पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नशामुक्त युवा-विकसित भारत संकल्प अभियाना'चा शुभारंभ


"मी प्रत्येक नागरिकाला, विशेषतः आपल्या युवकांना, या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करतो": पंतप्रधान

"आज देशाने विकसित भारताचे ध्येय निश्चित केले असताना, देशातील युवक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त, आत्मविश्वासाने परिपूर्ण असावेत आणि अंमली पदार्थांसारख्या विनाशकारी व्यसनांपासून कायमस्वरूपी दूर राहावेत, हे अत्यंत आवश्यक आहे": पंतप्रधान

"आपल्याला प्रत्येक युवकाला व्यसनाच्या विळख्यात अडकण्यापासून वाचवायचे आहे ": पंतप्रधान

"समाजाचा पाठिंबा, योग आणि ध्यानाची शक्ती आपल्या अंतर्मनाला व्यसनाविरुद्ध लढण्याचे बळ देते. तसेच, आज व्यसनमुक्तीसाठी पुनर्वसन केंद्रांसारख्या सुविधाही उपलब्ध आहेत": पंतप्रधान

"एखादा युवक चुकून व्यसनाच्या विळख्यात अडकला, म्हणजे त्याच्यासाठी सर्व मार्ग कायमचे बंद झाले आहेत, असे अजिबात नाही": पंतप्रधान

"आपण नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की, घरातील एखादे मूल व्यसनाच्या आहारी गेले असेल, तर सामाजिक प्रतिष्ठेच्या नावाखाली ती बाब लपवू नका. ज्या कोणाची मदत आवश्यक असेल, त्यांची मदत घ्या. वैद्यकीय मदतीच्या साहाय्याने आपल्या मुलाला व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करा": पंतप्रधान

"कुटुंबात मुलांशी मोकळेपणाने संवाद साधण्याची संस्कृतीही आपण विकसित केली पाहिजे, जेणेकरून ते अशा व्यसनाच्या विळख्यात अडकण्यापूर्वीच आपण त्यांचा हात धरू शकू": पंतप्रधान

"मी महाविद्यालये आणि विद्यापीठांतील प्राध्यापकांनाही एक आवाहन करू इच्छितो. नियमित अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांशी अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या दुष्परिणामांवर चर्चा करा आणि आपल्या परिसरात व्यसनमुक्तीची चळवळ उभारण्याचे नेतृत्व करा. तुमचे प्रयत्न निश्चितच महत्त्वपूर्ण परिणाम घडवून आणू शकतात": पंतप्रधान

प्रविष्टि तिथि: 02 AUG 2026 1:48PM by PIB Mumbai



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'नशामुक्त युवा - विकसित भारत संकल्प अभियाना'चा दूरदृश्य  प्रणालीच्या माध्यमातून शुभारंभ केला. यावेळी संबोधित करताना त्यांनी, 28,000 हून अधिक ठिकाणांहून जोडल्या गेलेल्या एक कोटीहून अधिक युवा नागरिकांसह उपस्थित विविध जनसमुदायाचे औपचारिक स्वागत केले. या क्षणाचे सामूहिक गांभीर्य व महत्त्व अधोरेखित करत त्यांनी, यातून सखोल राष्ट्रीय कटिबद्धता दिसून येत असल्याचे नमूद केले. "आज आपण सर्व देशवासीय  एका महान आणि महत्त्वाच्या संकल्पासाठी एकत्र आलो आहोत," असे पंतप्रधान म्हणाले.

या उपक्रमाचे सर्वसमावेशक स्वरूप अधोरेखित करत, ही मोहीम केवळ वैयक्तिक आरोग्यापुरती मर्यादित नसून, ती कुटुंब, समाज आणि संपूर्ण देशाच्या व्यापक हितासाठी एकाच वेळी कार्य करते, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. या अभियानामागील मुख्य उद्दिष्ट सांगताना त्यांनी, विकसित भारत घडवण्यासाठी आत्मघाती सवयींपासून पूर्णपणे मुक्त असलेली, शारीरिकदृष्ट्या सुदृढ, मानसिकदृष्ट्या सक्षम आणि उच्च आत्मविश्वास असलेली युवा पिढी असणे मूलभूतदृष्ट्या आवश्यक असल्याचे नमूद केले. "आज जेव्हा देशाने विकसित भारताचे ध्येय निश्चित केले  आहे, तेव्हा देशातील तरुण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे, त्यांच्यात आत्मविश्वास असणे, आणि अंमली पदार्थांसारख्या विनाशकारी सवयींपासून कायमचे दूर राहणे अत्यंत गरजेचे आहे," असे पंतप्रधान म्हणाले.

