उपराष्ट्रपती कार्यालय

माध्यमांकडून नकारात्मक वृत्तांत आणि रचनात्मक प्रयत्नांकडे अपुरे लक्ष ही चिंतेची बाब -उपराष्ट्रपती


जगासमोर भारताची अचूक प्रतिमा मांडण्याचे उपराष्ट्रपतींचे माध्यमांना आवाहन

Posted On: 18 JUL 2024 8:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जुलै 2024


ठोस आणि दीर्घकालीन उपक्रमांपेक्षा  मर्यादित प्रभावांच्या घटनांना माध्यमांकडून अवाजवी प्रसिद्धी देण्याबाबत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज चिंता व्यक्त केली.

एका हिंदी दैनिकाने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या संसद भेटीत आज उपराष्ट्रपतींनी आपले विचार मांडले. प्रसारमाध्यमांमध्ये आत्मपरीक्षणाची गरज त्यांनी व्यक्त केली आणि भारताच्या विकासगाथेची दखल घेण्याचे आवाहन त्यांनी माध्यमांना केले.

लोकशाही टिकवण्यात पत्रकारितेच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल धनखड यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्याचसोबत माध्यमांचे व्यावसायिकरण आणि विशिष्ट हेतूंनी वृत्तांतांसाठी माध्यमांवर नियंत्रण याबाबत त्यांनी दुःख व्यक्त केले.  माध्यमांनी पक्षपाती मतांच्या  पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे आणि कुठलाही राजकीय अजेंडा किंवा राष्ट्रहित विरोधी शक्तींशी संलग्नता टाळली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

 

"हा आत्मशोधाचा काळ आहे. मी प्रसारमाध्यमांना अत्यंत विनम्रतेने आणि कळकळीने विकासात भागीदार होण्याचे आवाहन करतो. चांगल्या कामांवर त्यांनी प्रकाश टाकावा आणि चुकीच्या बाबी आणि त्रुटी त्यांनी निदर्शनास आणाव्यात" असे उपराष्ट्रपती म्हणाले.   

संसदेच्या कामकाजात  व्यत्यय आणि गोंधळ अपवाद न राहता राजकीय साधन झाले असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. व्यत्ययाचा उदोउदो करण्याच्या माध्यमांच्या वृत्तीबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आणि संसदीय कामकाजाचे वृत्तांकन करताना प्राधान्यक्रमांवर पुनर्विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले. व्यत्यय जेव्हा ठळक बातम्या होतात  आणि व्यत्यय आणणारे जेव्हा नायक ठरतात तेव्हा लोकशाही मूल्य जपण्याच्या आपल्या कर्तव्यात पत्रकारिता विफल ठरते, असे प्रतिपादन उपराष्ट्रपतींनी केले.

भारताची अचूक प्रतिमा जगासमोर मांडण्यासाठी माध्यमांनी आपली जबाबदारी पार पाडावी,असे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले."बाहेरचे लोक  भारताकडे त्यांच्या दृष्टिकोनातून पाहतात,ते भारताला तोलू शकत नाहीत. आपण महासत्ता होत असल्याचे,आपली अनपेक्षित व अकल्पनीय प्रगती होत असल्याचे पचनी पडत नाही असे काही लोक देशात तर बरेचसे बाहेर आहेत",  असे ते म्हणाले.

दुटप्पी भूमिका आणि अनैतिक आचरण यावर मात करणाऱ्या जबाबदार पत्रकारितेचे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले.


N.Chitale/S.Kakade/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2034122) Visitor Counter : 13