीय क्रीडापटूंच्या पथकाशी पंतप्रधानांनी साधला संवाद


खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबर एक अनौपचारिक, उत्स्फूर्त सत्र घेतले

135 कोटी भारतीयांच्या शुभेच्छा तुमच्या सर्वांसाठी देशाचे आशीर्वाद आहेतः पंतप्रधान

खेळाडूंना उत्तम प्रशिक्षण शिबिरे, उपकरणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी पुरवण्यात आली आहेः पंतप्रधान

आज एक नवीन विचार आणि नवीन दृष्टिकोन घेऊन देश प्रत्येक खेळाडूच्या पाठीशी कसा उभा आहे याचा अनुभव खेळाडू घेत आहेत : पंतप्रधान

प्रथमच, इतक्या मोठ्या संख्येने आणि तेही विविध क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत : पंतप्रधान

असे अनेक खेळ आहेत ज्यात भारत प्रथमच पात्र ठरला आहेः पंतप्रधान

‘‘Cheer4India ’ ची जबाबदारी देशवासियांची आहे:पंतप्रधान

Posted On: 13 JUL 2021 8:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 जुलै 2021

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला जाणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या पथकाशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी या संवादाद्वारे केला. युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री  निसिथ प्रामाणिक आणि कायदे  मंत्री  किरेन रिजिजू देखील यावेळी उपस्थित होते.

या अनौपचारिक आणि उत्स्फूर्त संवादात पंतप्रधानांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले  आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या त्यागाबद्दल त्यांचे आभार मानले. दीपिका कुमारी (तिरंदाजी) हिच्याशी  बोलताना पंतप्रधानांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल तिचे अभिनंदन केले. तिचा प्रवास तिरंदाजीद्वारे  आंबा तोडण्यापासून सुरू झाल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला आणि एक क्रीडापटू म्हणून तिच्या प्रवासाची विचारपूस केली. कठीण परिस्थितीतही मार्गावर कायम राहिल्याबद्दल प्रवीण जाधव (तिरंदाजी) याचे पंतप्रधानांनी  कौतुक केले. पंतप्रधानांनी त्यांच्या कुटुंबियांशी देखील संवाद साधला आणि त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. मोदींनी त्याच्या  कुटुंबियांशी मराठीत संवाद साधला.

नीरज चोप्रा (भाला फेक) याच्याशी बोलताना पंतप्रधानांनी भारतीय सैन्यातील त्याच्या अनुभवाविषयी आणि दुखापतीतून बरे होण्याविषयी विचारपूस केली.  मोदींनी त्याला अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून न जाता आपले सर्वोत्तम योगदान देण्यास सांगितले. दुती चंद (स्प्रिंट) हिच्याशी बोलताना  मोदींनी तिच्या नावाचा अर्थ "तेजस्वी " असा सांगितला आणि  क्रीडा कौशल्याद्वारे प्रकाश पसरवल्याबद्दल  तिचे कौतुक केले. संपूर्ण भारत खेळाडूंच्या पाठीशी आहे असे सांगत पंतप्रधानांनी तिला निर्भयपणे पुढे जाण्यास सांगितले.  पंतप्रधानांनी आशिष कुमार (मुष्टियुद्ध ) याला विचारले की त्याने बॉक्सिंग खेळ का निवडला.   कोविड -19 शी कसा लढा दिला आणि आपले प्रशिक्षण कसे सुरु ठेवले याबाबत पंतप्रधानांनी जाणून घेतले.  वडिलांच्या निधनानंतरही तो आपल्या लक्ष्यापासून दूर गेला नाही याबद्दल पंतप्रधानांनी त्याचे कौतुक केले. तंदुरुस्त होण्याच्या प्रक्रियेत कुटुंब आणि मित्रांचा पाठिंबा महत्वपूर्ण होता अशी आठवण त्याने सांगितली.  अशाच स्पर्धेदरम्यान  क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या वडिलांचे निधन झाले होते आणि त्यांनी आपल्या खेळातून आपल्या वडिलांना कशी मानवंदना दिली याची आठवण  मोदींनी सांगितली.

