ग्रामीण विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर


अहिल्यानगर आणि नाशिक मध्ये विविध कार्यक्रमात होणार सहभागी

प्रविष्टि तिथि: 31 DEC 2025 9:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 डिसेंबर 2025

 

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान 31 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 या कालावधीत महाराष्ट्र दौऱ्यावर असतील. अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांचा समावेश असलेला हा तीन दिवसीय हा दौरा शेतकरी, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि तरुणांसाठी नवीन संधी यांना समर्पित आहे. केंद्रीय मंत्री विविध कार्यक्रमांद्वारे, सर्वसमावेशक समृद्धीला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या शेतकरी आणि ग्रामीण-स्नेही धोरणांची तसेच उपक्रमांची माहिती देतील.

कार्यक्रमानुसार, 31 डिसेंबर रोजी शिवराज सिंह चौहान अहिल्यानगर (अहमदनगर) येथील कार्यक्रमांना उपस्थित राहतील. ते बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट देतील आणि शेतकरी गटांशी संवाद साधतील. चर्चेत कृषी आणि ग्रामीण विकासाच्या समस्या, स्थानिक आव्हाने आणि या प्रदेशातील नवीन संधींवर लक्ष केंद्रित केले जाईल.

या भेटीदरम्यान, केंद्रीय मंत्री पीक लागवड, सिंचन, जलसंधारण, पीक विमा, सुधारित बाजारपेठ उपलब्धता आणि सरकारी योजनांच्या अंमलबजावणीशी संबंधित समस्यांवर चर्चा करण्यासाठी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधतील. चौहान नैसर्गिक शेती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पीक विविधीकरण, मूल्यवर्धन आणि शेतकरी उत्पादक संघटनांद्वारे सामूहिक शेतीला बळकटी देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याबाबतची आपली मते देखील मांडतील.

केंद्रीय मंत्री 1 जानेवारी 2026 रोजी, नवीन वर्षाची सुरुवात वृक्षारोपण मोहिमेने करतील, त्यानंतर सकाळी 10 ते 11 या वेळेत ते त्यांच्या दोन्ही मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करतील. आपल्या भाषणात, ते कृषी आणि ग्रामीण विकासातील राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्याबाबतची वचनबद्धता दृढ करण्याची शपथ देतील. दिवसाच्या उत्तरार्धात, दुपारी 2 वाजता ते शिर्डीजवळील लोणी बुद्रुक गावात ग्रामसभेत सहभागी होतील. यावेळी ते ग्रामस्थ, कामगार आणि मजुरांशी संवाद साधतील, त्यांच्या समस्या ऐकून घेतील आणि ग्रामीण भागाच्या कल्याणासाठी सरकारच्या भविष्यातील योजनांची माहिती देतील.

2 जानेवारी रोजी, केंद्रीय मंत्र्यांचा मुख्य कार्यक्रम नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रात होणार आहे. दुपारी 12:15 वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात कुलगुरू आणि विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सदिच्छा भेटीने होईल, त्यानंतर औपचारिक उद्घाटन सत्र होईल. चौहान यावेळी बीज भाषण करतील, ज्यात ते संशोधन, नवोपक्रम आणि कौशल्य विकासाद्वारे कृषी परिवर्तन आणि युवकांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारच्या उपक्रमांवर प्रकाश टाकतील.

या कार्यक्रमात एक संवादात्मक प्रश्नोत्तर सत्राचाही समावेश असेल. या आयोजनामुळे विद्यार्थी, संशोधक आणि तरुण व्यावसायिकांना कृषी, ग्रामीण उपजीविका तसेच शाश्वत विकासातील समकालीन मुद्द्यांवर केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळेल. ग्रामीण समुदायांना आत्मनिर्भर, समृद्ध आणि तंत्रज्ञान-आधारित ग्रामीण भारताच्या निर्मितीसाठी सरकारच्या सुरू असलेल्या प्रयत्नांशी जोडणे आणि त्यांना प्रेरणा देणे हा चौहान यांच्या भेटीचा उद्देश आहे.

 

* * *

निलिमा चितळे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2210319) आगंतुक पटल : 5
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati