पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आसाममधील कोकराझार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4,570 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकासकामांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी  


कोकराझार हे वैभवशाली बोडो संस्कृतीशी घट्ट जोडलेले आहे : पंतप्रधान

या कामांमुळे प्रदेशाचा विकास झपाट्याने होईल : पंतप्रधान

आज बोडोलँड शांतता आणि विकासाच्या मार्गावर आहे, तर आसाम शांतता आणि समृद्धीचे नवे पर्व लिहीत आहे : पंतप्रधान

सरकारने बोडो समाजाच्या श्रद्धा आणि परंपरांना राष्ट्रीय स्तरावर सन्मान दिला असून पारंपरिक धर्म ‘बाथौ’ याला विशेष सन्मान देण्यात आला आहे : पंतप्रधान

आसामच्या विकासाची गती वाढवणे आवश्यक आहे आणि जनतेच्या आशीर्वादाने ‘विकसित आसाम’ हे उद्दिष्ट साध्य होईल : पंतप्रधान

Posted On: 13 MAR 2026 4:31PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील कोकराझार येथे विविध विकासकामांची पायाभरणी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केली. हवामान खराब असल्यामुळे ते प्रत्यक्ष कोकराझारला जाऊ शकले नाहीत असे सांगून त्यांनी उपस्थित नागरिकांची मनापासून क्षमा मागितली. आपण गुवाहाटीहून संवाद साधत असल्याचे त्यांनी सांगितले. बोडोफा उपेंद्रनाथ ब्रह्मा आणि रूपनाथ ब्रह्मा अशा या भूमीतील महान व्यक्तिमत्त्वांना आपण अभिवादन केल्याचे ते म्हणाले.इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी लोकांचा ऋणी आहे आणि याची परतफेड या लोकांची सेवा आणि प्रदेशाचा विकास करून मी करेन असे पंतप्रधानांनी नमूद केले.

गुवाहाटीच्या आधीच्या भेटीत बागुरुंबा दाहौ उत्सवात बोडो संस्कृती अनुभवता आल्याचे त्यांनी सांगितले.  बोडो समाजाने आपली भाषा, वारसा आणि परंपरा जपली आहे, याचे मोठे श्रेय त्यांना जाते, असे ते म्हणाले.  बाथौसारख्या आध्यात्मिक परंपरा आणि बैसागूसारखे उत्सव भारताच्या सांस्कृतिक सामर्थ्यात भर घालतात. या परंपरा भारताच्या सांस्कृतिक ताकदीला अधिक बळ देतात, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले.

 आसामच्या वारशाचे जतन आणि त्याच्या वेगवान  प्रगतीसाठी ‘डबल इंजिन सरकार’ वचनबद्ध आहे, असे ते म्हणाले.या कार्यक्रमात 4,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली. त्यापैकी 1,100 कोटी रुपये बोडोलँड मधील रस्त्यांचे जाळे सुधारण्यासाठी राखीव आहेत. आसाम माला अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यामुळे राज्यातील संपर्क व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडणार आहेत. या उपक्रमांमुळे आसामची रस्ते संपर्क व्यवस्था अधिक सक्षम होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

पंतप्रधान म्हणाले की या भागातील परिवहनाला   चालना देण्यासाठी त्यांनी अलीकडेच कामाख्या-चर्लापल्ली अमृत भारत एक्स्प्रेस तसेच गुवाहाटी-न्यू जलपायगुडी एक्स्प्रेस या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून त्यांच्या सेवेची सुरुवात केली.पंतप्रधान मोदी म्हणाले की हे वाहतूक प्रकल्प जनतेला अत्यावश्यक सुविधा प्रदान करतील आणि त्याच बरोबर व्यापार आणि पर्यटनाला देखील चालना देतील.सुधारित लॉजिस्टिक्स सेवेमुळे मोठ्या बाजारांपर्यंत पोहोचण्याची सुलभ सोय झाल्यामुळे शेतकरी सक्षम होतील याकडे त्यांनी निर्देश केला. या  परिवर्तनकारी विकास कार्यांची सुरुवात झाल्याबद्दल त्यांनी नागरिकांचे अभिनंदन केले. “शेतकऱ्यांचा शेतमाल प्रमुख बाजारांपर्यंत सुलभतेने पोहोचेल याची सुनिश्चिती हे प्रकल्प करून घेतील,” मोदी म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, गेल्या अनेक दशकांपासून कोकराझार आणि परिसराने प्रचंड त्रास आणि नुकसान सहन केले आहे. असाही एक काळ होता जेव्हा या डोंगरांमध्ये केवळ हिंसा आणि शस्त्रांच्या आवाजांचा प्रतिध्वनी यायचा असे त्यांनी सांगितले. आता ‘खाम’ आणि ‘सिफुंग’ सारख्या पारंपरिक वाद्यांच्या आवाजांनी आसमंत भरून जात असताना आता येथील वातावरण सलोख्याच्या दिशेने बदलत आहे याची पंतप्रधान मोदी यांनी दखल घेतली. बोडोलँड आणि आसाम हे भाग सध्या शांतता आणि समृद्धीचे नवे अध्याय लिहित आहेत असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. “आज बोडोलँड शांतता आणि विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहे,” असे ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की स्थानिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने आज बी.टी.आर. भागातील सहा महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांची कोनशीला ठेवण्यात आली आहे. रेल्वे वर्कशॉपच्या स्थापनेसह रेल्वे संपर्क  व्यवस्था सुधारण्यासाठी महत्त्वाचे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत असे त्यांनी सांगितले. या भागाला भूतानशी जोडणारी आगामी रेल्वे लिंक तसेच विविध स्थानकांचे आधुनिकीकरण यामुळे हा भाग लॉजिस्टिक्स केंद्रामध्ये परिवर्तीत होईल. वंदे भारत आणि राजधानी एक्स्प्रेस यांना कोकराझार मध्ये दिलेला थांबा या प्रदेशाच्या उंचावत जाणाऱ्या स्थितीचे प्रतीक आहे असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. “या प्रकल्पांमुळे, कोकराझार या भागातील व्यापाराचे प्रमुख केंद्र बनेल,” मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी हग्रमा मोहीलरी आणि हेमंत बिस्व सरमा यांच्या नेतृत्वाखालील चमूंचे विकासाप्रती त्यांच्या समर्पणवृत्तीबद्दल हार्दिक अभिनंदन केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, सध्याच्या सरकारने कायमस्वरूपी स्थैर्याला प्राधान्य दिले आहे. बोडो शांतता करार  ही सर्व प्रमुख संघटनांना एका मंचावर एकत्र आणणारी महत्त्वपूर्ण कामगिरी होती असे नमूद करून ते म्हणाले की हा समावेशक दृष्टीकोन म्हणजे भूतकाळातील राजकारणापासून दूर जाणे होय. “आम्ही सगळ्यांना एकत्र आणून स्थायी स्वरुपाच्या शांततेसाठी प्रामाणिक प्रयत्न केले,” असे मोदी म्हणाले.

