वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी फिक्कीच्या उच्च शिक्षण परिषदेला केले संबोधित;


राष्ट्रीय शिक्षण धोरण भारताला ज्ञानाची वैश्विक राजधानी करेल-पीयूष गोयल

Posted On: 26 FEB 2021 4:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2021

राष्ट्रीय शिक्षण धोरणात (एनईपी) मध्ये नाविन्यता, उद्यमशीलता आणि कौशल्य विकासावर भर देण्यात आला आहे, असे रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी आज सांगितले. फिक्कीच्या उच्च शिक्षण परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, आपल्या मुलांना शिक्षित करण्याच्या पद्धतीत शिक्षण धोरण परिवर्तन करेल. या धोरणात शिक्षण आणि ज्ञानाचा विस्तार करण्याच्या आग्रहामुळे या उपक्रमाला नवी झेप मिळेल आणि भारत ज्ञानाची वैश्विक राजधानी होईल.

गोयल म्हणाले की, राष्ट्रीय शिक्षण धोरणासह देशातल्या प्रत्येक मुलाला समान दर्जाचे शिक्षण मिळण्याचा हक्क मिळतो आहे, याचा आपल्याला अभिमान वाटेल.  हे धोरण विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात अधिक सर्जनशीलतेला वाव देते. ते पुढे म्हणाले, विस्तृत सल्लामसलतीनंतर हे धोरण तयार करण्यात आले आहे आणि म्हणूनच ते व्यापक स्तरावर स्वीकारण्यात आले आहे.

मंत्री म्हणाले, जर आपण व्यक्तिमत्व विकासावर लक्ष केंद्रित केले, जबाबदारी आणि नैतिक विज्ञान शिकविले, त्यांना उत्तम नागरिक होण्यासाठी तयार केले, राष्ट्रवादाची चेतना बिंबवली आणि वाचनाची सवय लावली तर आपल्या मुलांना शिक्षित करण्याची पद्धत पुन्हा परिभाषित होईल. विकसित देशांमधले विद्यार्थी आपल्या देशात अगदी आयआयटी आणि आयआयएम व्यतिरिक्त इतर संस्थांमध्येही उच्च शिक्षण घेण्यासाठी येऊ शकतील  असा स्तर भारतीय शिक्षण व्यवस्थेला प्राप्त करावा लागेल, असे त्यांनी सांगितले. राष्ट्राच्या उभारणीतले योगदान तसेच  भविष्याला सामोरे जाण्यासाठी आणि दारिद्रय निर्मूलन करण्यासाठी, शाळा आणि शिक्षकांची मंत्र्यानी प्रशंसा केली. गोयल म्हणाले की, शिक्षण हे मोठे तुल्यबळ आहे. सर्वांना सामर्थ्य देते आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करते.

 

S.Thakur/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1701086) Visitor Counter : 172