या मोहिमेच्या उगमाविषयी बोलताना, पंतप्रधानांनी अत्यंत समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, गेल्या वर्षी पवित्र काशीच्या भूमीत प्रायोगिक प्रकल्प म्हणून सुरू झालेल्या या उपक्रमाने आज राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप धारण केले आहे. या चळवळीला वैज्ञानिक दृष्टिकोनाची स्पष्टता, आध्यात्मिक ऊर्जेची प्रेरणा आणि सखोल सांस्कृतिक बांधिलकी यांचा अनोखा संगम लाभल्याचे त्यांनी नमूद केले. काशी घोषणापत्र अंतर्गत 125 हून अधिक आध्यात्मिक संस्था आणि अनेक स्वयंसेवी संस्थांच्या पाठबळामुळे जनकल्याणाच्या उद्देशाने सुरू झालेली ही संकल्पना आता यशस्वीपणे राष्ट्रीय प्रकल्प बनली आहे, असे मोदी म्हणाले.

अंमली पदार्थांविरोधातील शपथ घेणाऱ्या लाखो युवकांचे कौतुक करताना, पंतप्रधानांनी स्वतः व्यसनमुक्त राहण्याच्या तसेच आपल्या शाळा, महाविद्यालये आणि समाजात व्यसनमुक्त जीवनाचा संदेश सक्रियपणे पोहोचवण्याच्या त्यांच्या दृढ संकल्पाची प्रशंसा केली. मोहिमेच्या महत्त्वाकांक्षी 100 आठवड्यांच्या आराखड्याची माहिती देताना त्यांनी सांगितले की, येणाऱ्या प्रत्येक रविवारी कला, संस्कृती, क्रीडा आणि ध्यानधारणा यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करून नव्या सहभागींचा सातत्याने सहभाग सुनिश्चित केला जाईल. "पुढील 100 रविवार हे पूर्णपणे व्यसनमुक्त भारताच्या दिशेने टाकली जाणारी 100 भक्कम पावले ठरतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना  सदस्य आणि `माय भारत` स्वयंसेवक यांच्या विशाल ऑनलाइन मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधानांनी देशातील युवकांनी दाखविलेली जागरूकता , संवेदनशीलता  आणि गंभीर समर्पणाबद्दल अभिमान व्यक्त केला. 'अमृत पिढी' म्हणून  भारताच्या   युवकांचा उल्लेख करत ते म्हणाले की, देशाला 2047 पर्यंतच्या विकासाच्या उद्दिष्टांकडे नेण्यासाठी त्यांची ऊर्जा, कल्पकता आणि प्रतिभा अत्यंत महत्त्वाची आहे. "देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि तुमच्या स्वतःच्या आयुष्यासाठी, स्वतःला व्यसनापासून पूर्णपणे दूर ठेवणे अत्यावश्यक आहे," असे त्यांनी अधोरेखित केले.

आजचे युवक स्टार्टअप, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्रीडा आणि अंतराळ संशोधन अशा क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करत असताना, दुसरीकडे अंमली पदार्थांच्या व्यसनाचे विध्वंसक परिणाम किती घातक आहेत, याची तुलना करत पंतप्रधानांनी इशारा दिला की, व्यसनामुळे व्यक्तीचे लक्ष विचलित होते आणि स्वप्ने उद्ध्वस्त होतात. पालकांची स्वप्ने चुरडली जाणे, ज्येष्ठांना दररोज मानसिक वेदना सहन कराव्या लागणे अशा प्रकारे कुटुंबांवर होणाऱ्या गंभीर परिणामांचे उदाहरण देत त्यांनी समाजावर होणाऱ्या व्यापक दुष्परिणामांवरही भर दिला. "जेव्हा एखाद्या कुटुंबात किंवा समाजात असा विनाश घडतो, तेव्हा संपूर्ण राष्ट्राची एकूण शक्तीही मूलभूतपणे कमकुवत होते," असे मोदी यांनी नमूद केले.

