गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे पावसाळी महा स्वच्छता अभियान


स्वच्छतेचा अंगीकार करा, आजारांना पळवून लावा: स्वच्छ भारत अभियान-शहरी द्वारे पावसाळ्यातील प्रतिबंधात्मक नालेसफाई आणि कचऱ्याचे ढीग हटवण्याचे जोरदार प्रयत्न

Posted On: 26 JUN 2025 3:39PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली 26 जून 2025

पावसाळ्याची सुरवात झाल्यावर स्वच्छता आणि साफसफाईविषयक आव्हाने वाढतात, आणि त्यामुळे जलजन्य तसेच कीटक-जन्य आजारांचा धोका वाढतो. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने  देखील स्वच्छ भारत अभियान-शहरी (एसबीएम-यू)या अत्यंत महत्वाच्या मोहिमेअंतर्गत 1 जुलै ते 31 जुलै, 2025 दरम्यान राबवण्यात येणाऱ्या ‘स्वच्छतेचा अंगीकार करा, आजारांना पळवून लावा’ (एसएबीबी) या अभियानाच्या माध्यमातून आरोग्य-केंद्रित शहरी साफसफाईवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ या सदर अभियानाच्या घोषवाक्याला अनुसरून, गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी देखील या अभियानच्या अंमलबजावणीसाठी दुपदरी दृष्टीकोन स्वीकारण्यात आला आहे एक म्हणजे स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने नागरिक तसेच शहरी स्थानिक संस्थामध्ये (युएलबीज)जागरुकता निर्माण करणे आणि दुसरे म्हणजे आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक स्वच्छता तसेच जनजागृतीविषयक उपाययोजना करणे.  

तुंबलेले नाले, कचऱ्याचे ढीग साठलेली ठिकाणे, पाणी साचणे यांचा बंदोबस्त करून सार्वजनिक आरोग्याला असलेला धोका कमी करणे आणि जनतेला सार्वत्रिक स्वच्छता तसेच निर्धोक पेयजल उपलब्ध असेल याची सुनिश्चिती करून घेणे हे एसएबीबी अभियान 2025 चे उद्दिष्ट आहे. स्वच्छता राखणे तसेच नियमित हात धुणे, विशेषतः झोपडपट्ट्या, शाळा तसेच वर्दळीच्या ठिकाणी, बारकाईने लक्ष ठेवून तसेच जनजागृती अभियान राबवून लक्ष्य साध्य करण्याला या अभियानाद्वारे प्रोत्साहन देण्यात येते. समुदाय आणि सार्वजनिक शौचालयांसाठी स्वच्छता मोहिमा राबवण्यासह वर्तणूकविषयक इशारे परिसर स्वच्छ आणि निरोगी राखण्यास प्रोत्साहित करतात. शहरी स्थानिक संस्थांनी  नालेसफाई करणे तसेच डेंग्यू, हिवताप आणि चिकनगुनिया सारख्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी जलसाठ्यांमध्ये कचरा टाकण्यास प्रतिबंध करणे ही कार्ये केलीच पाहिजेत. महिनाभर चालणारे हे अभियान परिणामकारक कचरा व्यवस्थापनातून विशेषतः जलसाठे, प्रतिबंधात्मक नालेसफाई तसेच कचऱ्याचे ढीग जमणाऱ्या ठिकाणांची स्वच्छता करून शहरे  अधिक स्वच्छ राखण्यावर लक्ष केंद्रित करते.

सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता राखण्यात नागरिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. जलजन्य आणि कीटकजन्य आजार रोखण्यासाठी एसएबीबीच्या 6 मंत्रांचा स्वीकार करणे अत्यावश्यक आहे: (1)स्वच्छ हात (2)स्वच्छ घरे (3) स्वच्छ परिसर (4) स्वच्छ शौचालये (5) स्वच्छ गटारे-नाले आणि जलसाठे (6) स्वच्छ सार्वजनिक ठिकाणे

घरांमध्ये तसेच बाहेरील परिसरात पाणी साचू न देणे महत्त्वाचे आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे टाळावे तसेच स्वतंत्र कचराकुंड्यांचा वापर करावा. शहरी स्थानिक संस्थांतर्फे वेळेवर कारवाई होण्यासाठी, कोणत्याही स्वच्छताविषयक समस्येची माहिती स्वच्छता अॅपच्या माध्यमातून कळवावी. शहरी स्थानिक संस्थांनी  विविध विभागांमधील समन्वयासह लक्ष्यित स्वच्छता कारवाईसाठी अधिक धोका असलेली ठिकाणे निश्चित करावी. या संस्थांनी नियमित कचरा संकलन, कचऱ्याचे ढीग साचणारी ठिकाणे कमी करणे तसेच सार्वजनिक शौचालयांची देखरेख करणे, विशेषतः संवेदनशील भागांमध्ये स्वच्छता राखणे सुनिश्चित केले पाहिजे. 

सफाईमित्रांसाठी स्वच्छ पाण्याची उपलब्धता आणि स्वच्छतेच्या सोयी यावर विशेष लक्ष केंद्रित केले पाहिजे. स्वच्छतेशी संबंधित प्रत्येक कार्य शहरी स्थानिक संस्थांतर्फे स्वच्छतम पोर्टलवर (https://admin.sbmurban.org/) नोंदवण्यात आले पाहिजे.

सदर अभियानादरम्यान, 100 स्मार्ट शहरांमध्ये  खाऊगल्ल्या, बाजारपेठा तसेच वारसा स्थळांसारख्या सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेवर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने एकात्मिक आदेश आणि नवोन्मेषासाठी नियंत्रण केंद्रांच्या वापरासह विशेष उद्देश वाहने (एसपीव्हीज) सक्रीय करण्यात येतील.

***

S.Kakade/S.Chitnis/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2140011)