पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकातील बंगळुरू इथे आयोजित द आर्ट ऑफ लिविंगच्या 45 व्या वर्धापन दिन सोहळ्यात सहभागी
बंगळुरूचे वातावरण आणि इथला परिसर वैशिष्टपूर्ण आणि आगळावेगळा, जागतिक पातळीवर हे शहर सॉफ्टवेअर आणि सेवा क्षेत्रासाठी ओळखले जाते, त्यासोबतच भारताची सांस्कृतिक ओळख, अधात्म आणि आध्यात्मिक जाणिवेलाही नवी उंची गाठून देणारे शहर अशीही या शहराची आणखी एक ओळख : पंतप्रधान
सेवा परमो धर्म: हा आपल्या समाजाचे नैसर्गिक स्वभाव वैशिष्ट्य आहे : पंतप्रधान
स्वच्छ भारत अभियान म्हणजे केवळ सरकारी कार्यक्रम नाही, तर हे अभियान लोकांच्या जीवनाचा एक नैसर्गिक भाग बनले आहे, आता सामुदायिक शक्तीच्या बळावर हे अभियान पुढे वाटचाल करत आहे : पंतप्रधान
मानसिकदृष्ट्या शांत चित्ताचे असलेल्या, सामाजिकदृष्ट्या जबाबदार असलेल्या आणि समाजाप्रती संवेदनशील असलेल्या युवा वर्गाच्या माध्यमातूनच विकसित भारतचे स्वप्न प्रत्यक्षात साकार केले जाऊ शकते : पंतप्रधान
Posted On:
10 MAY 2026 2:20PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक मधील बंगळुरू इथे आयोजित द आर्ट ऑफ लिविंगच्या 45 व्या वर्धापन दिन सोहळ्यात सहभागी झाले. हा सोहळा म्हणजे मंगलमय प्रसंग असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. सोहळ्याच्या आजच्या दिवशी सकाळी मुलांनी गायलेले वैदिक मंत्र, भगवान श्री गणेशाचे दर्शन, श्री श्री रविशंकर जी यांचे 70 वे वर्ष आणि आर्ट ऑफ लिविंगच्या स्थापनेचा 45 वा वर्धापन दिन, अशा अनेक सुखद घडामोडींमुळे आजची सकाळ समृद्ध झाल्याचे त्यांनी नमूद केले. हे क्षण सदैव आपल्या स्मरणात राहतील अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी आर्ट ऑफ लिंविंगच्या परिसरात उभारलेल्या भव्य ध्यान मंदिराचेही उद्घाटन झाले. अशा प्रकारची समर्पित संस्था अत्यंत महत्त्वाची असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली, यानिमित्त त्यांनी आर्ट ऑफ लिविंग समूहाला त्यांच्या या नवीन वास्तूसाठी शुभेच्छाही दिल्या. जेव्हा संकल्पात स्पष्टता असते आणि सेवेच्या भावनेने काम केले जाते, त्यावेळी प्रत्येक प्रयत्नाचे सुखद फळ लाभते असे पंतप्रधानांनी सांगितले.
बंगळुरूच्या वैशिष्ट्यपूर्ण वातावरणाचेही पंतप्रधानांनी कौतुक केले. जागतिक पातळीवर केवळ सॉफ्टवेअर आणि सेवा क्षेत्र हीच या शहराची ओळख नाही, तर त्या ही पलिकडे भारताची सांस्कृतिक ओळख आणि आध्यात्मिक भावनेला नवी उंची गाठून देण्यासाठीही हे शहर ओळखले जात असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यात्म आणि आध्यात्मिक जाणीवेला देखील या शहराने नवीन उंची गाठून दिली असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
योगाभ्यास, ध्यानधारणा आणि प्राणायामाची मूळे इथे खोलवर रुजली आहेत, आणि ती भारताच्या मूल्यांचा अविभाज्य भाग आहेत ही बाब पंतप्रधानांनी नमूद केली. भारताच्या आध्यात्मिक वारशाचा जागतिक प्रभाव आणि अनेक संस्थांना प्रेरणा देण्यात या वारशाने बजावलेल्या भूमिकेचाही त्यांनी उल्लेख केला. आज जगभरातील लोकांवर भारताच्या आध्यात्मिक मूल्यांचा मोठा प्रभाव आहे, इतकेच नाही, तर भारताच्या अनेक संस्था देखील या प्राचीन मूल्यांतून प्रेरित झाल्या आहेत असे पंतप्रधानांनी सांगितले.
