पंतप्रधान कार्यालय

दिल्लीत करिअप्पा मैदानावर राष्ट्रीय छात्र सेनेच्या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 28 JAN 2021 8:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 जानेवारी 2021

 

देशाचे संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह जी, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत, लष्कर, नौदल आणि हवाई दल प्रमुख, संरक्षण सचिव, एनसीसी चे महासंचालक आणि देशभरातून इथे जमलेले, राष्ट्रप्रेमाच्या उर्जेने भरलेले एनसीसी कॅडेट्स !

तुमच्यासारख्या युवकांसोबत जेवढे क्षण घालवण्याची संधी मला मिळते, तो सगळा अनुभव अत्यंत सुखद असतो. आता आपण इथे जे पथसंचालन केले, काही छात्रसैनिकांनी पॅरा सेलिंगची कौशल्ये दाखवलीत, इथे जे सांस्कृतिक कार्यक्रम झाले, ते सगळे बघून केवळ मलाच नाही, तर आज टीवीच्या माध्यमातून देखील जे लोक बघत आहेत, त्या सर्वांना तुमच्याविषयी अत्यंत अभिमान वाटत असेल. देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे येत आपण सरावांनी 26 जानेवारीच्या पथसंचलनात देखील उत्तम प्रदर्शन केले. आपली हि मेहनत संपूर्ण जगाने पहिली आहे. आपण नेहमी बघतो. जगातल्या ज्या ज्या देशांमध्ये समाज जीवनात शिस्त असते ते सगळे देश सर्वच क्षेत्रात आपला झेंडा दिमाखात फडकावतात. आणि भारतात समाजजीवनात शिस्त आणण्याची ही महत्वाची भूमिका एनसीसी चे कॅडेट्स अत्यंत उत्तम प्रकारे पार पाडू शकतात. आणि तुमच्यातही हा संस्कार आयुष्यभर असायला हवा. एनसीसी नंतरही शिस्तीची ही भावना आपल्यामध्ये कायम असायला हवी. एवढेच नाही, तर आपण आपल्या आसपासच्या लोकांनाही सतत यासाठी प्रेरणा देत राहायला हवी, त्यामुळेच भारत समाज मजबूत होईल, देश सशक्त होईल.

मित्रांनो,

जगातल्या सर्वात मोठ्या गणवेशधारी युवा संघटनेच्या रूपात, राष्ट्रीय छात्र सेनेने जी आपली प्रतिमा निर्माण केली आहे, ती दिवसेंदिवस अधिकाधिक सशक्त होत चालली आहे. आणि जेव्हा मी आपले प्रयत्न बघतो, तेव्हा मला खूप आनंद मिळतो, आपल्याविषयीचा विश्वास अधिकच दृढ होतो. शौर्य आणि सेवेच्या भारतीय परंपरेला जिथे वाढवले जात आहे- त्या सर्व ठिकाणी एनसीसीचे छात्र असतातच. जिथे संविधानाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे अभियान सुरु असेल, तिथे एनसीसी चे कॅडेट्स दिसतात. पर्यावरणाबाबत काही चांगले काम सुरु असेल, जल संरक्षण अथवा स्वच्छतेशी सबंधित काही मोहीम असेल, तर तिथेही एनसीसीचे कॅडेट्स असतात. संकटकाळी तर आपण सगळे ज्या अद्भुत प्रकारे संघटीत काम करता, त्याची उदाहरणे तर इतर ठिकाणी अत्यंत कमी आढळतात.पूर असेल किंवा दुसरे काही संकट, गेल्या वर्षी एनसीसी च्या कॅडेट्स नी अडचणीत असलेल्या देशबांधवांसाठी मदत आणि बचाव कार्यात मोलाची मदत केली आहे. कोरोनाच्या या पूर्ण काळात, लाखो कॅडेट्स नी देशभरात ज्या प्रकारे प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे, ते कौतुकास्पद आहे. आपल्या संविधानात नागरिकांच्या कर्तव्याविषयी जे लिहिले गेले आहे, ज्याची आपल्याकडून अपेक्षा ठेवली गेली आहे, त्यांचे पालन करणे आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे.

