जलशक्ती मंत्रालय

अतिसार रोखण्यासाठी राष्ट्रीय अभियानात पेयजल आणि स्वच्छता विभागाचा सहभाग


पेयजल व स्वच्छता विभागाची शुद्ध पाणी आणि स्वच्छतेच्या सवयींबाबत गाव आणि पंचायत स्तरांवर जनजागृतीसाठी 1 जुलै 2024 पासून ‘स्वच्छ गाव, शुद्ध जल – बेहतर कल’ ही दोन महिन्यांची मोहीम

ग्रामीण स्वच्छता अभियान आणि अतिसार रोखा राष्ट्रीय मोहीम अशा परस्परानुरूप उपक्रमांमुळे सार्वजनिक आरोग्य राखण्याप्रती आमची वचनबद्धता अधोरेखित – सी. आर. पाटील


Posted On: 05 JUL 2024 12:50PM by PIB Mumbai


जलशक्ती मंत्रालयाचा पेयजल व स्वच्छता विभाग 24 जून 2024 रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी अतिसार रोखण्यासाठी सुरू केलेल्या राष्ट्रीय मोहिमेत सहभागी होत आहे.

ग्रामीण स्वच्छता अभियान आणि अतिसार रोखा राष्ट्रीय मोहीम अशा परस्परानुरूप उपक्रमांमुळे सार्वजनिक आरोग्य राखण्याप्रती आमची वचनबद्धता अधोरेखित होते. अशा संयुक्त प्रयत्नांद्वारे बालमृत्यू कमी करण्याबरोबरच आरोग्य आणि स्वच्छतेच्या सवयींनी युक्त अशी संस्कृती संपूर्ण ग्रामीण भारतात निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे”, असे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी मोहिमेतील सहभागाबाबत बोलताना सांगितले.

पेयजल व स्वच्छता विभागाच्या सचिव विनी महाजन यांनी सांगितले, “लहान मुले आणि समुदायाचे आरोग्य राखण्यासाठी हा उपक्रम हे महत्त्वाचे पाऊल आहे. अतिसार रोखण्यासाठी राष्ट्रीय अभियानाशी विभागाला जोडून घेताना अतिसारासारख्या प्रतिबंधात्मक रोगांमुळे होणारे बालमृत्यू रोखण्याचे आमचे ध्येय आहे. हे ध्येय गाठण्यासाठी शुद्ध पाणी आणि स्वच्छतेवर आम्ही लक्ष केंद्रीत करत आहोत.

दोन महिन्यांच्या कालावधीत बहुक्षेत्रीय, सर्वसमावेशी उपाययोजना करून अतिसारामुळे होणारे बालमृत्यू रोखण्याचे राष्ट्रीय अभियानाचे उद्दीष्ट आहे. अभियानातील महत्त्वपूर्ण बाबी पुढीलप्रमाणे

-    आरोग्य सुविधा बळकट करणे  आरोग्य सुविधांची नियमित देखभाल आणि विशेषतः ग्रामीण भागात ओआरएस, झिंक अशी आवश्यक औषधे उपलब्ध करून देणे.

-    शुद्ध पाणी व स्वच्छतेच्या सोयीसुविधा अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचवणे सुरक्षित पेयजल आणि स्वच्छता राखण्यासाठी दर्जा नियंत्रित करणाऱ्या, शाश्वत उपाययोजना करणे.

-    आरोग्यशिक्षणाचा प्रसार शाळांमध्ये आवश्य सुविधांचा पुरवठा करणे आणि मुलांना आरोग्यशिक्षण देणे.

अतिसार रोखण्यासाठीच्या अभियानाला पूरक म्हणून पेयजल व स्वच्छता विभागाने शुद्ध पाणी आणि स्वच्छतेच्या सवयींबाबत गाव आणि पंचायत स्तरांवर जनजागृतीसाठी 1 जुलै 2024 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत स्वच्छ गाव, शुद्ध जल बेहतर कलही मोहीम हाती घेतली आहे.

हे अभियान गाव आणि पंचायत स्तरावर जागरूकता वाढवण्यासाठी आणि सुरक्षित पाणी आणि स्वच्छतेच्या पद्धतींच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी आखण्यात आले आहे.

