गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते गुजरातमधील गांधीनगर येथील कलोल आणि गांधीनगर (उत्तर) विधानसभा मतदारसंघात 340 कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लोकसंख्याशास्त्रीय बदलाबाबत उच्चस्तरीय समितीची स्थापना केली असून देशातील प्रत्येक घुसखोराची ओळख पटवून त्याला देशाबाहेर पाठवले जाईल: गृहमंत्री अमित शाह
अजून वेळ गेली नाही, घुसखोरांनी आपणहून परत जावे, स्वेच्छेने परत जाणाऱ्यांविरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही: गृहमंत्री अमित शाह
बांगलादेशबरोबरच्या सीमेवरील कुंपण आणि घुसखोरी-विरोधी पायाभूत सुविधांना सरकारचे प्राधान्य असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन
वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांना आदरांजली वाहिली
वीर सावरकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित केले, ब्रिटिशांनी ज्याला केवळ एक 'बंड' म्हटले होते, त्याला सावरकर यांनी '1857 चे पहिले स्वातंत्र्यसमर’ असे नाव दिले: गृहमंत्री अमित शाह
Posted On:
28 MAY 2026 8:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मे 2026
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज गुजरातमधील गांधीनगर येथील कलोल आणि गांधीनगर (उत्तर) विधानसभा मतदारसंघातील 340 कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्यांनी यावेळी एका प्राथमिक शाळेचे उद्घाटनही केले.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी थोर स्वातंत्र्यसेनानी वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. ते म्हणाले की, वीर सावरकर हे असे देशभक्त होते की, ज्यांना योग्य तो सन्मान देणे विरोधी पक्षांच्या सरकारांनी कधीही आवश्यक मानले नाही. त्यांना 'वीर' ही उपाधी कुठल्या सरकारने नव्हे तर लोकांनी दिली होती. देशभरात कोणीही त्यांचा केवळ ‘विनायक दामोदर सावरकर’ असा उल्लेख करत नाही, तर देशातील प्रत्येक बालक 'वीर सावरकर' म्हणूनच त्यांचे स्मरण करते, त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रासाठी समर्पित केले, असे शाह यांनी सांगितले.

वीर सावरकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतमातेला ब्रिटिश राजवटीपासून मुक्त करण्यासाठी समर्पित केले. विनायक दामोदर सावरकर यांनी दिलेल्या प्रेरणेने भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. ब्रिटिशांनी 1857 च्या स्वातंत्र्यलढ्याचे वर्णन केवळ एक 'बंड' असे केले, तर वीर सावरकर यांनी ‘1857 चे स्वातंत्र्यसमर’ या नावाचे पुस्तक लिहिले. वीर सावरकर यांनी अस्पृश्यतेविरोधातही व्यापक कार्य केले आणि भारतीय भाषांच्या प्रसारासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. वीर सावरकर यांनी पतीत पावन मंदिराची स्थापना केली आणि त्याची दारे सर्व समुदायांसाठी खुली केली, असे शाह म्हणाले.

ते म्हणाले की, बांग्लादेश बरोबरच्या सीमेवर कुंपण घालणे आणि घुसखोरी विरोधात पायाभूत सुविधा विकसित करणे याला आमच्या सरकारचे प्राधान्य आहे. देशातील प्रत्येक घुसखोराला देशाबाहेर काढण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसंख्याशास्त्रीय बदलांवर उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. ही समिती देशभरात होत असलेल्या कृत्रिम लोकसंख्याशास्त्रीय बदलांचा, त्यामागील कारणांचा आणि ते रोखण्यासाठी उपाययोजनांचा सर्वसमावेशी अभ्यास करणार आहे. या उद्देशासाठी कोणताही कायदा करण्याची गरज भासल्यास, समिती त्यानुसार शिफारशीदेखील करेल. तसेच, समिती एका वर्षाच्या आत अहवाल सादर करेल आणि कृत्रिम लोकसंख्याशास्त्रीय बदल रोखण्यासाठी सरकार त्यानुसार खंबीरपणे काम करेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात वेगाने विकास होत आहे याचा पुनरुच्चारअमित शाह यांनी केला.

* * *
सोनाली काकडे/राजश्री आगाशे/पर्णिका हेदवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2266399)
अभ्यागत कक्ष : 11