आपल्या सर्वांनाच हे माहिती आहे की जेव्हा नागरी समाज, स्थानिक नागरिक आपल्या कर्तव्यांना महत्व देतात, त्यावेळी मोठ्यात मोठी आव्हाने देखील सोडवली जाऊ शकतात. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकेकाळी आपल्या देशात नक्षलवाद-माओवाद ही किती मोठी समस्या होती. देशातील शेकडो जिल्हे नक्षलग्रस्त झाले होते. मात्र स्थानिक नागरिकांची कर्तव्यभावना आणि सुरक्षा दलांचे शौर्य एकत्र आले आणि नक्षलवादाचा अंत व्हायला सुरुवात झाली. आता देशातल्या काही मोजक्या जिल्ह्यातच ही समस्या उरली आहे. आता देशात नक्षली हिंसा अत्यंत कमी झाली आहे. किंबहुना अनेक युवक हिंसेचा रस्ता सोडून विकासाच्या प्रवाहाशी जोडले जात आहेत. एक नागरिक म्हणून आपल्या कर्तव्यांना प्राधान्य देण्याचा प्रभाव आपण या कोरोना काळातही बघितला आहे. देशातील लोक जेव्हा एकत्र आले आणि आपली जबाबदारी पार पाडली, त्यावेळी देशाने कोरोनाचाही अत्यंत उत्तम प्रकारे सामना केला.

मित्रांनो,

हा काळ आव्हानात्मक होता, मात्र या काळाने आपल्यासोबत संधीही आणल्या. संधी-आव्हानांचा सामना करण्याच्या, विजयी होण्याच्या संधी -देशासाठी काहीतरी करण्याची, संधी-देशाच्या क्षमता वाढवून देशाला आत्मनिर्भर बनवण्याची, संधी- सामान्यांपासून असामान्य, असामान्यांपासून सर्वश्रेष्ठ होण्याची. या सर्व उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी भारताच्या युवा शक्तीची भूमिका आणि युवा शक्तीचे योगदान सर्वात महत्वाचे आहे. आपल्या सर्वांमध्ये मला राष्ट्रसेवका सोबतच एक राष्ट्र रक्षकही दिसतो आहे. म्हणूनच सरकारने एनसीसीच्या भूमिकेचा अधिक विस्तार करायला हवा. देशाच्या सीमेवरील राज्ये तसेच समुद्र किनाऱ्यांचे रक्षण आणि संरक्षणाशी संबधित जाळे अधिक सशक्त करण्यासाठी एनसीसी चा सहभाग वाढवला जात आहे.

गेल्यावर्षी 15 ऑगस्टला ही घोषणा करण्यात आली होती की किनारी आणि सीमेवरील क्षेत्रात सुमारे 175 जिल्ह्यांत एनसीसी ला नवी जबाबदारी दिली जाईल. यासाठी सुमारे एक लाख एनसीसी कॅडेट्सना लष्कर, नौदल आणि हवाई दल प्रशिक्षण देत आहे. या कॅडेट्स ची निवड सर्व शाळा आणि महाविद्यालयातून- मग ते सरकारी असो वा खाजगी- केंद्राचे असोत वा राज्य सरकारचे सर्व छात्रांना यात सहभागी करून घेतलं जात आहे. एनसीसी च्या प्रशिक्षण क्षमताही सरकार वेगाने वाढवत आहे. आतापर्यंत आपल्याकडे एकच फायरिंग सिम्युलेटर होते, आता त्यांची संख्या 98 पर्यंत वाढवली जात आहे, म्हणजे सुमारे 100. कुठे पूर्वीचे एक आणि कुठे 100. मायक्रोलाईट फ्लाईट सिम्युलेटर ची संख्या देखील पाच वरुन 44 पर्यंत वाढवण्यात आली आहे तर रोविंग सिम्युलेटरची संख्या 11 वरुन 60 केली जात आहे. ही आधुनिक सिम्युलेटर्स, एनसीसी च्या प्रशिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करणार आहेत.

