श्रम आणि रोजगार मंत्रालय

गंगवार  यांनी कोविड -19 महामारीच्या प्रभावाचा  प्रतिकार करण्यासाठी भारताच्या वचनबद्धतेचा केला पुनरुच्चार, आयएलसीच्या 109 व्या सत्राला केले संबोधित

Posted On: 05 JUN 2021 8:05PM by PIB Mumbai

 

केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) संतोष गंगवार यांनी महामारीच्या प्रभावाचा सामना करण्यासाठी आणि अधिक सामर्थ्यवान बनण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या दिशेने  भारताच्या वचनबद्धतेचा  पुनरुच्चार केला आहे. काल संध्याकाळी आयएलसीच्या 109 व्या अधिवेशनामध्ये अलिप्त राष्ट्र चळवळ संघटनेच्या सदस्य देशांच्या कामगार मंत्र्यांच्या बैठकीला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करतांना गंगवार म्हणाले की  जगाने जीवित आणि उपजीविकेची हानी , अर्थव्यवस्थेची मंदी, समाजातील सर्व घटकांवर विशेषतः दुर्बल लोकांवर प्रतिकूल परिणाम झालेला पाहिला आहे.  ते म्हणाले, आरोग्य सेवा प्रणाली, सामाजिक संरक्षण आणि रोजगार निर्मितीला अधिक पाठिंबा  देण्याची गरज आहे. सरकारने व्यवसायातील सातत्य, उत्पन्नाची सुरक्षा आणि सर्वांच्या कल्याणासाठी  महामारीचा सामना करण्यासाठी आणि धोरणात्मक पातळीवर प्रभावी प्रतिसाद  देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले की भारताने मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेतली असून आतापर्यंत एकूण 223 दशलक्ष लसीच्या मात्रा दिल्या गेल्या आहेत. ते म्हणाले, जीवन आणि उपजीविकेमध्ये आमूलाग्र  बदल झाले आहेत आणि कामाच्या शैलीसाठी नवीन दृष्टीकोन विकसित केला पाहिजे. डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वापराने आव्हाने निर्माण केली आहेत , तशा  अधिक संधी देखील उपलब्ध करून दिल्या आहेत. ते म्हणाले की, गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी भारताने कायदेशीर चौकट तयार केली आहे.

गंगवार म्हणाले, रोजगार हा एक महत्वाचा पैलू असून आरोग्य आणि आर्थिक आघाडीवर रोजगार व आधार पुरवण्यासाठी  भारत विविध योजना व कार्यक्रमांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण प्रयत्न करत आहे. भारताने अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आत्मनिर्भरतेसाठी 27 हजार अब्ज रुपयांच्या  पॅकेजची घोषणा केली.  ज्यात पात्र नवीन कर्मचार्‍यांच्या बाबतीत सरकारकडून वेतनाच्या 24% पर्यंत  ईपीएफ योगदानाचा भरणा देखील केला आहे. तसेच गेल्या तीन वर्षांत मुद्रा योजनेंतर्गत नऊ हजार अब्ज डॉलर्सचे तारण मुक्त कर्ज वितरित  केले असून यामध्ये महिलांची सुमारे 70% खाती आहेत.

ते म्हणाले की, ग्रामीण भारतासाठी मनरेगा योजनेंतर्गत दैनंदिन  वेतनात वाढ झाल्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात 3.9 अब्ज मनुष्य दिवसांचे रोजगार निर्माण झाले आहेत.

***

S.Patil/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1724794) Visitor Counter : 155