याच प्राचीन आध्यात्मिक मूल्यांपासून प्रेरणा घेत श्री श्री रविशंकर यांनी 45 वर्षांपूर्वी आर्ट ऑफ लिविंगचे बीज रोवले होते, आणि आता ते एका विशाल वटवृक्षात रूपांतरीत झाले असल्याचे स्मरण त्यांनी उपस्थितांना करून दिले. आज ही संस्था आपल्यासमोर एका विशाल वटवृक्षाच्या रूपात उभी आहे, या संस्थेच्या हजारो शाखा जगभरातील असंख्य लोकांच्या जीवनाला स्पर्श करत आहेत असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
भाषा, परंपरा, चालीरिती आणि उपासना पद्धतींचा समावेश असलेल्या भारताच्या समृद्ध विविधतेचे दर्शन अधोरेखित करतानाच या सर्व सुंदर विविधतेला एकत्र कशाने बांधून ठेवले आहे? असा मूलभूत प्रश्न पंतप्रधानांनी उपस्थित केला."याचे उत्तर स्वार्थी न होता परमार्थी होणे- स्वतःसाठी नव्हे तर दुसऱ्यांसाठी जगणे" असल्याचे मोदी यांनी नमूद केले.
पुराणातील प्राचीन शहाणीवेचा संदर्भ देताना, पंतप्रधानांनी दुसऱ्याची सेवा करणे हा गुण आहे तर दुसऱ्याच्या दुःखाचे कारण होणे हे पाप आहे, असे सांगून सेवा हाच भारतीय समाजाचा नैसर्गिक स्वभाव असल्याचे नमूद केले. "सेवा परमो धर्म: हा आपल्या समाजाचा नैसर्गिक स्वभाव आहे." असे प्रतिपादन त्यानी केले.
भारतातील अनेक अध्यात्मिक चळवळी मानवतेच्या सेवेसाठीच कार्यरत होत्या, हे नमूद करतानाच, पंतप्रधानांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रत्येक प्रयत्नांमध्ये हीच भावना प्रतिबिंबित होताना पाहून आनंद व्यक्त केला. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रवासाशी निगडीत असलेल्या प्रत्येक स्वयंसेवकाला मनःपूर्वक शुभेच्छा देताना, पंतप्रधानांनी त्यांचे समर्पण आणि सेवाभावी वृत्तीची प्रशंसा केली.
कोणत्याही मोहिमेच्या यशासाठी सामाजिक सहभाग आवश्यक आहे, यावर भर देताना, महत्त्वाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सामाजिक ताकद जागृत करणे ही मूलभूत गोष्ट असल्याचे सांगितले. राजकीय व्यवस्था आणि सरकारे यांच्यापेक्षा समाजात अधिक ताकद आहे आणि जोपर्यंत समुदाय राष्ट्र उभारणीत सक्रिय सहभाग घेत नाही तोपर्यंत कोणतेही प्रशासन खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकत नाही, हा अनुभवातून आलेला दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्वच्छ भारत मोहिमेचे उदाहरण देत, सरकारी उपक्रम म्हणून सुरू झालेले अभियान आता लोकांच्या जगण्याचा अविभाज्य घटक बनले आहे आणि समाजाच्याच गतीने ते पढे जात आहे असे त्यांनी सांगितले. समाज शक्तीचे बळ मिळाल्यानंतर कोणतीही मोहीम यशस्वी होते, यावर भर देताना मोदी म्हणाल, “ अशा प्रत्येक महत्त्वाच्या मोहिमेसाठी सामाजिक ताकद जागृत करणे अत्यंत आवश्यक असते .
राष्ट्रासमोरील मोठमोठ्य आव्हानांवर सामूहिक उपाय शोधण्यात समाजाचा सक्रिय सहभाग अवश्यक करत असल्याचे अधोरेखित करतानाच, आर्ट ऑफ लिव्हिंग संघटनेने सातत्याने आपल्या विविध उपक्रमांमध्ये सामाजिक शक्तीचा योग्य वापर केल्याबद्दल या संघटनेची प्रशंसा केली. . संस्थेच्या वृक्षारोपण मोहिमा, ग्रामीण स्मार्ट व्हिलेज केंद्रे, महिला आणि आदिवासी सक्षमीकरण उपक्रम किंवा कारागृहातील व्यक्तींसाठीचे मानसिक आरोग्य कार्यक्रम अशा विविध विकास कामांमधील संस्थेच्या सामाजिक दृष्टीकोनाची त्यांनी प्रशंसा केली."हे प्रयत्न देशाच्या आणि समाजाच्या विकास प्रवासात महत्त्वाचे योगदान देतात," असेही मोदी यांनी नमूद केले.
प्रत्येक व्यक्तीने युवकांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य दिल्याबद्दल उपस्थितांचे त्यांनी कौतुक केले, विशेषतः आजची वैज्ञानिक प्रगती आणि नवनिर्मितीमुळे जागतिक स्तरावर वेगाने बदल घडत असताना तसेच या विषयावर लक्ष केंद्रित करण्याची गरजही अधोरेखित केली.भारत केवळ या बदलांमध्ये सहभागीच नाही तर अनेक क्षेत्रांमध्ये नेतृत्वही करत आहे. विशेषतः डिजीटल व्यवहार, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि स्टार्टअप परिसंस्था या क्षेत्रांमध्ये भारतानं लक्षणीय यश संपादित केल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. भारतातील तरुण अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर असून, सर्व राष्ट्रीय यशोगाथांमध्ये त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. "भारत केवळ या बदलांमध्ये सहभागीच होत नाहीये, तर अनेक क्षेत्रांमध्ये तो नेतृत्वही करत आहे," असे श्री मोदी यांनी नमूद केले. या यशाचे श्रेय भारतातील तरुणांना देत, पंतप्रधान महोदयांनी आधुनिक काळातील आव्हानांवर उपाय शोधण्यात तरुणांना मदत करण्यामध्ये 'आर्ट ऑफ लिव्हिंग'ने बजावलेल्या भूमिकेचीही दखल घेतली.