मित्रांनो,

हा कार्यक्रम आता ज्या मैदानावर होतो आहे,त्याचे नाव फिल्ड मार्शल के. एम.करिअप्पा यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. ते देखील आपल्यासाठी एक मोठा प्रेरणास्त्रोत आहेत. करिअप्पाजींचे आयुष्य अनेक शौर्य गाथांनी भरलेले आहे. 1947 साली त्यांच्या रणनीतीच्या कौशल्यामुळेच भारताला युद्धात निर्णायक विजय मिळाला होता. आज फिल्ड मार्शल के एम करिअप्पा जी यांची जयंती आहे. मी सर्व देशबांधवांच्या वतीने, एनसीसी कॅडेट्स च्या वतीने त्यांना अत्यंत आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो.

आपल्यापैकी अनेक सहकाऱ्यांची ही तीव्र इच्छा असेल की आपण भारताच्या संरक्षण दलांचा भाग बनावे. आपल्या सगळ्यांमध्ये ते सामर्थ्य तर आहेच, आणी सरकार देखील आपल्यासाठी त्या संधी वाढवत आहे. विशेषत: छात्र युवतींसाठी माझा आग्रह असेल की आपल्यासाठी अनेक संधी तिथे वाट बघत आहेत. माझ्यासमोर मला दिसते आहे आणि आकडेही सांगतात की गेल्या काही वर्षात, एनसीसी मध्ये छात्र युवतींच्या संख्येत सुमारे 35 टक्क्यांची वाढ झाली आहे. आता आपल्या सैन्यदलातील प्रत्येक आघाडी महिलांसाठी सुरु होत आहे. भारताच्या वीरकन्या प्रत्येक आघाडीवर शत्रूशी दोन हात करण्यास आजही मोर्चा सांभाळत आहेत. आपल्या शौर्याची देशाला गरज आहे आणि नवी क्षितिजे आपली वाट बघत आहेत. मी तुमच्यामध्ये भविष्यातील अधिकारी बघतो आहे. मला आठवते, जेव्हा काही दोन-अडीच महिन्यांपूर्वी, दिवाळीत मी जैसलमेर लोंगेवाला चौकीत गेलो होतो, त्यावेळी अनेक युवा अधिकाऱ्यांची भेट झाली, देशाच्या रक्षणार्थ त्यांचा उत्साह, त्यांचे उमेद, त्यांच्या चेहऱ्यांवर दिसत असलेली दुर्दम्य इच्छाशक्ती मी कधीही विसरू शकत नाही.

मित्रांनो,

लोंगोवाला चौकीचाही आपला अभिमानास्पद इतिहास आहे. 1971 सालच्या युद्धात लोंगोवाला इथे आपल्या जवानांनी निर्णायक विजय मिळवला होता. तेव्हा पाकिस्तानशी झालेल्या युद्धात पूर्व आणि पश्चिमेच्या हजारो किमी लांब सीमेवर भारताच्या सैन्याने आपल्या पराक्रमाने शत्रूला धूळ चारली होती. या युद्धात पाकिस्तानच्या हजारो सैनिकांनी भारताच्या शूर सैन्यापुढे शरणागती पत्करली होती. 71 चे हे युद्ध भारताचा मित्र आणि शेजारी बांग्लादेशाच्या निर्मितीसाठी सहायक ठरले. या वर्षी या युद्धातील विजयाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. आम्ही भारताचे लोक 1971 च्या युद्धात देशाला विजय मिळवून देणाऱ्या मुला-मुलींचे शौर्य, धाडसाला संपूर्ण देश सलामी देत आहे. या युद्धात देशासाठी जे हुतात्मा झाले, त्यांनाही मी आपली श्रद्धांजली अर्पण करतो.

