श्रम आणि रोजगार मंत्रालय
कामगारांची भरभराट होते, तेव्हा देशाचीही भरभराट होते: केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांचे प्रतिपादन
केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी ओदिशातील पुरी येथे भारतीय मजदूर संघाच्या 21 व्या अखिल भारतीय त्रैवार्षिक परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित केले
Posted On:
06 FEB 2026 3:30PM by PIB Mumbai
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज ओदिशातील पुरी येथे भारतीय मजदूर संघाच्या (बीएमएस) अखिल भारतीय त्रैवार्षिक परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित केले. कामगारांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सुरक्षा हे सरकारच्या राष्ट्रीय विकासाच्या दृष्टीकोनाच्या केंद्रस्थानी असल्याचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.
"मला श्रम शक्ती आणि युवा शक्तीसाठी काम करण्याचे भाग्य लाभले आहे. या दोन शक्ती भारताच्या प्रगतीचा पाया आहेत आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यात निर्णायक भूमिका बजावतील," असे डॉ. मांडवीय म्हणाले.

ते म्हणाले की, बीएमएस ही केवळ भारतातील सर्वात मोठी कामगार संघटना नसून जगातील सर्वात मोठ्या संघटनांपैकी एक आहे आणि कामगारांच्या कल्याणासाठी काम करण्यात, देशातील कामगारांना न्याय मिळवून देण्यात आणि त्यांना राष्ट्रीय विकास आणि आर्थिक विकासात भागीदार म्हणून सक्षम बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
आर्थिक विकासासाठी कामगार आणि उद्योग दोघेही समान महत्त्वाचे आहेत यावर भर देत मंत्री म्हणाले की, मजबूत आणि लवचिक अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी दोघांमधील सुसंवाद आणि सहकार्य आवश्यक आहे. सरकारने हे संतुलन मजबूत करण्यासाठी, कामगारांसाठी कल्याणकारी तरतुदी आणि सामाजिक सुरक्षा वाढवण्यासाठी कामगार संहिता लागू केल्या आहेत, तसेच उद्योगांसाठी अनुपालन सुलभ केले आहे.

"कामगार संहितांचे स्वागत केल्याबद्दल, कामगारांमध्ये जागरूकता पसरवल्याबद्दल आणि चुकीच्या माहितीला विरोध केल्याबद्दल मी बीएमएसचे अभिनंदन करतो, तसेच इतर 15 केंद्रीय कामगार संघटनांचेही अभिनंदन करतो. हे जबाबदार आणि रचनात्मक नेतृत्व दर्शवते, कामगारांच्या हिताला संघटनात्मक विचारांपेक्षा जास्त महत्त्व देते," ते म्हणाले.
डॉ. मांडवीया म्हणाले की, बीएमएसने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) च्या वेतनात वाढ, किमान वेतनाबाबतचे निर्णय आणि ईपीएस-95 अंतर्गत किमान पेन्शनमध्ये वाढ याबाबत निवेदने सादर केली आहेत. या बाबींची काळजीपूर्वक तपासणी केली जाईल आणि कामगारांच्या हितासाठी येत्या काही दिवसांत निर्णय घेतले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

देशाची प्रगती ही कामगार कल्याणाचा अविभाज्य आहे. जेव्हा कामगारांची भरभराट होते, तेव्हा देशाची भरभराट होते, असे ते म्हणाले.
उद्घाटन सत्राला बीएमएसचे राष्ट्रीय अध्यक्ष हिरन्मय पंड्या, बीएमएसचे राष्ट्रीय सरचिटणीस रवींद्र हिमटे, रशिया एफएनपीआरचे अध्यक्ष सर्गेई चेरनोगेव, आरएसएसचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भागैया, आणि नवी दिल्लीतील आयएलओच्या दक्षिण आशिया आणि कंट्री ऑफिस कामगार तज्ञ युकी ओत्सुजी, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

***
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2224545)
अभ्यागत कक्ष : 11