तंत्रज्ञानामुळे दूरवर असलेल्या व्यक्तींना क्षणार्धात जोडण्याची क्षमता निर्माण झाली असली, तरी प्रत्येक व्यक्तीने स्वतःशी जोडले जाणेही तितकेच आवश्यक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मानसिकदृष्ट्या शांत, सामाजिकदृष्ट्या जबाबदार आणि समाजाप्रती संवेदनशील युवक घडविण्यावरच विकसित भारताचे भविष्य अवलंबून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आध्यात्मिक माध्यमाने कल्याण, मानसिक आरोग्य, योग आणि ध्यान यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांची भूमिका यात अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगताना, या संस्था समाजात परस्पर संबंध, आपलेपणा आणि सामूहिक जबाबदारीची भावना निर्माण करतात, तसेच सांस्कृतिक समज वाढविण्याच्या संधीही उपलब्ध करून देतात, असे ते म्हणाले. “मानसिकदृष्ट्या शांत, सामाजिकदृष्ट्या जबाबदार आणि समाजाप्रती संवेदनशील अशा युवकांच्या बळावरच विकसित भारताची उभारणी होईल,” असे प्रतिपादन मोदी यांनी केले.
नव्याने उद्घाटीत करण्यात आलेले ध्यान मंदिर हजारो लोकांसाठी शांतता आणि मानसिक आरोग्याचे केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजाकडून राष्ट्राप्रती कर्तव्ये प्रभावीपणे पार पाडली जात असल्याचे गौरवोद्गार काढले. तसेच, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी काही महत्त्वपूर्ण आवाहने समाजासमोर मांडण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
भारताच्या सर्वांगीण विकासात आर्ट ऑफ लिविंग फाउंडेशन सारख्या संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीशी नाते अधिक घट्ट करण्यावर विशेष भर देण्याचे आवाहन केले. शाश्वत शेती हीच ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ची खरी अभिव्यक्ती असल्याचे सांगताना, रासायनिक घटकांपासून मातृभूमीचे संरक्षण करणे हे अध्यात्मिक साधनेसह पर्यावरण संवर्धनाचेही कार्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
“नैसर्गिक शेतीचा अवलंब करणे आणि रसायनांपासून धरतीमातेचे संरक्षण करणे, हे देखील ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च आहे,” असे मोदी यांनी प्रतिपादित केले.
“एक पेड माँ के नाम” या मोहिमेचा अधिक व्यापक विस्तार करण्याचे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण संरक्षणाचा संबंध थेट उत्तम जीवनशैलीच्या तत्त्वज्ञानाशी जोडला. “पर्यावरणाचे संरक्षण करणे हे देखील ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च आहे,” असे सांगत त्यांनी या अभियानासाठी नव्या उत्साहाने कार्य करण्याचे आवाहन केले.
“पर ड्रॉप, मोअर क्रॉप” या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकरी समुदायामध्ये अधिक प्रभावी जलव्यवस्थापन पद्धती रुजविण्याचे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजाच्या सहकार्यामुळे या प्रयत्नांना अधिक बळ मिळेल, असे सांगितले. येणारा पावसाळा लक्षात घेता जलसंवर्धनाबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी हा अत्यंत योग्य काळ असल्याचे त्यांनी नमूद केले. “पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे हे देखील ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च आहे,” असे मोदी यांनी सांगितले.
जबाबदार जीवनशैलीच्या या संकल्पनेचा विस्तार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीज बचत, सिंगल-यूज प्लास्टिकचा त्याग आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे या सर्व बाबींनाही ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या तत्त्वज्ञानाशी जोडले. निसर्गाशी संतुलन साधत अधिक जबाबदारीने आणि जागरूकतेने जीवन जगण्याचा संदेश देणाऱ्या केंद्र सरकारच्या मिशन लाईफ उपक्रमाचाही त्यांनी उल्लेख केला.
“निसर्गाशी संतुलन राखणारी जीवनशैली देखील ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च आहे,” असे मोदी यांनी नमूद केले. या महत्त्वपूर्ण विषयांना येत्या काळात संस्था अधिक प्राधान्य देईल, असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
***
राधिका अघोर/तुषार पवार/विजयालक्ष्मी साळवी साने/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2259532)
अभ्यागत कक्ष : 12
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam