विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

10 ते 19 सप्टेंबर 2026 दरम्यान देशव्यापी 'स्वच्छ सागर, सुरक्षित सागर' किनारपट्टी स्वच्छता अभियानासाठी विज्ञान मंत्रालयांची तयारी सुरु ; वैज्ञानिक उपक्रमांचे लोकचळवळीत रूपांतर करण्यासाठी अधिक समन्वयाचे डॉ. जितेंद्र सिंह यांचे आवाहन

प्रविष्टि तिथि: 12 JUL 2026 1:54PM by PIB Mumbai


केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, तसेच पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, तक्रार निवारण व पेन्शन, अणुऊर्जा आणि अंतराळ मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज केंद्र सरकारच्या विज्ञान मंत्रालयातील व विविध विभागांमधील सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. राष्ट्रीय प्राधान्यक्रम  वेगाने पूर्ण करण्यासाठी वैज्ञानिक संस्थांनी आपापसात उत्तम समन्वय ठेवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. येत्या 10 ते 19 सप्टेंबर 2026 या कालावधीत देशभरात 'स्वच्छ सागर, सुरक्षित सागर' ही किनारी स्वच्छता मोहीम राबवली जाणार असून, सध्या तिची जय्यत तयारी सुरू आहे. देशावर याचा सकारात्मक आणि जास्तीत जास्त प्रभाव पडण्यासाठी वैज्ञानिक संस्थांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे; जेणेकरून तंत्रज्ञान नवोन्मेष , लोकसहभाग आणि विविध विभागांमधील परस्पर सहकार्य यांचा योग्य मेळ घालता येईल असे ते म्हणाले.

मागील समन्वय बैठकीत घेतलेल्या निर्णयांवर करण्यात आलेल्या उपाययोजनांचा मंत्र्यांनी आढावा घेतला. वैज्ञानिक विभागांनी स्वतंत्र किंवा तुटक संस्था म्हणून काम न करता, एकात्मिक व्यवस्थेचा भाग म्हणून एकत्र काम केले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. वैज्ञानिक नवसंशोधनाला गती देण्यासाठी, प्रशासनात सुधारणा करण्यासाठी आणि वैज्ञानिक उपलब्धींचा थेट लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध मंत्रालयांधील नियमित संवाद, ज्ञानाची देवाणघेवाण, संयुक्त उपक्रम आणि समन्वित अंमलबजावणी अत्यंत उपयुक्त ठरेल, असे ते म्हणाले.

या मोहिमेच्या माध्यमातून वैज्ञानिक संस्था, शासकीय यंत्रणा, स्वयंसेवक, शैक्षणिक संस्था आणि स्थानिक समुदाय एकत्र येणार असून, देशातील अत्यंत मोठ्या किनारपट्टी स्वच्छता मोहिमांपैकी ही एक असेल अशी  अपेक्षा आहे.
या बैठकीत विविध विज्ञान मंत्रालयांच्या संवाद व प्रसिद्धी धोरणाचाही आढावा घेण्यात आला, जेणेकरून गेल्या बारा वर्षांतील आणि विशेषतः सध्याच्या सरकारच्या गेल्या दोन वर्षांतील उल्लेखनीय कामगिरी  जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल.

***

सुषमा काणे/वैभवी जोशी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2283860) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Tamil , English , Urdu , हिन्दी , Gujarati , Malayalam