मित्रांनो,

आपण सगळे जन दिल्लीला आला आहात तर इथे राष्ट्रीय युद्ध स्मारक बघणे अत्यंत स्वाभाविक आहे. राष्ट्राच्या संरक्षणासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्यांना सन्मान देणे आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. किंबहुना या प्रजासत्ताक दिनी तर आपले जे शौर्य पुरस्कारांचे पोर्टल आहे- www.gallantryawards.gov.in  त्याचाही नव्या रंगरुपात पुनर्प्रारंभ करण्यात आला आहे. यात परमवीर चक्र आणि महावीर चक्र सारखे सन्मान मिळवणाऱ्या आपल्या सैनिकांच्या आयुष्याशी संबंधित माहिती असते,आपण या पोर्टलला भेट देऊन या वीरांच्या शौर्याला वंदन करू शकतो. माझी सध्याच्या आणि माजी अशा सर्व कॅडेट्स ना आग्रहपूर्वक विनंती आहे की आपण या पोर्टलवर जावे, त्यावरची माहिती वाचावी, त्यावर काय काय अपडेट्स आहेत ते बघत राहावेत.

मित्रांनो,

मला हे ही सांगण्यात आले आहे की जो एनसीसी डिजिटल प्लॅटफॉर्म बनवण्यात आला आहे त्याच्याशी आजपर्यंत 20,000 हून जास्त कॅडेट्स जोडले गेले आहेत त्यांनी आपले अनुभव आणि कल्पना त्यावर शेअर केले आहेत. मला विश्वास आहे की तुम्ही या प्लॅटफॉर्मचा जास्तीत जास्त उपयोग कराल.

मित्रांनो,

राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रसेवेची जी मूल्ये घेऊन आपण वाटचाल करत आहात, त्यासाठी हे वर्ष अत्यंत महत्वपूर्ण आहे. या वर्षात भारत आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या 75 वर्षात पदार्पण करणार आहे. हे वर्ष नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीचेही वर्ष आहे. आयुष्यात प्रेरणा घेण्याच्या इतक्या सगळ्या संधी एकदम उपलब्ध होणे अत्यंत कमीवेळा होते. नेताजी सुभाषचंद्र, ज्यांनी आपल्या पराक्रमाने जगातील सर्वात मोठ्या सत्तेला हादरे दिले होते. आपण नेताजींविषयी जेवढे अधिक वाचाल. तेवढे तुम्हाला जाणवेल की कोणतेही आव्हान एवढे कठीण नसते, की ते आपल्या हिमतीला हालवू शकेल. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वकाही अपर्ण करणारे असे अनेक वीर आपल्याला, त्यांच्या स्वप्नातला भारत उभारतांना बघायचे आहे. आणि आपल्या आयुष्यातील पुढची 25-26 वर्षे अत्यंत महत्वाची आहेत. ही 25-26 वर्षे भारतासाठी देखील तेवढीच महत्वाची आहेत.

2047 साली जेव्हा देश आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करेल, त्यावेळी आपले आजचे प्रयत्नच भारताच्या या प्रवासाला बळ देतील. म्हणजेच हे वर्ष एक कॅडेट म्हणून आणि एक नागरिक म्हणूनही नवा संकल्प करण्याचे वर्ष आहे. देशासाठी नवी स्वप्ने बघत ती साकार करण्यासाठी प्रवास करण्याचे वर्ष आहे. गेल्या वर्षी मोठ-मोठ्या संकटांचा आपण ज्या सामूहिक शक्तीने, एक राष्ट्र, एक मन म्हणून सामना केला, ती भावना आम्हाला अधिक मजबूत करायची आहे. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर या महामारीचे जे परिणाम झाले आहेत, ते पूर्णपणे संपवायचे आहेत. आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प देखील आपल्याला पूर्ण करुन दाखवायचा आहे.

