संरक्षण मंत्रालय
देशातील युवा वर्गाने केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे देशभरात उभारल्या जात असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करू शकणाऱ्या पायाभूत सोयी सुविधांचा पूरेपूर उपयोग करून घेत आघाडीच्या तंत्रज्ञानात उत्कृष्टता साध्य करायला हवी असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे हैदराबाद इथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमीत्त झालेल्या कार्यक्रमात आवाहन
जर का भारताच्या हाती विस्तारत्या तंत्रज्ञानामुळे निर्माण होत असलेल्या गंभीर आव्हानांवर उपाययोजना असतील तर भारत प्रतिकूल परिस्थितीतही मजबूत आणि सुरक्षित राहू शकतो - राजनाथ सिंह
2047 पर्यंत विकसित भारताच्या संकल्पाची पूर्तता करण्यासाठी देशातल्या युवा वर्गाच्या क्षमतांचा उपयोग करून घेण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील - राजनाथ सिंह
प्रविष्टि तिथि:
28 FEB 2025 7:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2025
देशाच्या युवा वर्गाने वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करायला हवा आणि आघाडीच्या तंत्रज्ञानात उत्कृष्टता साध्य करायला हवी असे आवाहन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. यासाठी युवा वर्गाने केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे देशभरात उभारल्या जात असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करू शकणाऱ्या पायाभूत सोयी सुविधांचा पूरेपूर उपयोग करून घ्यायला हवा असेही राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज 28 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने हैदराबाद मध्ये तेलंगणा इथे आयोजित दोन दिवसीय विज्ञान वैभव या विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयक महोत्सवाच्या उद्घाटन झाले. त्यांनंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
आधुनिक काळात युद्धाचे स्वरुप वेगाने हार्डवेअरवरून सॉफ्टवेअर केंद्री होऊ लागले असल्याचे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञानात सातत्याने नवे नवे शोध लागत आहेत, त्यामुळे आता भारताला कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कंम्प्युटींग, मशीन लर्निंग, आणि क्लीन-टेक यांसारख्या परिवर्तनकारी तंत्रज्ञानात आघाडी घ्यावी लागेल ही गरजही राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केली. जर का भारताच्या हाती विस्तारत्या तंत्रज्ञानामुळे निर्माण होत असलेल्या गंभीर आव्हानांवर उपाययोजना असतील तर भारत प्रतिकूल परिस्थितीतही मजबूत आणि सुरक्षित राहू शकतो असे ते म्हणाले. त्याअुषंगानेच आपल्या युवा वर्गाने वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात केला पाहिजे आणि कायमच चौकटींच्या पलिकडे विचार करण्याची प्रथा घडवली पाहिजे असे संरक्षणमंत्री म्हणाले. यावेळी राजनाथ सिंह यांनी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या एका विधानाचेही स्मरण करून दिले. विज्ञान हे मानवजातीसाठी सुंदर वरदान आहे; आपण त्याचा विपर्यास न करता, समाजाच्या कल्याणासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे असे आवाहन कलाम यांनी देशवासीयांना केल्याची आठवण त्यांनी यानिमित्ताने करून दिली.
देशाच्या सुरक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून घेण्यासाठी वचनबद्ध आहे ही बाबही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केली. भविष्याच्या दृष्टीने या क्षेत्रातील शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे, त्याबाबतीत भारतातील युवा वर्गातही मोठी क्षमता आहे, आणि 2047 पर्यंत विकसित भारताच्या संकल्पाची पूर्तता करण्यासाठी त्यांच्या क्षमतांचा उपयोग करून घेता यावा यादृष्टीने केंद्र सरकारही आवश्यक सर्व प्रयत्न करत आहे असे त्यांनी सांगितले.
देशातल्या विज्ञानाच्या शिक्षणात क्रांतीकारी परिवर्तन घडवून आणता यावे यासाठी, देशाच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, चिकित्सक विचारसरणी आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यावर भर दिला गेला असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. विकसित भारतासाठी विज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात भारतीय युवा वर्गाला जगाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम करणे, ही यावर्षीच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची संकल्पना आहे. या संकल्पनेत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील दृष्टिकोनाचे प्रतिबिंब उमटले आहे, असे ते म्हणाले. यंदाच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची संकल्पना म्हणजे नवोन्मेष आणि जागतिक विज्ञान क्षेत्राचे नेतृत्व करत विकासाचा मार्ग प्रशस्त करणे, या नव्या भारताच्या आकांक्षेचे प्रतिबिंब असल्याचेही राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाचा भाग म्हणून एका भव्य प्रदर्शनाचेही आयोजन केले गेले होते. या प्रदर्शनात 30,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात 200 जास्त दालने उभारली गेली होती. या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ ) विकसित केलेल्या संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान पाहण्याची दुर्मीळ संधीही मिळाली.
* * *
S.Kakade/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2107069)
आगंतुक पटल : 63