अनेक खेळाडूंसाठी रोल मॉडेल असल्याबद्दल  मेरी कोम  (बॉक्सिंग) हिचे पंतप्रधानांनी कौतुक केले. विशेषतः महामारी दरम्यान तिने आपल्या कुटुंबाची देखभाल कशी केली आणि आपला  खेळ कसा पुढे चालू ठेवला  याचीही त्यांनी  चौकशी केली. पंतप्रधानांनी तिचा आवडता पंच(ठोसा)  आणि तिच्या आवडत्या खेळाडूबद्दल तिला विचारले. त्यांनी तिला शुभेच्छा दिल्या. पीव्ही सिंधू (बॅडमिंटन) हिच्याशी बोलताना पंतप्रधानांनी हैदराबादच्या गचीबावली येथे सुरु असलेल्या तिच्या सरावाबद्दल विचारले. तसेच तिच्या प्रशिक्षणात आहाराचे महत्त्वही जाणून घेतले.  पंतप्रधानांनी तिच्या पालकांना आपल्या मुलांना क्रीडापटू बनवू इच्छिणाऱ्या पालकांना सल्ला आणि मौलिक सूचना करायला सांगितल्या.  ऑलिम्पिक स्पर्धेत यश मिळवण्यासाठी तिला  शुभेच्छा देताना पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा खेळाडू मायदेशी परतल्यावर ते स्वागत करतील  तेव्हा तेही तिच्याबरोबर आईस्क्रीम खातील.

पंतप्रधानांनी इलावेनिल वलारीवन (नेमबाजी ) हिला  विचारले की तिला या खेळामध्ये रस का आहे?  मोदींनी  अहमदाबादमध्ये वाढलेल्या नेमबाजपटूशी गुजराती भाषेत संवाद साधला आणि त्यांनी तिच्या पालकांना तमिळ भाषेत शुभेच्छा दिल्या.  आणि ती राहत असलेल्या मणिनगरचे आपण आमदार होतो अशी आठवणही सांगितली. अभ्यास आणि क्रीडा प्रशिक्षण या दोहोंमध्ये ती कसा समतोल साधते याची त्यांनी चौकशी केली.

एकाग्रता आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी योगाच्या भूमिकेबद्दल पंतप्रधानानी  सौरभ चौधरी (नेमबाजी ) याच्याशी संवाद साधला.  पंतप्रधानांनी अनुभवी खेळाडू शरथ कमल (टेबल टेनिस) याला  मागील ऑलिम्पिक आणि आताचे  ऑलिम्पिकमधील फरक विचारला  आणि महामारीच्या परिणामाबद्दल जाणून घेतले. मोदी म्हणाले की त्याचा प्रदीर्घ अनुभव संपूर्ण पथकाला मदत करेल. आणखी एक टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रा हिने गरीब मुलांना या खेळाचे प्रशिक्षण दिल्याबद्दल पंतप्रधानांनी तिचे कौतुक केले. खेळताना ती हातात तिरंगा परिधान करत असल्याच्या सवयीचा त्यांनी उल्लेख केला.  तिला नृत्य करण्याची आवड असून यामुळे तिला खेळात तणाव दूर करायला मदत होते का असे त्यांनी विचारले.

पंतप्रधानांनी कुस्तीपटू विनेश फोगटला विचारले की, कुस्ती खेळाच्या  कौटुंबिक वारशामुळे वाढलेल्या अपेक्षांचा ती कशाप्रकारे सामना करते. तिच्या आव्हानांचा संदर्भ देताना, पंतप्रधानांनी विचारले की तिने त्या आव्हानांचा कशाप्रकारे सामना केला त्यांनी तिच्या वडिलांशीही चर्चा केली आणि अशा नामांकित मुलींच्या संगोपन करण्याच्या पद्धतींबद्दल विचारले. जलतरणपटू साजन प्रकाश याला झालेल्या गंभीर दुखापतीबद्दल पंतप्रधांनी त्याची चौकशी केली आणि या दुखापतीवर कशाप्रकारे मात केली याबद्दल विचारणा केली.

हॉकीपटू मनप्रीत सिंगशी बोलताना पंतप्रधान म्हणाले,मनप्रीतशी  संवाद साधताना  मेजर ध्यानचंद यांसारख्या  हॉकीतील  महान खेळाडूंची  आठवण येते आणि मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील हॉकी संघ हा  वारसा टिकवून ठेवेल अशी आशा व्यक्त केली.

टेनिसपटू सायना मिर्झासमवेत पंतप्रधानांनी टेनिस खेळाच्या वाढत्या   लोकप्रियतेबद्दल भाष्य केले आणि वरिष्ठ टेनिसपटू म्हणून उदयोन्मुख टेनिसपटूंना सल्ला देण्याबाबत विचारले. टेनिसमधील तिच्या जोडीदाराबरोबरच्या तिच्या खेळातील समीकरणांबद्दलही त्यांनी चौकशी केली. गेल्या 5-6  वर्षांत खेळात कोणते बदल तिला दिसून आले याबाबतही त्यांनी सानिया मिर्झाला विचारणा केली. यावर बोलताना  तिने सांगितले की, अलिकडच्या वर्षांत भारतात  आत्मविश्वास दिसत आहे आणि हा आत्मविश्वास कामगिरीमध्ये प्रतिबिंबित होईल.

