पंतप्रधान कार्यालय

आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा सहकार्याच्या (CDRI) वार्षिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण

Posted On: 17 MAR 2021 9:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 मार्च 2021

फिजी चे पंतप्रधान,

इटलीचे पंतप्रधान ,

इंग्लंडचे पंतप्रधान,

मान्यवर,

राष्ट्रीय सरकारांमधले सहभागी प्रतिनिधी,

आंतरराष्ट्रीय संस्थांचे तज्ञ,

शैक्षणिक संस्था आणि खाजगी संस्थांचे प्रतिनिधी. 

आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा सहकार्य म्हणजेच CDRI ची ही तिसरी वर्षिक परिषद असून अत्यंत अभूतपूर्व परिस्थितीत ही होत आहे. सध्या आपण एका अशा आपत्तीचा सामना करतो आहोत- शतकात एखादे वेळी येणारे संकट असे- जिचे वर्णन करता येईल ते आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे. कोविड-19 महामारीने आपल्याला शिकवले आहे की एक परस्परावलंबी आणि परस्परांशी संलग्न असे जग- ज्यात श्रीमंत-गरीब देश असोत किंवा पूर्वेकडील असोत की पश्चिमेकडील देश, उत्तरेतील किंवा दक्षिणेतील असो-असे कोणतेही देश, जागतिक आपत्तींपासून, त्यांच्या परिणामांपासून सुरक्षित राहू शकत नाही.

इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात भारतीय अभ्यासक, नागार्जुन यांनी परस्पर समन्वयाच्या जीवनशैलीविषयीचे काव्य म्हणजेच प्रतीत्यसमुत्पाद काव्ये लिहिण्यात आली आहेत. यात नागार्जुन यांनी मानवांसहित सर्व गोष्टींचा परस्पर संबंध आणि परस्परावलंबित्व दाखवले आहे. कशाप्रकारे नैसर्गिक सामाजिक विश्वात मानवी जीवन कसे उलगडत जाते, हे यातून आपल्याला स्पष्ट होते आहे.  जर आपण प्राचीन ज्ञानाचे सखोल अध्ययन केले तर आपण आजच्या जागतिक व्यवस्थेसमोर असलेल्या आपदांचा सामना करू शकतो, या आपत्तींचा प्रभाव कमी करु शकतो.एकीकडे कोरोनाने आपल्याला शिकवले की कशाप्रकारे अत्यंत वेगाने एखाद्या महामारीचा परिणाम  संपूर्ण जगावर होऊ शकतो. आणि त्याचवेळी दुसरीकडे आपण हे ही पहिले की एका सामाईक संकटाचा सामना करण्यासाठी जग कसे एकत्र येऊ शकते. मानवी बुद्धीमत्तेतून अत्यंत कठीण प्रश्नही कसे सोडवले जाऊ शकतात, हे ही आपण या काळात अनुभवले. आपण अगदी विक्रमी वेळेत लस विकसित केली.

जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठीची कल्पकता आणि संशोधन कुठेही केले जाऊ शकते, हे आपण पहिले. आता या संशोधक आणि नवोन्मेशी वृत्तीची जोपासना करणे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी जगातल्या सर्व भागात एक जागतिक व्यवस्था तयार करणे आपले काम आहे. तसेच या संशोधनांची जिथे सर्वाधिक गरज आहे, तिथे हे पोचवायला हवे आहे.

2021 हे वर्ष या महामारीच्या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडण्याचे आश्वासक वर्ष आहे. मात्र, या महामारीतून आपल्याला मिळालेले धडे आपण कधीही विसरायला नकोत. ते केवळ सार्वजनिक आरोग्यविषयक आपत्तींनाच नाही, तर इतर सर्व आपत्तींसाठीही लागू आहेत. आपल्यासमोर, हवामान बदलाचे गंभीर संकट आहे. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण प्रमुखांनी अलीकडेच म्हटल्याप्रमाणे, हवामान बदलाच्या संकटासाठी कुठलीही लस नाही केवळ आपल्या सातत्यपूर्ण आणि एकत्रित प्रयत्नांतूनच आपण हवामान बदलाच्या संकटाचा सामना करु शकतो. आज वातावरणात होणारे जे बदल आपण अनुभवतो आहोत आणि जगभरातल्या मानवी समुदायांवर  ज्याचा परिणाम जाणवतो आहे, त्या बदलांशी आपण जुळवून घ्यायला हवे. अशा परिस्थितीत, आपल्या सहकार्याचे महत्व अधिकच असल्याचे अधोरेखित झाले आहे. जर आपण आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करू शकलो, तर ती आपल्या हवामान बदलाच्या सर्व प्रयत्नांमधली मध्यवर्ती उपाययोजना ठरू शकेल. भारतासारखे जे देश पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत, त्यांनी हे सुनिश्चित करायला हवे की गुंतवणूक धोक्यासाठीची नाही तर धोक्याच्या प्रतिबंधनासाठी असेल. मात्र अलीकडच्या काही आठवड्यातील घटना बघता, ही केवळ विकसनशील देशांची समस्या उरलेली नाही, हे ही दिसते आहे.

