आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी एफएसएसएआयच्या जागतिक अन्न सुरक्षा दिन 2025 कार्यक्रमात ‘सुरक्षित आणि पोषक आहाराने लठ्ठपणा रोखा’ या विषयावर केले बीजभाषण
विकसित भारतासाठी, निरोगी भारत आवश्यक आहे आणि योग्य अन्न, आरोग्यदायी आहार आणि जीवनशैलीद्वारे हे सुनिश्चित करता येऊ शकते: नड्डा
Posted On:
07 JUN 2025 5:43PM by PIB Mumbai
जागतिक अन्न सुरक्षा दिन 2025 निमित्त, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज राष्ट्रीय मानसिक आरोग्य व मेंदू विज्ञान संस्था ( एनआयएमएचएएनएस ), बेंगळुरू येथे ‘सुरक्षित आणि पोषक आहाराने लठ्ठपणा रोखा’ या विशेष कार्यक्रमात बीज भाषण दिले. भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणातर्फे (एफएसएसएआय) आयोजित या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश लठ्ठपणा सारख्या असंक्रमक रोगांपासून प्रतिबंध करण्यासाठी अन्न सुरक्षा व पोषणाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करणे हा होता. या उपक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पारंपरिक आणि पौष्टिक आहाराच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक आरोग्य वाढवण्याच्या आवाहनाला प्रतिबिंबित करण्यात आले.

लठ्ठपणा प्रतिबंध व तंदुरुस्तीला प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या मुद्द्यावर नड्डा यांनी जोर दिला. वाढत्या लठ्ठपणाच्या आणि असंक्रमक रोगांच्या वाढत्या प्रमाणाचा त्वरित सामना करण्याची गरज अधोरेखित करत, श्री. नड्डा म्हणाले, “लठ्ठपणा थांबवण्यासाठी जनजागृती मोहीम ही लोकांना अयोग्य आहाराचा धोका समजावून सांगण्यासाठी आणि त्यांना संतुलित, पोषक अन्न स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी योग्यवेळी उचललेले पाउल आहे. ” “विकसित भारतासाठी, निरोगी भारत आवश्यक आहे आणि ते योग्य प्रकारच्या अन्न, आरोग्यदायी अन्नाच्या सवयी आणि निरोगी जीवनशैलीद्वारे सुनिश्चित करता येते”, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी यावेळी रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकणाऱ्या सुरक्षित, निरोगी आणि पोषक अन्नाच्या महत्त्वाबरोबरच संतुलित आहाराच्या फायद्यांवरही भर दिला.
लठ्ठपणाच्या वाढत्या चिंताजनक प्रवृत्तीचा उल्लेख करत, आयसीएमआर- भारतातील मधूमेह (आयएनडीआयएबी) अभ्यासाचा हवाला देत नड्डा म्हणाले, “2008 ते 2020 दरम्यान, शहरी भारतात लठ्ठपणा 39.6% ने वाढला आहे, तर ग्रामीण भागात 23.1% ने यामध्ये वाढ झाली आहे.” त्यांनी आणखी एका अभ्यासाचा उल्लेख केला, ज्यामधील अंदाजानुसार 2050 पर्यंत देशाच्या 1/3 लोकसंख्येला लठ्ठपणाने ग्रासलेले असेल.

त्यांनी पुढे सांगितले, “योग्य आहार हा एक हक्क आहे, ज्याचा प्रत्येकाने वापर करावा. योग्य आहार आणि याबाबत जनजागृती करणे, ही सरकार, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि व्यक्तींची सामूहिक जबाबदारी आहे.”
नड्डा यांनी सर्व संबंधितांना पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन तेलाचे सेवन 10% ने कमी करण्याचे आणि योग्य आहार सवयींबाबत जागरूकता वाढवून मीठाचे सेवन कमी करण्याचे आवाहन केले.

पारंपरिक अन्नाच्या महत्त्वावर भर देत, नड्डा यांनी सर्वांना “भरड धान्यांसह पारंपरिक अन्न खाण्यासाठी प्रोत्साहित केले आणि आरोग्यासाठी त्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे आवाहन केले.”
कार्यक्रमादरम्यान ‘योग्य आहार शाळा’ -‘इट राईट स्कूल’ उपक्रमांतर्गत एक महत्त्वाचा स्रोत असलेले ‘योग्य आहार कृती पुस्तक – शाळेत योग्य आहारासाठी मार्गदर्शक’ - इट राईट बूक - यूवर गाईड टू इट राईट अॅट स्कूल’ जारी करण्यात आले.
***
N.Chitale/N.Gaikwad/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2134929)