उपराष्ट्रपती कार्यालय

कोविड-19 साथीच्या आजाराने आपल्याला आरोग्यासाठी चांगली खेळती हवा (व्हेंटिलेशन) आणि सूर्यप्रकाशाचे महत्त्व शिकविले – उपराष्ट्रपती


उपराष्ट्रपतींनी शहरे सुगम्य, सर्वसमावेशक आणि शाश्वत बनविण्याचे आवाहन केले

‘नागरी नियोजन व भूगोल या विषयाचे पाठ्यपुस्तक’ प्रकाशित

Posted On: 20 JAN 2021 10:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 जानेवारी 2021

 
कोविड-19 साथीच्या आजाराने आपल्याला आरोग्यासाठी चांगली खेळती हवा (व्हेंटिलेशन) आणि सूर्यप्रकाशाचे महत्त्व शिकविले असे उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू म्हणाले. छोट्या जागेत वाढत असलेल्या नागरी वस्ती बद्दल नाराजी व्यक्त करताना नायडू यांनी घरे, कार्यालये, उपहारगृहे आणि संमेलन गृहांमध्ये हवेचे योग्य नियोजन सुनिश्चित करण्यास सांगितले. 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेयर्सचे महासंचालक आणि विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. समीर शर्मा लिखित ‘शहरी नियोजन व भूगोल एक पाठ्यपुस्तक’ या पुस्तकाचे आभासी पद्धतीने  प्रकाशन करताना उपराष्ट्रपतींनी आज हैदराबादमध्ये ही टिप्पणी केली. आधुनिक जीवनशैली अंगिकारताना  शहरवासीयांचा निसर्गाशी संबंध तुटत चालला आहे आणि बऱ्याचदा आपल्या घरात सूर्यकिरण देखील येत नसल्याचे आपल्या लक्षात येते असे नायडू म्हणाले. प्रत्येक नगररचनाकार आणि वास्तुशास्त्रज्ञाने फॅशन आणि आराखड्यापेक्षा आरामाला तसेच निसर्गाशी सुसंगत असणाऱ्या इमारती उभारण्याला अधिक प्राधान्य दिले पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला.  

चांगल्या नागरी नियोजनासाठी सुगम्यता, सर्वसमावेशकता आणि शाश्वत या तत्त्वांवर प्रकाश टाकताना उपराष्ट्रपती म्हणाले की, शहरांचे नियोजन करण्याच्या तात्पुरत्या दृष्टिकोनाची जागा आता  दीर्घकालीन आणि उत्साहपूर्ण शहरे वसविण्याच्या दृष्टीकोनाने घेणे आवश्यक आहे.

नायडू यांनी शहर नियोजनातील प्रत्येक घटक शाश्वत असण्याच्या आवश्यकतेवर भर दिला – मग तो नागरी सुविधांचे अर्थसहाय्य असो, हिरव्या इमारतींना प्रोत्साहन देणे, कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करणे असो  पावसाचे पाण्याचे नियोजन असो किंवा सार्वजनिक वाहतुकीला चालना देणे असो. काँक्रिटीकरणामुळे बर्याच शहरांमध्ये पुराच्या बारमाही घटनांबद्दल चिंता व्यक्त करताना उपराष्ट्रपतींनी निसर्गाशी सुसंगत राहण्याची गरज यावेळी अधोरेखित केली. 

वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी नायडू यांना सार्वजनिक वाहतुकीला तसेच कार-पूलिंग, सीएनजी किंवा इलेक्ट्रिक वाहनांचा वापर यासारख्या इतर हरित उपक्रमांनाही चालना देण्यादेण्याचा मानस व्यक्त केला. नागरिकांनी देखील रस्त्यावरील जागेचा वापर योग्य पद्धतीने करावा अशी  मागणी केली.

भारतातील सर्व शहरांनी ‘इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स’ सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे याकडे लक्ष वेधताना उपराष्ट्रपतींनी शहरांसाठी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक जागा उपलब्ध करून देण्याच्या आवश्यकतेवर जोर दिला. आजकाल सार्वजनिक समारंभ फारच कमी प्रमाणात होत असल्याचे तसेच समुदायाने एकत्रित येण्याची भावना हळूहळू ऱ्हास होत चालली असल्याकडे लक्ष वेधत ते म्हणाले,  जेव्हा कुटुंबे नियमितपणे संवाद साधतात, आपल्या भावना  सामायिक करतात आणि एकमेकांच्या अनुभवातून शिकतात तेव्हाच समुदायामधील ऋणानुबंध दृढ होतात.  

ग्रामीण-शहरी स्थलांतराबाबत उपराष्ट्रपतींनी आपले मत व्यक्त करताना या मुद्दयाच्या मुळाशी जाऊन जाऊन लोकं ग्रामीण भागातून स्थलांतर का करतात यांचे कारण शोधले पाहिजे असा सल्ला दिला. 

या पुस्तकासाठी लेखक डॉ. समीर शर्मा आणि प्रकाशक यांचे  कौतुक करतांना नायडू यांनी आनंद व्यक्त केला की लेखकाने पाश्चात्य उपाययोजनांवर डोळे बंद करून विश्वास न ठेवता शहरांच्या नियोजनातील आपल्या अनुभवांवर आणि त्याच्या ज्ञानावर आधारित शहरांसाठी स्वदेशी उपाय शोधून काढले आहेत.

या आभासी कार्यक्रमाला पुस्तकाचे लेखक डॉ. समीर शर्मा, राष्ट्रीय नागरी व्यवहार संस्थेचे, संचालक हितेश वैद्य, पीएचआय लर्निंग प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अशोक के. घोष उपस्थित होते. 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी येथे क्लिक करा 


* * *

M.Chopade/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1690619) Visitor Counter : 174