हे प्रयत्न, अतिसारामुळे होणारे बालमृत्यू कमी करण्याच्या अतिसार रोखा  राष्ट्रीय मोहिमेच्या उद्दिष्टात योगदान देतील.  तसेच संपूर्ण आरोग्यासाठी  भारतातील सर्व खेड्यांमध्ये हागणदारीमुक्त प्लस मॉडेल दर्जा  साध्य करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी योगदान देईल. 

 

मोहीमेतील प्रमुख.उपक्रम:

समुदाय  सहभाग: गावातील जल आणि स्वच्छता समित्या, पाणी समित्या आणि स्थानिक स्वराज्य संस्था समुदाय  सहभाग आणि जबाबदारी  सुनिश्चित करण्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांचे नेतृत्व करतील.

पाण्याची गुणवत्ता चाचणी: फील्ड टेस्ट किट्सद्वारे नियमित चाचणी घेतली जाईल. तिचे निष्कर्ष  अंगणवाडी केंद्रे, शाळा, आरोग्य सुविधा आणि समुदाय केंद्रांमध्ये दाखवले जातील.

संवेदना कार्यशाळा: जिल्हा जल व्यवस्थापन आणि स्वच्छता अभियान, स्थानिक समुदाय, सरकारी अधिकारी आणि इतर भागधारकांना जलव्यवस्थापन, स्वच्छता आणि आरोग्यसंवर्धन यावर प्रशिक्षण देतील.

गळती शोधणे आणि दुरुस्ती मोहीम: पाणी दूषित होणे टाळण्यासाठी आणि पाणी वाचवण्यासाठी पाणी पुरवठा यंत्रणेची तपासणी आणि दुरुस्ती.

सार्वजनिक जनजागृती मोहिमा: जल स्वच्छतेचे महत्त्व, वैयक्तिक घरगुती शौचालये /सीएससीच्या स्वच्छतेसाठी आणि वापरासाठी सुरक्षित स्वच्छता पद्धत  आणि जलजन्य रोगांचे प्रतिबंध यावर जनजागृती मोहीम.

असुरक्षित गटांवर विशेष लक्ष: अतिसार आणि इतर जलजन्य रोगांच्या घटना कमी करण्यासाठी पाच वर्षाखालील मुले आणि वृद्धांकडे विशेष लक्ष देणे

शैक्षणिक उपक्रम: लहान माता आणि किशोरवयीन मुलींसाठी स्वच्छतेच्या योग्य सवयी आणि निरोगी पद्धती तसेच लहान मुलांना शौचालयात जाण्याची तसेच हात धुण्याची सवय लावणे,याबाबत कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्रे.

टप्प्यानुसार  अंमलबजावणी:

पहिला आणि दुसरा आठवडा : मोहिमेचा शुभारंभ, जनजागृती सभा, पाण्याची गुणवत्ता चाचणी आणि संवेदना कार्यशाळा.

•  तिसरा आणि चौथा आठवडा: गळती शोधणे आणि दुरूस्तीची मोहीम, जनजागृती मोहीम आणि गाव स्वच्छता मोहीम.  संस्थांमध्ये साबणाने हात धुण्याची सुविधा सुनिश्चित करण्यासाठी स्वच्छता मोहीम.

पाचवा आणि सहावा आठवडा : क्लोरीन चाचणी, जनजागृती मोहिमाशाळा आणि अंगणवाडी केंद्रांमधील पाण्याची गुणवत्ता,संस्थांमधील अकार्यक्षम शौचालये आणि  ग्रे वॉटर व्यवस्थापन या संदर्भात विशेष तपासणी मोहीम .

सातवा आणि आठवा आठवडा : स्थानिक समुदायांसोबत काम, वर्षा जलसंचयनाला प्रोत्साहन, आणि वैयक्तिक घरगुती शौचालय (IHHL) कम्युनिटी सॅनिटरी कॉम्प्लेक्स (CSC) बांधण्यासाठी विशेष मोहीम आणि आरोग्यासाठी सुरक्षित पाण्याचे महत्त्व सांगणारी माहितीपत्रके घरोघरी वाटणे.

***

S.Kakade/R.Bedekar/S.Patgoankar/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2030994) Visitor Counter : 14