नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयसीएओ परिषदेवर भक्कम पाठींब्यासह भारताची फेरनिवड

Posted On: 30 SEP 2025 4:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 सप्‍टेंबर 2025

 

संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था असलेल्या आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (आयसीएओ) परिषदेच्या भाग II वर भारताची पुन्हा निवड झाली आहे. भाग II मध्ये आंतरराष्ट्रीय नागरी हवाई नौवहनासाठी  सुविधांच्या तरतूदीमध्ये सर्वात मोठे योगदान देणाऱ्या देशांचा  समावेश आहे. 27 सप्टेंबर 2025 रोजी मॉन्ट्रियल येथे आयोजित आयसीएओच्या 42 व्या अधिवेशनादरम्यान ही निवडणूक झाली.

2022 च्या निवडणुकीच्या तुलनेत भारताला जास्त मते मिळाली. सदस्य देशांचा भारताच्या नेतृत्वावर आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतुकीप्रति  वचनबद्धतेवर वाढता विश्वास यातून दिसून येतो.

यापूर्वी, 2 सप्टेंबर 2025 रोजी, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने 42 व्या आयसीएओ अधिवेशनापूर्वी नवी दिल्लीत राजदूत आणि उच्चायुक्तांसाठी स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी, नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी वर्ष 2025 ते 2028 या कालावधीसाठी भारताच्या पुन्हा उमेदवारीसाठी सदस्य राष्ट्रांचा पाठिंबा मागितला होता.

या प्रयत्नांना पाठिंबा देत, परराष्ट्र मंत्रालयाने इतर सदस्य राष्ट्रांशी नियमित संपर्क साधून,आयसीएओच्या उद्दिष्टांप्रती भारताच्या दृढ वचनबद्धतेला दुजोरा दिला. परराष्ट्र मंत्रालयाच्या राजनैतिक प्रयत्नांमुळे आयसीएओ परिषद निवडणुकीसाठी भारताच्या मोहिमेला बळकटी मिळाली. आयसीएओ मुख्यालयातील भारताच्या प्रतिनिधीने देखील भारताच्या पुनर्निवडीसाठी सक्रियपणे पाठिंबा मिळवला.

मॉन्ट्रियलच्या भेटीदरम्यान, केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांनी इतर सदस्य राष्ट्रांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या आणि जागतिक विमान वाहतूक उद्योगातील हितधारकांशी संवाद साधला. जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या विमान वाहतूक बाजारपेठांपैकी एक म्हणून, भारताने विमान घटक उत्पादन, देखभाल, दुरुस्ती, परिचालन (एमआरओ) आणि कौशल्य विकास यासारख्या क्षेत्रात जागतिक कंपन्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.

1944 पासून आयसीएओचा संस्थापक सदस्य असलेल्या भारताने 81 वर्षांपासून परिषदेवर आपली अखंड उपस्थिती राखली आहे. सुरक्षित, संरक्षित, शाश्वत, सामंजस्यपूर्ण आणि लिंग-समावेशक आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी आयसीएओच्या ध्येयाला पुढे नेण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.  धोरण विकास, नियामक चौकटी आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक मानकांमध्ये भारत सक्रियपणे सहभागी आहे.

दर तीन वर्षांनी आयोजित होणारे आयसीएओ अधिवेशन  ही संस्थेची सार्वभौम संस्था आहे, ज्यामध्ये शिकागो करारावर स्वाक्षरी करणाऱ्या सर्व 193 देशांचा समावेश आहे. अधिवेशनादरम्यान 193 सदस्य राष्ट्रांनी निवडलेली 36 सदस्यीय आयसीएओ परिषद तीन वर्षांच्या कालावधीसाठी प्रशासकीय संस्था म्हणून काम करते.

2025–2028 या कालावधीसाठी, भारत पुढील गोष्टींबद्दल आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो:

1. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरक्षा, संरक्षण आणि स्थिरता  मजबूत करणे

2. हवाई कनेक्टिव्हिटीमध्ये समान वाढीला प्रोत्साहन देणे

3. प्रगत तंत्रज्ञान आणि नवोन्मेष

4. आयसीएओच्या, 'कोणताही देश मागे राहणार नाही 'या उपक्रमाला समर्थन

 

* * *

निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2173158) Visitor Counter : 12