आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
azadi ka amrit mahotsav

ओडिशा आणि झारखंडमधील चार जिल्ह्यांमध्ये दोन बहु-मार्ग प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, भारतीय रेल्वेचे सध्याचे जाळे सुमारे 145 किमीने विस्तारणार


प्रकल्पाचा एकंदर अंदाजित खर्च 3,907 कोटी असून, तो, 2030-31 पर्यंत पूर्ण होणार

प्रविष्टि तिथि: 15 JUL 2026 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,15 जुलै 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने आज रेल्वे मंत्रालयाच्या दोन प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांचा एकंदर खर्च अंदाजे 3,907 कोटी रुपये आहे. या प्रकल्पांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे.

अ.  पारादीप – हरिदासपूर – दुहेरी मार्ग

ब. राजखरसावन – डांगोआपोसी – चौथी मार्गिका

या विस्तारित क्षमतांमुळे रेल्वेवाहतुकीच्या गतीत लक्षणीय सुधारणा होईल, ज्यामुळे भारतीय रेल्वेच्या कार्यक्षमतेत आणि सेवेच्या विश्वासार्हतेत वाढ होईल. या बहुमार्गी प्रकल्पांचे प्रस्ताव रेल्वेचे  कामकाज सुधारण्यास आणि प्रवाश्यांची गर्दी कमी करण्यासाठी लाभदायक ठरतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नव भारत’ संकल्पनेशी हे प्रकल्प सुसंगत असून, या क्षेत्रातील नागरिकांना ते ‘आत्मनिर्भर’ बनवतील आणि त्यांच्या रोजगार तसंच स्वयं रोजगाराच्या संधींमध्ये यामुळे वाढ होईल.

या प्रकल्पांचे  नियोजन  पीएम गती-शक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्यानुसार करण्यात आले  असून, एकात्मिक नियोजन आणि भागधारकांशी सल्लामसलत करून बहुमार्गी संपर्क व्यवस्था आणि पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले  आहे. हे प्रकल्प नागरिक, वस्तू आणि सेवा यांची सुरळीत वाहतूक प्रदान करतील.

ओडिशा आणि झारखंड राज्यातील चार जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या  दोन (2) प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेचे सध्याचे जाळे सुमारे 145 किलोमीटरने विस्तारणार आहे.

प्रस्तावित बहु-मार्ग (मल्टी-ट्रॅकिंग) प्रकल्पामुळे सुमारे 14 लाख लोकसंख्या असलेल्या साधारण 1,526 गावांची संपर्क-व्यवस्था सुधारणार आहे.

प्रस्तावित क्षमता वाढीमुळे ललितगिरी बौद्ध संकुल, श्री बलदेवजू मंदिर आणि मेघहातुबुरू टेकड्या इत्यादींसह देशभरातील अनेक प्रमुख पर्यटन स्थळांशी रेल्वे संपर्क व्यवस्था सुधारेल.

प्रस्तावित प्रकल्प हे, कोळसा, लोह खनिज, डोलोमाईट, चुनखडी आणि जिप्सम यांसारख्या मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचे मार्ग आहेत. या मार्गांवरील वाहतूक क्षमता वाढल्यामुळे वार्षिक  44 दशलक्ष टनांची (MTPA) अतिरिक्त वाहतूक शक्य होणार आहे. रेल्वे हे पर्यावरणपूरक आणि उर्जा कार्यक्षम वाहतूक पद्धती असल्याने, ती हवामानविषयक उद्दिष्टे साध्य करण्यास तसेच देशाचा पुरवठासाखळी वरील  खर्च कमी करण्यास मदत करेल. याबरोबरच, तेलाच्या आयातीत 6 कोटी लिटर आणि कार्बन उत्सर्जनात 29 कोटी किलोंची घट होईल, जे, 1 कोटी झाडांच्या लागवडीसमान आहे.

शैलेश पाटील/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर


 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2285042) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam