रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
आसाममधील राष्ट्रीय महामार्ग-15 (NH-15) वर गुवाहाटीजवळील बैहाटा चारियाली ते तेजपूर या दरम्यान, 15.11 किमीचा मंगलडोई बाह्यवळण मार्ग वगळता) एकंदर 135.87 किमी लांबीच्या चौपदरी महामार्गाच्या बांधकामाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; प्रकल्पाचा खर्च 8970.20 कोटी रुपये
प्रविष्टि तिथि:
06 AUG 2026 6:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आज आसाममधील राष्ट्रीय महामार्ग-15 (NH-15) वरील 135.871 किलोमीटर लांबीच्या, चौपदरी आणि ‘प्रवेश-नियंत्रित’ गुवाहाटी-तेजपूर मार्गिकेच्या विकासाला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प ‘राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित अर्थात [NH(O)] अंतर्गत, 8,970.20 कोटी रुपये इतक्या एकूण भांडवली खर्चासह 'बांधा-वापरा-हस्तांतरित करा' (BOT) या पथकर -आधारित पद्धतीवर विकसित केला जाईल.
या प्रकल्पाअंतर्गत, तेजपुर बाह्यवळण मार्गावर 4.9 किलोमीटर लांबीची 'आपत्कालीन विमान उतरवण्याची सुविधा’ (ELF) उभारण्याचे नियोजन असून, भारतीय वायुदलाच्या समन्वयाने त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. या सुविधेमुळे ब्रह्मपुत्रा नदीच्या दक्षिण बाजूला सध्या असलेल्या, राष्ट्रीय महामार्ग-27 (पूर्व-पश्चिम मार्गिके) वरील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल. या प्रकल्पात एकंदर 58.7 किमी लांबीच्या 5 प्रमुख बाह्यवळण मार्गांच्या बांधकामांचाही समावेश आहे; यामुळे बैहाटा चारियाली, सिपाझार, खारुपेटिया, डेकियाजुली आणि तेजपूर यांसारख्या दाट लोकवस्तीच्या भागांतून जाणाऱ्या मार्गांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
याव्यतिरिक्त, या प्रकल्पात 15 मोठे पूल, 30 छोटे पूल, 19 उड्डाणपूल आणि तेजपुर बाह्यवळण मार्गावर हत्तींसाठी बांधण्यात येणाऱ्या एका भुयारी मार्गाचा समावेश आहे. हा प्रकल्प प्रवेश-नियंत्रित अर्थात 'ॲक्सेस कंट्रोल्ड' स्वरूपात विकसित केला जाणार असल्याने, वाहतुकीची ये-जा सुरळीत ठेवण्यासाठी या प्रकल्पांतर्गत 46 भुयारी मार्ग, 19 उड्डाणपूल आणि 210 किमी लांबीचा सर्व्हिस रोड देखील बांधण्यात येतील.
या प्रकल्पामुळे प्रवासाचा सरासरी वेग 100 टक्क्यांनी वाढेल तर, प्रवासाचा वेळ अर्ध्याने कमी होईल. त्याचबरोबर, रस्त्यांवरील एकूण सुरक्षितेत सुधारणा होऊन, इंधनाची कार्यक्षमता वाढेल आणि वाहनांच्या परिचालन खर्चात कपात होईल; परिणामी, प्रादेशिक गतिशीलता आणि सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल.
हा प्रकल्प आसाम आणि अरुणाचल प्रदेशातील प्रमुख आर्थिक, सामाजिक आणि पुरवठा साखळी केंद्रांशी अव्याहतपणे जोडला जाईल. याशिवाय या सुधारित मार्गामुळे, 'पीएम गति-शक्ती' अंतर्गत येणारी 8 आर्थिक केंद्रे (8 औद्योगिक वसाहती), 2 सामाजिक केंद्रे (दर्रांग आणि उदलघुरी हे 2 'आकांक्षी जिल्हे'), 3 पर्यटन स्थळे ( कामाख्या देवी मंदिर, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, ओरंग राष्ट्रीय उद्यान) आणि 7 पुरवठा साखळी केंद्रे (3 प्रमुख रेल्वे स्थानके, 2 विमानतळ, 2 जलमार्ग टर्मिनल) यांच्याशी संपर्क अधिक सुलभ होईल; जेणेकरून या प्रदेशात माल आणि प्रवाशांची जलद वाहतूक शक्य होईल.
मार्गिकेचा नकाशा

सुषमा काणे/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2295644)
आगंतुक पटल : 10