पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी इंडोनेशियाच्या संसदेला केले संबोधित
प्रविष्टि तिथि:
07 JUL 2026 6:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,7 जुलै 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जकार्ता येथे इंडोनेशियाच्या संसदेला संबोधित केले. इंडोनेशियाच्या संसदेला संबोधित करणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत.
पंतप्रधानांनी आपल्या संबोधनाची सुरुवात इंडोनेशियाचे अध्यक्ष महामहीम प्रबोवो सुबियांतो यांच्या सन्माननीय उपस्थितीबद्दल त्यांचे, आणि संसदेच्या अध्यक्षा महामहीम पुआन महारानी यांनी दिलेल्या अगत्यपूर्ण आमंत्रणाबद्दल व भारत-इंडोनेशिया भागीदारीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आभार मानून केली. भारताच्या 1.4 अब्ज जनतेच्या वतीने खासदारांना शुभेच्छा देताना ते म्हणाले की, 'लोकशाहीची जननी' या नात्याने भारत इंडोनेशियासोबतचे लोकशाही संबंध अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक आहे. दोन्ही देशांमधील सखोल सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सागरी संबंध अधोरेखित करत, दोन सहस्रकांहून अधिक काळ हिंदी महासागराने विचार, व्यापार, संस्कृती आणि श्रद्धेच्या देवाणघेवाणीद्वारे भारत आणि इंडोनेशियाला जोडले असल्याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. 'वसुधैव कुटुंबकम्' आणि 'भिन्नेक तुंगल इका' (विविधतेत एकता) या दोन्ही देशांच्या समान आदर्शांचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट केले की, ही मूल्ये आजही दोन्ही देशांमधील भागीदारीला दिशा देत आहेत. ते पुढे म्हणाले की, समान ऐतिहासिक प्रवास, समान आव्हाने आणि दोन्ही देशांतील जनतेच्या समान आकांक्षा यामुळे भारत आणि इंडोनेशिया नैसर्गिक आणि विश्वासू भागीदार म्हणून एकत्र आले आहेत
भारताच्या विकासाचा प्रवास आणि 'विकसित भारत 2047' आणि 'गोल्डन इंडोनेशिया 2045' (इंडोनेशिया एमास 2045) या संकल्पनांमधील परस्पर पूरकतेला अधोरेखित करत, पंतप्रधानांनी व्यापार, गुंतवणूक, कनेक्टिव्हिटी, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये अधिक सखोल सहकार्याचे आवाहन केले.
ग्लोबल साउथ'चा आवाज मजबूत करण्यासाठी आणि मुक्त, खुल्या, सर्वसमावेशक तसेच नियमांवर आधारित हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी इंडोनेशियासोबत काम करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. शतकानुशतके जुन्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांना अनुसरून, पंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंधांसाठी 'गंगा-महाकाम संकल्पनेवर' आधारित भारत-इंडोनेशिया संबंधांमध्ये एका नवीन प्रारंभाचे आवाहन केले. या दृष्टिकोनाचा एक भाग म्हणून त्यांनी नमूद केले की, दोन्ही देशांनी आपल्या सांस्कृतिक जोडणीला अधिक मजबूत केले पाहिजे; आपले विकास मार्ग एकमेकांसोबत सामायिक केले पाहिजेत; सुरक्षा आणि धोरणात्मक विश्वास वाढवला पाहिजे; सागरी समृद्धीसाठी काम केले पाहिजे; आणि 'ग्लोबल साउथ'चा आवाज अधिक बुलंद केला पाहिजे.
या संबोधनाने भारत आणि इंडोनेशियामधील दीर्घकालीन सांस्कृतिक-ऐतिहासिक बंध आणि समान लोकशाही मूल्यांना अधोरेखित केले, तसेच आपली 'सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी' अधिक दृढ करण्याच्या दोन्ही देशांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
सुषमा काणे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2282154)
आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam