नौवहन मंत्रालय
'विकसित भारत 2047'च्या उद्दिष्टपूर्तीसाठी सागरी क्षमता विस्ताराला वेग
प्रविष्टि तिथि:
30 JUL 2026 9:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जुलै 2026
बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय 'विकसित भारत 2047'च्या उद्दिष्टपूर्तीसाठी आपल्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करत आहे. क्षमता विस्तार, खाजगी गुंतवणुकीला चालना, डिजिटलीकरण आणि सागरी निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन यांवर विशेष भर देत भारत, बंदरे, अंतर्गत जलमार्ग आणि जहाजबांधणी क्षेत्रातील गुंतवणुकीला गती देत आहे.
मंत्रालयाच्या 'विकसित भारत 2047' उद्दिष्टांच्या प्रगतीचा उच्चस्तरीय आढावा घेताना केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी अधिकाऱ्यांना कालमर्यादेचे काटेकोर पालन करत प्रमुख प्रकल्पांची अंमलबजावणी अधिक वेगाने करण्याचे निर्देश दिले. भारताची दीर्घकालीन सागरी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मंत्रालय, प्रमुख बंदरे आणि भारतीय अंतर्गत जलमार्ग प्राधिकरण यांच्या अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
विविध कामगिरी निर्देशांकांमध्ये मंत्रालयाने उल्लेखनीय प्रगती साधली असताना हा आढावा घेण्यात आला. भारताने जहाज पुनर्वापर (शिप रिसायकलिंग) क्षेत्रात जगातील अग्रगण्य देश म्हणून आपले स्थान अधिक बळकट केले आहे. तसेच, अंतर्गत जलमार्गावरील मालवाहतुकीने 200 दशलक्ष टनांचा टप्पा आधीच पार केला असून, 'मॅरिटाइम इंडिया व्हिजन 2030'मध्ये निर्धारित करण्यात आलेले उद्दिष्ट नियोजित वेळेच्या कित्येक वर्षे आधीच गाठले आहे.
"धोरण, प्रभावी अंमलबजावणी आणि सांघिक प्रयत्न यांचा संगम झाल्यास भारत कोणती उंची गाठू शकतो, याचे हे यश उत्तम उदाहरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली सागरी क्षेत्र भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा एक भक्कम आधारस्तंभ म्हणून उदयास आले आहे. आपण याच ध्येयाने कार्य करत राहिले पाहिजे. पंतप्रधानांनी दिलेल्या गती आणि व्यापकता या मंत्रानुसार काम करून 'विकसित भारत 2047' अंतर्गत प्रत्येक टप्पा निर्धारित कालमर्यादेत पूर्ण होईल, याची खात्री केली पाहिजे," असे सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितले.
भविष्यासाठी नियोजन करताना जागतिक घडामोडी आणि त्यातून मिळालेल्या धड्यांचा विचार करण्याचे आवाहन मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केले. या अनुभवांच्या आधारे संस्थात्मक लवचिकता अधिक बळकट करण्यावर त्यांनी भर दिला."बदलत्या भू-राजकीय परिस्थितीमुळे केवळ विकास नव्हे, तर लवचिकताही तितकीच महत्त्वाची असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्येक आव्हान अधिक सक्षम व्यवस्था उभारण्याची, क्षमता वाढवण्याची आणि भारताला भविष्यासाठी अधिक सज्ज करण्याची संधी देते. आपले नियोजन जागतिक अनिश्चिततेचा वेळीच अंदाज घेणारे असावे, जेणेकरून भारताचा विकासाचा मार्ग योग्य दिशेने कायम राहील," असे सोनोवाल म्हणाले.
सोनाली काकडे/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2292116)
आगंतुक पटल : 8