पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज रांची, झारखंड येथे ‘आयुष्मान भारत: जन आरोग्य योजना’ या आरोग्य आश्वासन योजनेचा प्रारंभ केला

Posted On: 23 SEP 2018 4:14PM by PIB Mumbai

मोठ्या जनसमुदायासमोर योजनेचा प्रारंभ करण्यापूर्वी पंतप्रधानांनी एका प्रदर्शनाला भेट दिली.

या योजनेबरोबरच पंतप्रधानांनी चैबासा आणि कोडेरमा येथील वैद्यकीय महाविद्यालयांचीही पायाभरणी केली. तसेच त्यांनी 10 आरोग्य आणि कल्याण केंद्रांचेही उद्घाटन केले.

या प्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले, की ही योजना गरीबातील गरीब आणि वंचित लोकांना उत्तम आरोग्यसेवा आणि उपचार देण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. ते पुढे म्हणाले, ह्या योजनेमुळे प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्षी 5 लाखांचे आरोग्य विमा कवच मिळेल ज्याचा 50 कोटी लोकांना फायदा होईल, जी या प्रकारची जगातली सर्वात व्यापक योजना आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ही युरोप, अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या एकत्रित लोकसंख्येएवढी आहे.

आयुष्मान भारत योजनेच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य आणि कल्याण केंद्रे यांचा समावेश आहे, त्याचे उद्घाटन बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिवशी करण्यात आले. दीनदयाळ उपाध्यायांच्या जयंतीच्या दोन दिवस आधी दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात येईल ज्यामध्ये आरोग्य विमा योजनेचा समावेश असेल. 

प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेच्या व्याप्तीविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले, यामध्ये 1300 आजारांचा ज्यामध्ये कर्करोग आणि हृदयरोग यांसारख्या गंभीर आजारांचाही समावेश असेल. खासगी रुग्णालयेही या योजनेत सहभागी असतील.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, 5 लाखांच्या रकमेत सर्व चाचण्या, औषधे, रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च यांचा अंतर्भाव असेल. ही योजना आधीपासून असलेल्या आजारांनाही संरक्षण पुरवेल. सामान्य सेवा केंद्राद्वारे अथवा 14555 या नंबरवर फोन करून या योजनेची माहिती घेता येईल. 

या योजनेत सहभागी असलेल्या राज्यांमधील लोक इतर सहभागी राज्यांतही या योजनेचा लाभ घेऊ शकतील. आत्तापर्यंत 13,000 रुग्णालये या योजनेत सहभागी झाली आहेत.

10 आरोग्य आणि कल्याण केंद्रांच्या उद्घाटनाविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, देशभरातील अशा केंद्रांची संख्या आता 2300 झाली आहे आणि येत्या 4 वर्षात 1.5 लाख केंद्रे सुरु करण्याचे उद्दिष्ट आहे.    

पंतप्रधान पुढे म्हणाले की,आरोग्य सेवेच्या सुधारणेसाठी केंद्र सरकारने समग्र दृष्टीकोन स्वीकारला आहे. सरकारचा भर ‘परवडणारी सेवा’ आणि ‘प्रतिबंधक सेवा’ देण्यावर आहे.

पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की, सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाद्वारे आणि डॉक्टर, नर्सेस, आशा यांच्या समर्पणाद्वारे ही योजना यशस्वी होईल.

                                                                                  ****

B. Gokhale/ M. Chopade



(Release ID: 1547002) Visitor Counter : 175