भारतीय क्रीडापटूंना  संबोधित करतांना, महामारीमुळे ते क्रीडापटूंचे  आदरातिथ्य  करू शकले नाहीत  याबद्दल पंतप्रधानांनी दिलगिरी व्यक्त केली. महामारीमुळे खेळाडूंचा सराव आणि ऑलिम्पिकचे वर्षदेखील बदलले आहे याचाही त्यांनी उल्लेख केला. 'मन की बात' च्या माध्यमातून त्यांनी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा उत्साह वाढविण्याच्या दृष्टीने  त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देशातील नागरिकांना उद्युक्त केले याची आठवण त्यांनी करून दिली. त्यांनी #Cheer4India ला मिळत असलेली लोकप्रियता  संवाद साधताना नमूद केली. ते म्हणाले की, संपूर्ण देश ऑलिम्पिकपटुंच्या मागे उभा आहे आणि सर्व देशवासीयांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत. लोक नमो अॅपवर लॉग इन करू शकतात आणि खेळाडूंना प्रोत्साहन देऊ शकतात यासाठी खास तरतूद करण्यात आली आहे , अशी माहिती त्यांनी दिली.  ''खेळाच्या मैदानात उतरण्यापूर्वी 135 कोटी भारतीयांच्या शुभेच्छा ऑलिम्पिकपटूसाठी देशाचा आशीर्वाद आहेत''  असे पंतप्रधान म्हणाले.

 

 

क्रीडापटूंमधील धाडस , आत्मविश्वास व सकारात्मकता अशी सामायिक  गुणांची पंतप्रधानांनी दखल घेतली. ते म्हणाले की सर्व खेळाडूंमध्ये  शिस्त, समर्पण आणि निर्धार हे  समान घटक आहेत. पंतप्रधानांनी खेळाडूंमधील बांधिलकी आणि स्पर्धात्मकता या दोन्ही गोष्टी नमूद केल्या. हेच गुण नव्या भारतात आढळतात. खेळाडू हे नव्या भारताचे  प्रतिबिंब आहेत आणि ते देशाच्या भविष्याचे प्रतीक आहेत , असे पंतप्रधान म्हणाले. .

 

 

नवीन विचार आणि नवीन दृष्टिकोन घेऊन देश प्रत्येक खेळाडूच्या मागे कसा उभा आहे याचे सर्व खेळाडू साक्षीदार आहेत. आज तुमची  प्रेरणा देशासाठी महत्त्वपूर्ण आहे.असे ते म्हणाले की, क्रीडापटूंनी मुक्तपणे आणि संपूर्ण क्षमतेने खेळण्यास  आणि त्यांचा खेळ व तंत्र सुधारण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.  खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी अलिकडच्या वर्षांत करण्यात आलेले बदल पंतप्रधानांनी नमूद केले.  पंतप्रधान म्हणाले की, खेळाडूंना चांगली प्रशिक्षण शिबिरे व उत्तम सामग्री उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. आज, खेळाडूंना अधिकाधिक  आंतरराष्ट्रीय संधीदेखील प्रदान केल्या जात आहेत. ते म्हणाले क्रीडा संबंधित संस्थांनी खेळाडूंच्या सूचनांना प्राधान्य दिल्याने इतक्या कमी वेळात बरेच बदल झाले आहेत.पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला.ते म्हणाले की,  ‘फिट इंडिया’, ‘खेलो इंडिया’ यांसारख्या  मोहिमांचे यात योगदान आहे.

पहिल्यांदाच भारतीय  खेळाडू बर्‍याच क्रीडाप्रकारांमध्ये  भाग घेत आहेत.असे अनेक खेळ आहेत ज्यात ज्यात भारतीय खेळाडू पहिल्यांदाच पात्र ठरले आहेत, असे त्यांनी सांगितले.  

 

 

तरुण भारताचा आत्मविश्वास आणि उर्जा पाहून  आशावाद  व्यक्त करत पंतप्रधान म्हणाले की, तो दिवस लांब नाही ज्यादिवशी फक्त विजयच नव्या भारताच्या सवयीचा होईल, त्यांनी खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरी करण्याचा  सल्ला देत देशवासियांना “Cheer4India' चे आवाहन केले. 

 

* * *

M.Chopade/S.Kane/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1735210) Visitor Counter : 264