अमली पदार्थांच्या फसव्या स्वरूपाबाबत युवकांना सावध करताना,  पंतप्रधान म्हणाले की, अमली पदार्थांमुळे मिळणारा तात्पुरता उत्साह  अखेरीस त्यांच्या कारकीर्दीवर आणि कौटुंबिक जीवनावर कायमस्वरूपी विपरीत परिणाम घडवून आणतो. भारतीय संस्कृती, आध्यात्मिक गुरूंच्या शिकवणी तसेच श्री गुरु ग्रंथ साहिबमधील विशिष्ट शिकवणींचा संदर्भ देत, ते म्हणाले की,  मनावर परिणाम करणाऱ्या अमली पदार्थांना आपल्या समाजाने कायमच नाकारले  आहे.  कोणत्याही परिस्थितीत नशेला कोणत्याही प्रकारची सामाजिक मान्यता देता कामा नये, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.

व्यसनमुक्तीसाठी उपलब्ध असलेल्या सर्वसमावेशक सहाय्य व्यवस्थेची माहिती देताना, सामाजिक सहकार्य, योग, ध्यान आणि आधुनिक व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्रे व्यसनावर मात करण्यासाठी प्रभावी ठरत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सामाजिक प्रतिष्ठेबाबतच्या चुकीच्या समजुतींपेक्षा वैद्यकीय उपचारांना प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी कुटुंबांना केले. तसेच, मुलांना व्यसनाच्या विळख्यात अडकण्यापासून रोखण्यासाठी घरामध्ये मोकळ्या संवादाची संस्कृती जोपासण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. एखादा युवक चुकून व्यसनाच्या आहारी गेला, तरी त्याच्या आयुष्यातील सर्व मार्ग कायमचे बंद झाले आहेत, असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही, असे  मोदी यांनी ठामपणे सांगितले.

महाविद्यालये आणि विद्यापीठांतील प्राध्यापकांना विशेष आवाहन करताना, नियमित अध्यापनामध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांवरील चर्चेचा सक्रियपणे समावेश करण्याचे तसेच आपल्या परिसरात व्यसनविरोधी समर्पित चळवळी सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले. व्यसनमुक्तीच्या प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या व्यक्तींकडे लक्ष वेधत, त्यांच्या भूतकाळाशी संबंधित सामाजिक कलंक पूर्णपणे नाकारून, अशा व्यक्तींना समाजाने सन्मान आणि आयुष्यात नवी  संधी द्यावी, असे त्यांनी सांगितले. व्यसनाशी संघर्ष करून त्यातून बाहेर पडणारे युवक कमकुवत नसतात; ते खरे योद्धे असून, त्यांचे अद्वितीय धैर्य हीच त्यांची खरी ओळख आहे, असे मोदी यांनी नमूद केले.

या महत्त्वाच्या लढाईत सरकार युवकांच्या खंबीरपणे पाठीशी उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली. देशभरात अभूतपूर्व कारवाया करून हजारो कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचा तसेच अमली पदार्थांचे विक्रेते आणि तस्करांविरुद्ध अटकेची कारवाई मोठ्या प्रमाणात वाढल्याचा उल्लेख त्यांनी केला. तरुण पिढीच्या जिद्दीवर आणि सामर्थ्यावर दृढ विश्वास व्यक्त करत, या राष्ट्रीय उपक्रमाला उल्लेखनीय यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपले युवक व्यसनापासून दूर राहून आपली ऊर्जा जपतील आणि विकसित भारताच्या संकल्पाला पुढे नेतील, असा मला ठाम विश्वास आहे, असे सांगत मोदी यांनी आपले मनोगत संपवले.

***

सुषमा काणे/वैभवी जोशी/नितीन गायकवाड/राज दळेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2293441) आगंतुक पटल : 25
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Bengali , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam