पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील अजमेर येथे राष्ट्रव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा प्रारंभ तसेच 17,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन


आमचे सरकार सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध आहे: पंतप्रधान

आज, मला अजमेर येथून राष्ट्रव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा प्रारंभ तसेच अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी आणि युवकांना नियुक्ती पत्रे वितरित करण्याचे भाग्य लाभले

अजमेर येथून एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू झाली आहे, ही मोहीम देशाच्या नारी शक्तीला सक्षम बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे: पंतप्रधान

दुहेरी इंजिन असलेले सरकार राजस्थानचा वारसा आणि विकास दोन्ही बरोबर घेऊन पुढे जात आहे: पंतप्रधान

आमच्या सरकारने नद्या जोडण्याचे जे अभियान सुरु केले आहे त्याचा राजस्थानला मोठा फायदा होईल: पंतप्रधान

राजस्थानमध्ये सूर्यप्रकाशाची कमतरता नाही, आता हाच सूर्यप्रकाश सामान्य माणसासाठी बचत आणि उत्पन्नाचा स्रोत बनत आहे: पंतप्रधान

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे, या योजनेत राजस्थानचे भाग्य बदलण्याची ताकद आहे: पंतप्रधान

Posted On: 28 FEB 2026 3:41PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 फेब्रुवारी 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अजमेर येथे एका सार्वजनिक सभेला संबोधित केले. राजस्थानच्या विकास प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पंतप्रधानांनी या प्रदेशाच्या सांस्कृतिक आणि शौर्यपूर्ण वारशाबद्दल गौरवोद्गार काढले, ज्यामध्ये सुरसुराचे तेजाजी धाम आणि मेजर दलपत सिंग ज्यांनी हैफा मुक्त करण्यात बजावलेल्या महत्वाच्या भूमिकेचे अजूनही इस्रायलमध्ये आदराणे स्मरण केले जाते, त्यांच्या शौर्याचा समावेश आहे.

राजस्थानमधील "डबल इंजिन सरकारने" जलद प्रगतीची दोन वर्षे पूर्ण केली याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. "विकासाची जी आश्वासने घेऊन सरकार जनतेच्या सेवेसाठी आले होते ती वेगाने पूर्ण करत आहे. आणि आज विकासाच्या या मोहिमेला आणखी गती देण्याचा दिवस आहे," असे मोदी यांनी अधोरेखित केले . पंतप्रधानांनी नमूद केले की आजच्या कार्यक्रमात रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण यासह सुमारे 17,000 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. हे प्रकल्प राजस्थानातील लोकांच्या सुविधेत वाढ करतील तसेच तरुणांसाठी रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण करतील.

मोदी यांनी आज 21,000 पेक्षा जास्त नव्या भरती झालेल्या युवकांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आल्याने राज्यातील युवकांसाठी नव्या युगाची सुरुवात झाल्याचे नमूद केले. तसेच पंतप्रधानांनी अजमेर येथून देशव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. भारताच्या ‘नारी शक्ती’ला सबळ करण्यासाठी आणि माता व मुलींच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले. “आपल्याला माहीत आहे की कुटुंबातील आई आजारी पडली तर संपूर्ण घर विस्कळीत होते. आई निरोगी असेल तर कुटुंब कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकते. या भावनेतून सरकारने महिलांना आधार देण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत,” असे मोदी यांनी अधोरेखित केले.

महिलांच्या आरोग्य आणि सन्मानाबाबत सरकारची संवेदनशील भूमिका स्पष्ट करताना पंतप्रधानांनी शौचालय उभारणी, सॅनिटरी पॅड उपलब्धता आणि उज्ज्वला गॅस योजना यांसारख्या ‘मिशन मोड’ उपक्रमांचा उल्लेख केला. तसेच सुरक्षित मातृत्व योजनेअंतर्गत गर्भावस्थेदरम्यान पौष्टिक आहारासाठी महिलांच्या खात्यात 5,000 रुपये जमा केले जात असल्याचे सांगितले. दुर्लक्षाच्या संस्कृतीऐवजी संवेदनशीलतेची संस्कृती निर्माण करण्याच्या दिशेने हे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.

पायाभूत सुविधांबाबत बोलताना पंतप्रधानांनी रस्ते, रेल्वे आणि हवाई संपर्काद्वारे आधुनिक जोडणीमुळे राजस्थानचे भवितव्य बदलत असल्याचे सांगितले. अजमेर-पुष्कर सारख्या पर्यटनस्थळांना सुधारित वाहतूक सुविधेमुळे चालना मिळत असून स्थानिक व्यावसायिक, कारागीर आणि टॅक्सीचालकांना थेट लाभ होत असल्याचे त्यांनी नमूद केले. “दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरच्या परिसरात उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांमुळे राजस्थान जागतिक गुंतवणुकीसाठी ‘संधींची भूमी’ बनत आहे,” असे मोदी यांनी सांगितले.

भारताच्या वाढत्या जागतिक प्रतिष्ठेचा आढावा घेत मोदी यांनी दिल्लीत नुकत्याच झालेल्या जगातील सर्वात मोठ्या एआय शिखर परिषदेबद्दल आणि त्यांच्या इस्रायल भेटीबद्दल सांगितले. या परिषदेत भारताच्या प्रगती आणि शौर्याचे कौतुक करण्यात आले, असे पंतप्रधान म्हणाले. “जगातील अनेक देशांचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती त्यात सहभागी झाले होते; मोठ्या कंपन्यांचे प्रमुख आले होते; सर्वांनी खुल्या मनाने भारताचे कौतुक केले”, असे मोदी म्हणाले.

“भारतीय सैन्याने प्रत्येक आघाडीवर दहशतवाद्यांना आणि देशाच्या शत्रूंना मोठा धक्का दिला आहे. आपल्या सैन्याने प्रत्येक मोहिमेत, प्रत्येक आघाडीवर विजय मिळवला आहे. सर्जिकल स्ट्राईकपासून ते ऑपरेशन सिंदूरपर्यंत, त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे”, असे भारताच्या सशस्त्र दलांच्या यशावर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले. 

शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन तक्रारींना संबोधित करताना पंतप्रधानांनी नमूद केले की सध्याचे सरकार ईआरसीपी प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी वचनबद्ध आहे. नद्यांना जोडण्याच्या मोहिमेत सुधारित 'पार्वती-कालिसिंध-चंबळ' आणि 'यमुना-राजस्थान' जोड प्रकल्पांचा समावेश आहे, त्यामुळे झालावाड, बारान, कोटा आणि बुंदी येथील शेतकऱ्यांना निश्चित आणि महत्त्वपूर्ण फायदे मिळतील, यावर पंतप्रधानांनी भर दिला. 

पंतप्रधानांनी राजस्थानमध्ये सूर्यप्रकाशापासून समृद्धी मिळविण्याची क्षमता अधोरेखित केली. पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत, सरकार छतावरील सौर पॅनेल बसवण्यासाठी 78,000 रूपयांची मदत देते, असे त्यांनी सांगितले. राजस्थानमध्ये 1.25 लाखांपेक्षा जास्त कुटुंबे या योजनेत आधीच सामील झाली असल्याने, अनेक कुटुंबांचे वीज बिल जवळजवळ शून्यावर येत आहे, असे ते म्हणाले. राज्यातील प्रत्येक कुटुंबाला समृद्ध जीवन मिळेल अशा "विकसित राजस्थानपासून विकसित भारत" या मंत्राचा पुनरुच्चार करून पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला. 

 

 

 

 

* * *

माधुरी पांगे/सुषमा काणे/गजेंद्र देवडा/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2233913) अभ्यागत कक्ष : 24