गेल्या महिन्यातच, अमेरिकेत टेक्सास येथे आलेल्या ‘उरी’ या हिमवादळाचा, तिथल्या एक-तृतीयांश वीजनिर्मिती क्षमतेवर विपरीत परिणाम झाला. सुमारे तीस लाख लोकांचा वीजपुरवठा त्यामुळे खंडित झाला होता. अशा घटना कुठेही होऊ शकतात. वीजपुरवठा खंडित होण्याची निश्चित कारणे जरी अद्याप स्पष्ट झालेली नसली, तरीही आपण अशा घटनांपासून धडा घेत, अशा घटना रोखण्याची व्यवस्था विकसित करायला हवी.

अनेक पायाभूत व्यवस्था- डिजिटल पायाभूत सुविधा, जहाज वाहतूक यंत्रणा आणि हवाई वाहतूक व्यवस्था विश्वव्यापी आहेत. जगाच्या एखाद्या भागात झालेल्या आपत्तींचा परिणाम त्वरित आणि सहजच इतर भागांवरही होऊ शकतो.त्यामुळेच, या जागतिक यंत्रणांना अशा आपत्तींपासून सुरक्षित ठेवण्यासाठी परस्पर सहकार्य अनिवार्य आहे. पायाभूत सुविधा दीर्घकाळासाठी विकसित केल्या जातात. जर आपण त्या प्रतिरोधक क्षमता असलेल्या निर्माण केल्या, तर आपण केवळ आपलेच नाही, तर येणाऱ्या पिढ्यांचेही अशा आपत्तींपासून संरक्षण करु शकतो. जेव्हा एखादा पूल कोसळतो, एखादा टेलीकॉम टॉवर बंद पडतो, वीजव्यवस्था  बंद पडते किंवा जेव्हा एखाद्या शाळेची इमारत मोडकळीस येते, तेव्हा होणारे नुकसान केवळ थेट पायाभूत सुविधांचे नुकसान नसते. त्याच्यामुळे होणाऱ्या सर्वसमावेशक नुकसानाकडे आपण बघायला हवे. छोट्या व्यवसायांना अशा आपत्तींमुळे होणारे अप्रत्यक्ष नुकसान, आणि शाळांची होणारी हानी खूप मोठी असते. म्हणूनच आपण अशावेळी परिस्थितीचे सर्वंकष अवलोकन करण्याचा दृष्टीकोन बाळगायला हवा. जर आपण आपल्या पायाभूत सुविधा आपत्ती प्रतिरोधक बनवल्या, तर आपण संकटांचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणामही कमी करू शकू आणि त्यायोगे लक्षावधी लोकांच्या आयुष्याचे संरक्षण करू शकू.

आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा सहकार्य स्थापनेच्या काळात,भारतासोबतच आपल्याला लाभलेल्या इंग्लडच्या नेतृत्वाबद्दल आपण ऋणी आहोत. वर्ष 2021 हे विशेष महत्वाचे वर्ष ठरले. आपण आता, पॅरीस करार आणि सेंदाई आराखडा आणि शाश्वत विकास उद्दिष्टप्राप्तीच्या मध्यबिंदूपर्यंत पोहोचलो आहोत. इंग्लंडमध्ये या वर्षीच्या अखेरीस होणाऱ्या कॉप-26 कडून सर्वांच्याच मोठ्या अपेक्षा आहेत.

या अशा काही अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी, प्रतिरोधक पायाभूत सुविधांबाबतची भागीदारी अत्यंत महत्वाची भूमिका बजावणारी आहे. याच अनुषंगाने, मला मला अशा काही महत्वांच्या क्षेत्रांकडे लक्ष वेधायचे आहे, ज्यांचा प्राधान्याने विचार होणे गरजेचे आहे: पहिले म्हणजे, CDRI ने शाश्वत विकासाच्या उद्दिष्टाचे मध्यवर्ती वचन –कोणीही मागे राहणार नाही- अंगीकारायला हवे. याचा अर्थ आपल्याला, सर्वाधिक दुर्बल देशांच्या आणि समुदायांच्या समस्या प्राधान्याने हाताळायला हव्यात. याच संदर्भात, छोटी विकसनशील बेटे असलेल्या देशांना आधीपासूनच या आपत्तींचा सामना करावा लागतो आहे, अशा सर्व देशांना त्यांचा सामना करण्यासाठीचे तंत्रज्ञान, ज्ञान आणि सहायता सहज उपलब्ध व्हायला हवी.आपल्याकडे, स्थानिक समस्यांचा सामना करण्यासाठीच्या जागतिक उपाययोजना पोचवण्याची आणि मदत करण्याची क्षमता असायलाच हवी. दुसरे, आपण काही महत्वाच्या पायाभूत सुविधा क्षेत्रांमधील कार्यक्षमतेचा वेळोवेळी आढावा घ्यायला हवा. विशेषतः आरोग्य सुविधा, ज्यांनी या महामारीच्या काळात मध्यवर्ती आणि महत्वाची भूमिका बजावली आहे. या क्षेत्रांकडून आपल्याला कोणते धडे मिळालेआणि आपण भविष्यात त्यांना

