उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवे काश्मीर ही आता संघर्षाची कहाणी राहिली नसून विश्वासाच्या पुनर्निर्मितीची कथा झाली आहे, श्रद्धेचे फळ मिळू लागले आहे- उपराष्ट्रपती

Posted On: 15 FEB 2025 2:02PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली 15 फेब्रुवारी 2025 

उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले, “वर्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या 35 वर्षांतील सर्वाधिक मतदान झाल्याने काश्मीर खोऱ्यात मतदानाच्या सहभागात 30 अंकांची वाढ दिसून आली. लोकशाहीला तिचा खरा आवाज, अनुनाद प्राप्त झाला आहे. हा भाग आता संघर्षाची कहाणी सांगत नाही; काश्मीरमधील गुंतवणुकीसाठी येणारा प्रत्येक प्रस्ताव केवळ भांडवलविषयक नसून विश्वासाचे वातावरण पुन्हा निर्माण होत असल्याचे, श्रद्धेचे फळ मिळू लागल्याचे निदर्शक ठरत आहे.

हा बदल कळून न येण्याजोगा नाही तर तो ठळकपणे जाणवणारा आहे. दृष्टीकोनात बदल झाला आहे, मुलभूत वास्तव बदलत आहे, लोकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत,”असे उपराष्ट्रपती म्हणाले.

जम्मू आणि काश्मीरमधील कटरा येथे असलेल्या श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठाच्या 10 व्या पदवीदान समारंभात उपस्थितांना संबोधित करताना ते आज बोलत होते. उपराष्ट्रपती म्हणाले, “केवळ 2 वर्षांच्या कालावधीत जम्मू आणि काश्मीर मधील गुंतवणुकीसाठी 65,000 कोटी रुपयांचे प्रस्ताव सादर झाले. यातून या भागामध्ये लोकांना असलेले तीव्र आर्थिक स्वारस्य दिसून येते. वर्ष 2019 नंतर पहिल्यांदाच विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी या विषयात रुची दर्शवल्याने जम्मू आणि काश्मीरमध्ये थेट परदेशी गुंतवणुक होत आहे.  हा प्रदेश विश्वास आणि भांडवल यांचा संगम आहे,” असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवाद ही आपली ओळख आहे. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा राष्ट्रीय हिताला नेहमीच प्राधान्य देणे हे आपले परम कर्तव्य आहे. कोणतेही राजकीय अथवा व्यक्तिगत स्वारस्य देशाच्या हितापेक्षा मोठे नाही,” असे ते आग्रहपूर्वक म्हणाले.

कर्तव्यांचे महत्त्व अधोरेखित करत उपराष्ट्रपती म्हणाले, “प्रत्येक व्यक्तीची काही कर्तव्ये असतात. आपली संस्कृती आपल्याला आपल्या कर्तव्यांची शिकवण देत असते. आपण आपली नागरी कर्तव्ये दक्षतेने पार पाडली पाहिजेत, आणि जेव्हा आपण तसे करतो तेव्हा जे परिणाम हाती येतात ते उल्लेखनीय असतात. विकसित भारताच्या दिशेने जलदगतीने वाटचाल करत आपण सतत पुढे जायला पाहिजे. या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे वसाहतवादी मानसिकतेचे बंधन झुगारुन दंड विधानाचे न्याय विधानात झालेले परिवर्तन आहे.”

***

S.Kane/S.Chitnis/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2103533)