मित्रांनो,

गेल्या वर्षी भारताने दाखवून दिले की विषाणू असो किंवा मग सीमेवरील आव्हान, भारत आपल्या रक्षणासाठी संपूर्ण सक्षमतेने पाऊल उचलण्यास समर्थ आहे. लसीचे सुरक्षा कवच असो किंवा मग भारताला आव्हान देण्याचे मनसुबे आधुनिक क्षेपणास्त्रांनी हाणून पाडणे असो, भारत प्रत्येक ठिकाणी समर्थपणे उभा आहे.आज आपण लसीच्या बाबतीतही आत्मनिर्भर आहोत आणि आपल्या सैन्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी देखील तेवढ्याच जलदगतीने प्रयत्न करत आहेत.भारताची सर्व सैन्यदले सर्वश्रेष्ठ असावीत, यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत. आज भारताकडे जगातील सर्वोत्तम वॉर मशीन्स आहेत. आपण प्रसारमाध्यमांमध्येही पहिले असेल, कालच भारतात फ्रांसमधून तीन आणखी राफेल लढाऊ जहाजे आली आहेत. या लढाऊ विमानांमध्ये हवेतच इंधन भरण्यात आले आणि हे इंधन भरण्याचे काम भारताचा मित्रदेश संयुक्त अरब अमिरातीने केले आहे, आणि त्यात ग्रीस सौदी अरब यांनी सहकार्य केले आहे. भारताचे आखाती देशांशी असलेले संबंध अधिक मजबूत झाल्याचे हे एक चित्र देखील आहे.

मित्रांनो,

आपल्या सैन्याच्या अधिकाधिक गरजा भारतातच पूर्ण केल्या जाव्यात, यासाठी देखील सरकारने अनेक मोठमोठे निर्णय घेतले आहेत. 100 पेक्षा जास्त सुरक्षा उपकरणांची परदेशातून होणारी आयात बंद करुन ती भारतातच तयार केली जात आहेत. आता भारताचे स्वतःचे तेजस लढावू विमान देखील समुद्रापासून ते आकाशापर्यंत आपले तेज पसरवत राहणार आहे. अलीकडेच, वायूसेनेसाठी 80 पेक्षा जास्त तेजस विमानांची ऑर्डर देखील देण्यात आली आहे. इतकेच नाही, तर कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित युद्धातहि भारत कोणाच्याच मागे राहू नये, यासाठी आवश्यक ते सर्व संशोधन आणि विकास केला जास्त आहे. तो दिवस दूर नाही, जेव्हा भारत संरक्षण साधने आणि उपकरणांच्या सर्वात मोठ्या बाजारपेठेऐवजी एक मोठा उत्पादक देश म्हणून ओळखला जाईल.

मित्रांनो,

आत्मनिर्भरतेची अनेक उद्दिष्टे आज आपण साकार होतांना बघत आहात, तेव्हा आपल्या मनात एक अभिमानाची भावना निर्माण होणे सहाजिक आहे. आपण देखील आपल्या मनात, आपल्या मित्रांमध्ये स्थानिक उत्पादनांच्या वापराबद्दलचा उत्साह अनुभवत असाल.मी बघतो आहे की ब्रांड्स विषयी भारताच्या युवकांच्या पसंतीक्रमात आता खूप बदल झाला आहे. आता खादीचेच बघा ना. खादीचा एकेकाळी केवळ नेत्यांचे घालण्याचे वस्त्र एवढाच उपयोग शिल्लक राहिला होता. आज तीच खादी युवकांचा आवडीचा ब्रांड ठरली आहे. खादीचे कुर्ते असो, खादीचे जैकेट असो, खादीच्या इतर वस्तू असो, त्या सगळ्या युवकांसाठी फॅशनचे सिम्बॉल बनल्या आहेत. त्याचप्रमाणे आज वस्त्रोद्योग असो किंवा इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन असो किंवा पॅशन, सणावर असोत किंवा लग्न असो, लोकांची पसंती खादी उत्पादनांनाच आहे. कोरोनाच्या कठीण काळातही भारतात विक्रमी संख्येत स्टार्ट अप्स कंपन्या उभारल्या जास्त आहेत आणि देशातल्या युवकांनी विक्रमी संख्येने युनिकॉर्न तयार केले आहेत.

