पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत 33,500 कोटी रुपयांच्या विविध विकासप्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण



आधुनिक आणि विकसित दिल्लीच्या उभारणीसाठी आम्ही वचनबद्ध आहोत, आज उदघाटन झालेल्या प्रकल्पांमुळे पायाभूत सुविधा बळकट होतील, संपर्कव्यवस्था सुधारेल आणि शहरातील लोकांच्या राहणीमान सुलभतेत वृद्धी होईल : पंतप्रधान

भारताची नारी शक्ती प्रत्येक क्षेत्रात एका नवीन ऊर्जेसह आगेकूच करत आहे : पंतप्रधान

दिल्लीचा विकास हा केवळ एका शहराचा विकास नाही तर तो संपूर्ण देशाच्या प्रतिमेशी निगडित आहे : पंतप्रधान

आज कार्यान्वित झालेले मेट्रो स्थानक राजधानीतील लाखो लोकांना मोठी सुविधा प्रदान करेल विशेषतः पूर्व आणि ईशान्य दिल्लीत राहणाऱ्यांचा दैनंदिन प्रवास पूर्वीपेक्षा अधिक सोयीचा होईल

केंद्र सरकारने पदपथ विक्रेत्यांना पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड्स वितरित करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे, आता त्यांच्या खिशात क्रेडिट कार्ड्स असतील, ज्यांचा उपयोग ते आपल्या गरजांनुसार करतील: पंतप्रधान

Posted On: 08 MAR 2026 3:18PM by PIB Mumbai


  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत सुमारे 33,500 कोटी रुपये किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, आज आपण सर्वजण दिल्लीच्या विकासाला एक नवीन गती देण्यासाठी एकत्र आलेलो आहोत."

 या प्रकल्पांचा आवाका मोठा असून मेट्रो नेटवर्कच्या विकासापासून ते हजारो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या आधुनिक निवासी संकुलांपर्यंत त्याची व्याप्ती आहे. दिल्लीतील लोकांनी एका नवीन आशेसह आणि नवीन संकल्पासह सुमारे वर्षभरापूर्वी डबल इंजिन सरकारची निवड केली, आणि आज त्याचे परिणाम या विकास कामांमधून ठळकपणे दिसून येत आहेत." असे पंतप्रधान म्हणाले. 

याच कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करताना, पंतप्रधानांनी महिलांच्या मोठ्या उपस्थितीचे  कौतुक केले आणि राज्य सरकारच्या यशस्वी नेतृत्वाखाली राजकारण, विज्ञान आणि क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रातील  भारताच्या सक्षमीकरणाच्या गाथेला महिलांचे सामर्थ्य आणि आत्मविश्वास कशी चालना देत आहेत, हे अधोरेखित केले. "राजकारण असो, प्रशासन असो, विज्ञान असो, क्रीडा असो किंवा समाजसेवा असो, भारताची नारी शक्ती प्रत्येक क्षेत्रात नवीन उर्जेने पुढे जात आहे," असे त्यांनी सांगितले.

दिल्ली ही भारतीय लोकशाहीची जागतिक ओळख असून ऊर्जेचे प्रतीक आहे यावर भर देत पंतप्रधान म्हणाले की नमो भारत ट्रेन आणि मेट्रो नेटवर्कचा 375 किलोमीटरपर्यंतचा ऐतिहासिक विस्तार यांसारख्या राजधानीतील पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीचे आधुनिकीकरण या गोष्टी जगासमोर भारताचा विश्वास दाखवण्यासाठी आवश्यक आहे. दिल्ली जितकी अधिक आधुनिक, सोयीस्कर आणि उत्तम प्रकारे जोडलेली बनेल, तितक्याच अधिक ठामपणे भारताचा आत्मविश्वास जगासमोर दिसून येईल. असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, दुहेरी इंजिनच्या शासन पद्धतीनुसार राष्ट्रीय राजधानीतील प्रत्येक वाहतूक सुविधा दररोज बससेवेवर अवलंबून असलेल्या लाखो नागरिकांना स्वच्छ, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी टप्प्याटप्प्याने उन्नत केली जात आहे. “केंद्र सरकारकडून उपलब्ध करून दिलेल्या 4000 पेक्षा अधिक इलेक्ट्रिक बस आधीच कार्यरत आहेत, तर गेल्या एका वर्षातच अतिरिक्त 1800 नव्या बस ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये दिल्लीतील वसाहती आणि परिसरांमध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत संपर्क वाढवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या शेकडो ‘देवी बसेस’चाही समावेश आहे,” असे मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी सांगितले की, राष्ट्रीय राजधानीसमोरील विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार सध्या अभियानाच्या स्वरुपात काम करत आहे. विशेषतः, पेरिफेरल एक्सप्रेसवेमुळे पूर्वी शहरात प्रवेश करावा लागणाऱ्या लाखो वाहनांचा मार्ग यशस्वीपणे वळवण्यात आल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “यमुना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी मोठा उपक्रम सुरू करण्यात आला असून तिच्या स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांवर काम सुरू झाले आहे,” असे मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी सांगितले की, राजधानीतील जीवनमान सातत्याने सुधारण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. त्यांनी विशेषतः मागील एका वर्षात अनेक आयुष्मान आरोग्य मंदिरे स्थापन करण्यात आल्याचा उल्लेख केला. दिल्लीमध्ये आयुष्मान योजनेची अंमलबजावणी झाल्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार आणि महत्त्वपूर्ण आरोग्य लाभ मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्षमतेच्या नव्या युगावर प्रकाश टाकताना मोदी म्हणाले, “सध्याची विकास प्रणाली तात्काळ कृती आणि ठोस परिणामांवर भर देते, ज्यामुळे प्रकल्प नियोजनाच्या टप्प्यातून थेट प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे जलद गतीने नेले जातात.”