सहाव्या अनुसूचीअंतर्गत 2003 मध्ये झालेल्या बीटीसीच्या स्थापनेचे स्मरण करून देत पंतप्रधान मोदी म्हणाले की सध्याच्या सरकारने दिलेला शब्द पाळण्याचे ट्रॅक रेकॉर्ड सिद्ध केले आहे.  

बोडोलँड विद्यापीठ आणि केंद्रीय तंत्रज्ञान संस्थेसारख्या संस्था या वचनबद्धतेची प्रचिती देत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. आपल्या डबल इंजिन सरकारने दिलेले प्रत्येक आश्वासन प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

2020 च्या बोडो करारांतर्गत दिलेली सर्व आश्वासने सरकार नियोजनबद्धरितीने पूर्ण करत आहे असे ते म्हणाले. दिलेल्या आश्वासनानुसार बोडो भाषेला सह अधिकृत भाषेचा (Associate Official Language) दर्जा दिला गेला आहे असे ते म्हणाले. 1,500 कोटी रुपयांचे विशेष विकास पॅकेज दिले गेले असून, त्यासोबतच नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. आधी बंडखोर म्हणून कार्यरत असलेल्या 10,000 जण मुख्य प्रवाहात सामील झाले, ही घडामोड या प्रदेशासाठीचा मोठा विजय आहे असे त्यांनी नमूद केले. युवा वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रत्येक आश्वासन आम्ही पूर्ण करत आहोत, असे त्यांनी सांगितले.

आपल्या सरकारने बोडो समुदायाच्या श्रद्धा आणि परंपरांना राष्ट्रीय ओळख मिळवून दिली आहे. बाथौ या पारंपारिक धारणेला उच्च सन्मान आणि स्वतंत्र जनगणना सांकेंतिक क्रमांक (Census code) दिला गेला अशी माहिती त्यांनी दिली. इथल्या आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या विविध स्थळांचा विकास आणि संवर्धन करण्यासाठी आर्थिक मदत दिली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. आदिवासी समुदायाला सांस्कृतिक ओळख मिळवून देण्यासाठी अशी पावले उचलणे अत्यंत महत्त्वाची होती ही बाब त्यांनी नमूद केली. बोडो समाजाच्या परंपरांना आता राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळू लागला असल्याचे त्यांनी सांगितले.

इथल्या जमिनींवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवलेल्यांकडून त्या जमिनी परत मिळवण्यासाठी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राबवलेल्या व्यापक मोहिमेबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. आसामच्या मूळ रहिवाशांना जमिनीचे कायदेशीर हक्क मिळवून देण्यात सध्याचे सरकार यशस्वी ठरले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. या महत्त्वाच्या मोहिमेला आदिवासी समुदायाने दिलेल्या सक्रिय पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसाही केली.

आसामला आत्मनिर्भर राज्य बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विकासाचा वेग अधिक वाढवला पाहिजे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. जनतेकडून सतत मिळत असलेल्या आशीर्वादाच्या बळावर विकसित आसामचा संकल्प निश्चितच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुरू केलेल्या सर्व नव्या प्रकल्पांच्या यशासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या. जनतेकडून मिळत असलेल्या आशीर्वादाच्या बळावर विकसित आसामचा संकल्प निश्चितपणे पूर्ण होईल, असे ते म्हणाले.

***

निलीमा चितळे/नेहा कुलकर्णी/ प्रज्ञा जांभेकर/संजना चिटणीस/तुषार पवार

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2239816) अभ्यागत कक्ष : 19