मित्रांनो,

एकविसाव्या शतकातल्या आत्मनिर्भर भारतासाठी आत्मविश्वास असलेले युवक अत्यंत आवश्यक आहेत. हा आत्मविश्वास, निरोगी, निरामय असण्याने वाढतो. शिक्षणाने वाढतो, कौशल्ये आणि योग्य संधीमुळे निर्माण होत. आज सरकार देशातल्या युवकांसाठी याच आवश्यक पैलूंवर काम करते आहे. आणि त्यासाठी व्यवस्थेत आवश्यक त्या सर्व सुधारणा करण्यात आल्या आहेत. हजारो, अटल टिंकरिंग प्रयोगशाळा सुरु करण्यापासून ते मोठमोठ्या शैक्षणिक संस्थांपर्यंत, स्कील इंडिया अभियानापासून ते मुद्रा योजनेसारख्या योजनांपर्यंत, सरकार प्रत्येक दिशेने प्रयत्न करत आहे.आज भारतात फिटनेस आणि स्पोर्ट्स ला अभूतपूर्व प्राधान्य दिले जात आहे. फिट इंडिया अभियान आणि खेलो इंडिया अभियानाअंतर्गत देशातल्या प्रत्येक गावात उत्तम फिटनेस आणि उत्तम गुणवत्तेला प्रोत्साहन दिले जात आहे. फिट इंडिया अभियान आणि योगाभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी NCC मध्ये ही विशेष कार्यक्रम घेतले जात आहेत.

नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून भारताच्या शिक्षण व्यवस्थेला नर्सरीपासून ते पीएचडी पर्यंत विद्यार्थी केन्द्री बनवले जात आहे. आपल्या मुलांना, युवा मित्रांना अनावश्यक दबावातून मुक्त करण्यासाठी, त्यांच्या इच्छेनुसार आपल्या आवडीनुसार पुढे वाटचाल करण्यासाठीची व्यवस्था उभी केली जात आहे. शेतीपासून ते अवकाश क्षेत्रापर्यंत, प्रत्येक स्तरावर युवा गुणवत्तेसाठी युवा उद्योजकांसाठी संधी निर्माण केल्या जात आहेत. आपण या संधींचा जितका लाभ घ्याल तेवढाच देश पुढे जाईल. आपल्याला  वयं राष्ट्र जागृयामः या वैदिक आवाहनाला एकविसाव्या शतकातील युवा उर्जेचा जयघोष बनवायचे आहे. आपल्याला ‘इदम् राष्ट्राय इदम् न मम्’ म्हणजेच, ‘हे आयुष्य राष्ट्राला समर्पित करायचे आहे’ ही भावना आत्मसात करायची आहे. आपल्याला ‘राष्ट्र हिताय-राष्ट्र सुखाय च’ चा संकल्प घेऊन, प्रत्येक देशबांधवासाठी काम करायचे आहे. ‘आत्मवत सर्वभूतेषु आणि सर्वभूत हितेरता’ म्हणजे सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हा मंत्र घेऊन पुढे वाटचाल करायची आहे.

जर आपण हे मंत्र आपल्या आयुष्यात आचरणात आणले तर आत्मनिर्भर भारताचा संकल्प प्रत्यक्षात साकार होण्यास फार वेळ लागणार नाही. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे, प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचालनात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन! आणि भविष्यासाठी अनेक शुभेच्छा !!

 खूप खूप धन्यवाद !

M.Chopade/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1693036) Visitor Counter : 143