आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डॉ. हर्ष वर्धन यांनी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या ईट राईट चॅलेंज ओरिएंटेशन कार्यशाळेला आभासी पद्धतीने केले संबोधित


“फिट इंडिया, पोषण अभियान, अनेमिया मुक्त भारत, जल जीवन अभियान आणि स्वच्छ भारत अभियाना सोबत ईट राईट इंडिया हे पंतप्रधानांच्या नव भारताच्या कोनशीला आहेत”

Posted On: 19 AUG 2020 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2020

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ईट राईट चॅलेंजचा भाग म्हणून भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) आयोजित केलेल्या ऑनलाईन ओरिएंटेशन कार्यशाळेचे अध्यक्षपद भूषविले. त्यांनी यावेळी देशभरात ‘ईट राईट इंडिया’ उपक्रम राबविण्यासाठी विविध भागधारकांना मदत करण्यासाठी एफएसएसएआयचे ‘ईट राइट इंडिया’ हँडबुक आणि eatrightindia.gov.in  ही वेबसाइट देखील सुरू केली. आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे, हे देखील यावेळी उपस्थित होते.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने एफएसएसएआय ने सुरू केलेले ‘ईट राइट इंडिया’ आंदोलन लोकांमध्ये आहाराच्या सुरक्षित, निरोगी आणि शाश्वत सवयींबद्दल जागरूकता निर्माण करीत आहे. हा हेतू साध्य करण्यासाठी आणि कार्यक्रमाला लोक चळवळीमध्ये रूपांतरित करण्यासाठी, एफएसएसएआयने अलीकडेच अन्न सुरक्षा आणि नियामक वातावरणाला बळकट आणि, ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच लोकांमध्ये खाण्याच्या चांगल्या सवयींना प्रोत्साहित करण्यसाठी 197 जिल्हे आणि शहरांसाठी "ईट राईट चॅलेंज " ही वार्षिक स्पर्धा जाहीर केली. अन्न सुरक्षा आयुक्त आणि जिल्हा अधिकारी जसे जिल्हा दंडाधिकारी व शहरांचे नियुक्त अधिकारीही ऑनलाईन कार्यशाळेत सहभागी झाले होते.

अधिकाऱ्यांना आपापल्या कार्यक्षेत्रात ईट राइट इंडिया (ईआरआय) उपक्रम अंगीकारण्यासाठी आणि विस्तारित करण्यासाठी उपयुक्त संदर्भ मार्गदर्शक असणारे, ‘ईट राइट हँडबुक’ प्रकाशित करताना डॉ हर्षवर्धन म्हणाले, अन्न म्हणजे केवळ आपली भूक भागवण्यासाठी आणि चव तृप्त करण्यासाठी नसते तर ते आपले आरोग्य आणि पोषण याच्याशी देखील संबधित असते. ही कार्यशाळा वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण एकच ध्येय साध्य करण्यासाठी मोठ्या उपहारगृहांचे मुख्य आचारी ते अगदी रस्त्याच्या कडेला असणारे भोजनालयांच्या मालकांना एकाच छताखाली एकत्र आणते.  

उपस्थित 197शहरे व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी या मोहिमेच्या अत्यंत आवश्यक असलेल्या गरजांवर प्रकाश टाकला. भारतात राहणाऱ्या 135 कोटी लोकांपैकी 196 दशलक्ष लोकं भूकबळीचे शिकार आहेत ते 180 दशलक्ष लोकांना लठ्ठपणाचा आजार आहे.  47 दशलक्ष मुलांची वाढ खुंटली आहे तर 25 दशलक्ष वाया गेले आहेत. 500 दशलक्ष लोकांमध्ये सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता आहे आणि 100 दशलक्ष लोकं अन्नजन्य आजारांनी ग्रस्त आहेत, असे त्यांनी यावेळी नमूद केले. या आव्हानांना प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी हे आंदोलन अन्न, पोषण आणि खाण्याच्या व आहाराच्या सवयींबद्दल जागरुकता निर्माण करण्याकडे लक्ष केंद्रित करेल असे ते म्हणाले. हे अन्न वाया जाणे आणि अन्नाची विल्हेवाट लावण्याच्या समस्येवर देखील जोर देईल.

वर्ष 2022 मध्ये स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षापर्यंत नव भारत निर्मितीच्या पंतप्रधानांच्या प्रतिबद्धतेची उपस्थितांना आठवण करून देत केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले, अस्वच्छतेमुळे उद्भवणार्‍या रोगांपासून देशाला मुक्त करण्यासाठी पंतप्रधानांनी 2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. जल जीवन मिशनच्या माध्यमातून नळाद्वारे घराघरात स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याचे उद्दीष्ट आहे ज्यामुळे पाण्यामुळे होणा-या आजारापासून बचाव करण्यात मदत करेल तर उज्ज्वला योजना धूर व फुफ्फुसाच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वच्छ इंधन उपलब्ध करुन देईल. पोषण अभियान, अनेमिया मुक्त भारत आणि फिट इंडिया चळवळीचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांना पंतप्रधानांच्या नव भारताच्या कोनशीला म्हणून संबोधिले. आयुष्मान भारत आरोग्य केंद्रांचे मुख्य लक्ष प्रतिबंधक, सकारात्मक आणि प्रोत्साहन देणाऱ्या आरोग्याकडे आहे, असे मंत्री म्हणाले. ते म्हणाले, एचडब्ल्यूसी पंतप्रधानांच्या निरोगी भारताच्या दृष्टीकोनाचा अविभाज्य घटक आहे.

आजाराचा प्रतिकार करण्यात सकस अन्न आणि पोषण कशाप्रकारे महत्वपूर्ण भूमिका बजावते याबद्दल डॉ.हर्ष वर्धन यांनी माहिती दिली. आहार हा विविध प्रकारच्या रोगांबद्दल प्रतिरोधक क्षमता आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतो असे सांगत त्यांनी मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी गुंतागुंत इत्यादींसारख्या असंसर्गजन्य आजारांमुळे होणारे 61.8% मृत्यू हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आहाराशी संबंधित असतात यावर त्यांनी भर दिला. क्षयरोगासारखे संसर्गजन्य रोगदेखील कुपोषित लोकांना लवकर होतात. पोषणाद्वारे मिळविलेल्या प्रतिकारशक्तीवर आधारित एकाच घरातले लोक कोविडला वेगवेगळे प्रतिसाद दर्शवित आहेत. श्री अश्विनीकुमार चौबे यांनी शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांच्या आधारे अन्नाचे वर्गीकरण करून लोकांना खाण्याच्या योग्य पद्धती बाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्राचीन आणि पारंपारिक आयुर्वेदाची भूमिका स्पष्ट केली. भगवद्गीता आणि उपनिषदांचे दाखले देत त्यांनी पारंपारिक खाण्याच्या सवयी आणि वनस्पती आधारित भोजन यावर जोर दिला. निरोगी खाण्याच्या सवयी आणि व्यायाम एकत्र केल्याने एक चांगला आणि निरोगी भारत तयार होईल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

एफएसएसएआयच्या अध्यक्षा रीता टीओतिया आणि एफएसएसएएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सिंगल हे देखील आभासी पद्धतीने या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

B.Gokhale/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1647070) Visitor Counter : 323