अधिकाधिक आपत्ती प्रतिरोधक कसे बनवू शकू, याचा विचार व्हायला हवा. राष्ट्रीय आणि उप-राष्ट्रीय पातळीवर आपल्याला एकात्मिक नियोजन, संरचनात्मक डिजाईन, आधुनिक साधनांची उपलब्धता, पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठ्या संख्येने कुशल मनुष्यबळाची उपलब्धता, यात आपल्याला अधिकाधिक गुंतवणूक करावी लागेल. त्यासाठी,या सर्व क्षेत्रात संशोधन आणि विकासाची आवश्यकता आहे. तिसरे, प्रतिरोधक क्षमतेच्या आपल्या शोधात, कोणतीही तंत्रज्ञानात्मक व्यवस्था आपण अत्यंत मूलभूत किंवा अत्यंत आधुनिक समजायला नको. CDRI ने तंत्रज्ञानाच्या वापराच्या प्रत्यक्ष परिणामांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून घ्यायला हवा. गुजरात मध्ये आम्ही भारतातील पहिले विलग पाया तंत्रज्ञान (base isolation techniques) असलेले रुग्णालय बांधले आहे. आता भूकंप सुरक्षेसाठीचे  बेस आयसोलेटर्स, भारतातच तयार केले जाता. सध्याच्या परिस्थितीत आमच्यासमोर इतर अनेक संधी आहेत. आपण भू-अवकाशीय तंत्रज्ञान, अवकाश-अआधारित क्षमता, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, पदार्थ विज्ञान, या सगळ्या तंत्रज्ञानांचा पूर्ण क्षमतेने वापर करायला हवा  तसेच स्थानिक ज्ञान आणि अनुभवांशी त्याची सांगड घालून, आपली प्रतिरोधक क्षमता  विकसित करायला हवी. आणि शेवटी, ‘प्रतिरोधक पायाभूत सुविधा’ एक जनचळवळ व्हायला हवी, ज्यात केवळ तज्ञांचीच, किंवा संस्थांचीच नव्हे, तर समुदाय विशेषतः युवकांचाही सहभाग असायला हवा. अशा प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठीच्या सामाजिक मागणीमुळे त्यांच्या मानकांची परिपूर्ती करण्यास बळ मिळेल. जनजागृती आणि जनशिक्षणात गुंतवणूक या क्षेत्राच्या प्रगतीसाठीचा महत्वाचा घटक ठरेल. आपल्या  शैक्षणिक व्यवस्थांनी स्थानिक पातळीवर असलेले अडथळे आणि त्यांचा पायाभूत सुविधांवर होणारा परिणाम यांच्याविषयी जागृती करायला हवी.

शेवटी, मला सांगायला आवडेल की CDRI ने स्वतः साठी एक आव्हानात्मक आणि तातडीचा अजेंडा निश्चित केला आहे. आणि त्याचे परिणाम आपल्याला लवकरच दिसू शकतील. पुढच्या चक्रीवादळाच्या, पुढच्या पुराच्या किंवा भूकंपाच्या संकटकाळी आपण हे म्हणू शकण्यास सक्षम असलो पाहिजे की आपल्या पायाभूत व्यवस्था आधी भक्कम असल्याने ह्या संकटांचा प्रभाव कमी करण्यात आपण सज्ज होतो . जर नुकसान झालेच, तर आपण ते भरून काढत, परिस्थिती लवकरात लवकर पूर्वपदावर आणण्यासाठी तयार असले पाहिजे. आपण सगळे सध्या एकाच परिस्थितीतून जात आहोत. या महामारीने आपल्याला धडा दिला आहे की जोपर्यंत सर्व जण सुरक्षित नाही, तोपर्यंत आपण कोणीही सुरक्षित नाही! त्यामुळेच आपल्याला हे सुनिश्चित करावे लागेल, की कोणताही समुदाय, कोणतीही जागा, कोणतीही व्यवस्था आणि कोणतीही अर्थव्यवस्था(देश) या उपाययोजनांत मागे राहणार नाही. या महामारीशी लढतांना जशाप्रकारे,जगभरातील सात अब्ज मनुष्यबळाची ऊर्जा एकत्रित आली आहे, तशाचप्रकारे प्रतिरोधक क्षमता निर्माण करण्याचे आपले प्रयत्नही  सर्वांच्या पुढाकाराने आणि या पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीच्या कल्पनाशक्तीचा वापर करून एकत्रितपणे केले जायला हवेत.

खूप खूप धन्यवाद ! 

 

M.Chopade/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1705629) Visitor Counter : 382