राज्यसभा सचिवालय
86 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेचा उत्तर प्रदेशातील विधान मंडप येथे समारोप
प्रविष्टि तिथि:
21 JAN 2026 8:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जानेवारी 2026
86 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेचा आज उत्तर प्रदेश विधान मंडप येथे समारोप झाला. समारोप सत्राला संबोधित करताना, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी परिषदेदरम्यान झालेल्या विधायक चर्चेबद्दल समाधान व्यक्त केले आणि देशभरातील पीठासीन अधिकाऱ्यांमधील विचारांच्या सामूहिक देवाणघेवाणीमुळे अतिशय समृद्ध चर्चा झाल्याचे अधोरेखित केले.
हरिवंश यांनी उत्तर प्रदेशच्या प्रभावी आर्थिक प्रवासाचा उल्लेख केला, ज्यामध्ये सकल राज्य देशांतर्गत उत्पादन, दरडोई उत्पन्न यात वाढ, एकूण सरकारी खर्चात वाढ , वाढलेली निर्यात आणि जलद पायाभूत सुविधांचा विकास यांचा समावेश होता.एकेकाळी नीती आयोगाने "समस्याग्रस्त राज्य" असे वर्णन केलेला उत्तर प्रदेश आता आघाडीचे राज्य म्हणून उदयाला आले आहे, महसूल अधिशेषाचा दर्जा प्राप्त करत आहे आणि आपल्या सुधारणा-केंद्रित प्रशासनासाठी ओळख मिळवत आहे असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी मांडलेल्या विकसित भारत @2047 चे राष्ट्रीय ध्येय साध्य करण्यासाठी, राज्यांनी स्पष्ट आणि दूरदर्शी विकास आराखडा तयार करणे अत्यावश्यक आहे आणि उत्तर प्रदेश या दिशेने महत्त्वपूर्ण योगदान देत आहे असे ते म्हणाले.
कायदेमंडळे आणि सरकारे यांच्या सामायिक जबाबदारीवर भर देत, हरिवंश म्हणाले की सर्व हितधारकांचे सामायिक उद्दिष्ट माहितीपूर्ण चर्चा, सुदृढ धोरणनिर्मिती आणि दूरदृष्टी याद्वारे राष्ट्रीय विकासात योगदान देणे हे आहे.
समारोप सत्राचा समारोप करताना, हरिवंश यांनी विश्वास व्यक्त केला की 86 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेमधील चर्चा आणि विचार देशभरातील कायदेविषयक संस्थांना बळकटी देतील आणि भारताचा लोकशाही पाया आणखी मजबूत करतील.

GT22.jpeg)

शैलेश पाटील/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2217065)
आगंतुक पटल : 7