कार्यक्रमापूर्वी सरोजिनी नगर येथे दिलेल्या भेटीचा उल्लेख करत पंतप्रधानांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेषत्वाने तयार करण्यात आलेल्या आधुनिक निवासी संकुलांचे उद्घाटन केल्याचे सांगितले. पंतप्रधान म्हणाले, “देशाचे संकल्प पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सोयीस्कर निवास व्यवस्था मिळणे आवश्यक आहे आणि हीच या नव्या पायाभूत प्रकल्पामागील प्रेरक शक्ती आहे.” आज हजारो सदनिका लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आल्याचे सांगत मोदी यांनी विश्वास व्यक्त केला की, ही आधुनिक घरे देशाच्या कर्मयोगींसाठी आनंद आणि नव्या आशांच्या युगाची सुरुवात ठरतील.

पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, ग्रामीण गावांपासून शहरी केंद्रांपर्यंत प्रत्येक घरापर्यंत कल्याणकारी योजना पोहोचत आहेत आणि त्याचा विशेष लाभ गरीब कुटुंबे, शेतकरी आणि कामगार वर्गाला होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी 'पीएम स्वनिधी योजने'च्या परिवर्तनकारी परिणामावर प्रकाश टाकताना सांगितले की, एकट्या दिल्लीतच, सुमारे 2 लाख फेरीवाल्यांना 350 कोटी रुपयांहून अधिक आर्थिक मदत मिळाली आहे, त्यामुळे ते उच्च व्याजदराच्या अनौपचारिक कर्जांपासून औपचारिक बँकिंग व्यवस्थेकडे वळले आहेत. आर्थिक समावेशनातील ऐतिहासिक बदल अधोरेखित करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, एकेकाळी केवळ श्रीमंतांसाठी राखीव असलेल्या क्रेडिट कार्ड सुविधा आता फेरीवाल्यांना त्यांचे लहान व्यवसाय सक्षम करण्यासाठी दिल्या जात आहेत. "स्वनिधी क्रेडिट कार्ड गरिबांसाठी स्वाभिमानाचे एक नवीन माध्यम बनत आहे. जे लोक एकेकाळी दुर्लक्षित होते त्यांना आता आधुनिक आर्थिक साधनांनी सक्षम बनवले जात आहे," हे मोदी यांनी अधोरेखित केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे स्मरण करताना, पंतप्रधानांनी 3 कोटी "लखपती दीदी" निर्माण करण्याचा राष्ट्रीय संकल्प पूर्ण करण्याच्या ऐतिहासिक कामगिरीचे वर्णन केले. बचत गटाच्या माध्यमातून आता 10 कोटींहून अधिक महिला सक्षम झाल्या आहेत यावर त्यांनी प्रकाश टाकला. भांडवल, बँकिंग प्रणाली आणि विशेष प्रशिक्षण उपलब्ध करून देऊन, सरकारने या महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यास सक्षम केले असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. “आपल्या बहिणींच्या यशामुळे आणखी 3 कोटी लखपती दीदी निर्माण करण्याचा एक नवीन संकल्प निर्माण झाला आहे आणि आपल्या नारी शक्तीच्या आशीर्वादाने हे ध्येय निश्चित साध्य होईल,” असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

पश्चिम बंगालमधील अलिकडच्या घटनांबद्दल तीव्र चिंता व्यक्त करताना, पंतप्रधानांनी पारंपरिक संथाल आदिवासी उत्सवाच्या भेटीदरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल राज्य सरकारने दाखवलेल्या कथित अनादराबद्दल नाराजी व्यक्त केली. अहंकारी लोकांच्या पतनाबद्दल प्राचीन ज्ञानाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, अहंकाराच्या अशा राजकारणाला राज्यातील नागरिक शेवटी नाकारतील. “राष्ट्रपतींच्या कार्यक्रमावर बहिष्कार आणि गैरव्यवस्थापन हे संविधानाचा आणि या राष्ट्राच्या प्रत्येक कन्येचा अपमान आहे. सत्तेच्या या अहंकाराला जनता कधीही माफ करणार नाही,” असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी दिल्लीचे वर्णन एक ऐतिहासिक शहर म्हणून केले. हे शहर सध्या "नव्या भारताच्या" आत्मविश्वासाने प्रेरित परिवर्तनकारी युगाचे साक्षीदार आहे, जे विकसित भविष्याचा पाया म्हणून काम करेल, असे ते म्हणाले. राष्ट्रीय संकल्पांच्या पूर्ततेसाठी सर्व नागरिकांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. नव्याने सुरू झालेल्या प्रकल्पांसाठी जनतेचे अभिनंदन करताना, पंतप्रधानांनी एकात्मता आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना व्यक्त केली. "नवीन भारताचा आत्मविश्वास आपल्याला विकसित भविष्याकडे घेऊन जाईल आणि मला विश्वास आहे की दिल्लीतील प्रत्येक कुटुंबाला एक चांगले आणि अधिक समृद्ध जीवन अनुभवायला मिळेल," असे पंतप्रधान म्हणाले.

***

शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/नितीन गायकवाड/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2236613) अभ्यागत कक्ष : 22