पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी गुजरातमध्ये द्वारका येथे 4150 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे केले लोकार्पण आणि भूमिपूजन
ओखा मुख्यभूमी आणि बेट द्वारकाला जोडणाऱ्या सुदर्शन सेतूचे केले लोकार्पण
वाडीनार आणि राजकोट-ओखा येथील पाईपलाईन प्रकल्पाचे केले लोकार्पण
राजकोट-जेतलसर-सोमनाथ आणि जेतलसर- वांसजालिया रेल्वे विद्युतीकरण प्रकल्पांचे केले लोकार्पण
राष्ट्रीय महामार्ग क्र.-927 च्या धोराजी- जामकंदोर्ना -कलावद सेक्शनच्या रुंदीकरण प्रकल्पाची केली पायाभरणी
जामनगर येथे प्रादेशिक विज्ञान केंद्राची केली पायाभरणी
सिक्का औष्णिक ऊर्जा केंद्रात फ्लू गॅस डिसल्फरायझेशन(FGD) प्रणाली बसवण्याच्या प्रकल्पाची केली पायाभरणी
“केंद्र आणि गुजरातमधील डबल इंजिन सरकारने राज्याच्या विकासाला प्राधान्य दिले आहे”
“अलीकडे मला अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचे भाग्य लाभले आहे. आज द्वारका धाममध्ये मला याच दिव्यत्वाची अनुभूती येत आहे”
“पाण्याखाली असलेल्या द्वारका नगरीमध्ये खाली उतरल्यावर एका दिव्यत्वाच्या अनुभूतीने मला व्यापून टाकले”
“सुदर्शन सेतूमध्ये, ज्याचे स्वप्न पाहिले होते, पाया घातला होता, आज त्याची पूर्तता झाली आहे”
“एक समृद्ध आणि सामर्थ्यवान राष्ट्र उभारण्यासाठी आधुनिक दळणवळण व्यवस्था हा मार्ग आहे”
“
प्रविष्टि तिथि:
25 FEB 2024 3:35PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये द्वारका येथे 4150 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. ओखा मुख्यभूमी आणि बेट द्वारका यांना जोडणारा सुदर्शन सेतू, वाडीनार आणि राजकोट-ओखा येथील पाईपलाईन प्रकल्प आणि राजकोट-जेतलसर-सोमनाथ आणि जेतलसर- वांसजालिया रेल्वे विद्युतीकरण प्रकल्पांचे लोकार्पण केले. राष्ट्रीय महामार्ग क्र. 927 च्या धोराजी- जामकंदोर्ना -कलावद सेक्शनच्या रुंदीकरण प्रकल्पाची, जामनगर येथील प्रादेशिक विज्ञान केंद्राची आणि जामनगर येथील सिक्का औष्णिक उर्जा केंद्रात फ्ल्यू गॅस डिसल्फरायजेशन प्रणाली बसवण्याच्या प्रकल्पांची त्यांनी पायाभरणी केली.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी भगवान कृष्णाच्या द्वारका माईच्या भूमीला वंदन केले जिथे द्वारकाधीश म्हणून त्यांची स्थापना केली आहे. आज सकाळी मंदिरात केलेल्या प्रार्थनेची त्यांनी आठवण केली आणि देशाच्या धार्मिक जीवनात तीर्थक्षेत्रांचे महत्त्व अधोरेखित केले.आदि शंकराचार्यांनी शारदा पीठ या चार पीठांपैकी एकाची स्थापना केली होती. नागेश्वर ज्योतिर्लिंग, रुक्मिणी देवी मंदिराच्या वैभवाचे देखील त्यांनी वर्णन केले. यावेळी त्यांनी ‘राष्ट्र काज’ म्हणजेच राष्ट्रकार्यादरम्यान अनेक धार्मिक स्थळांना भेट देण्याच्या संधींची माहिती दिली. पंतप्रधानांनी त्या अविस्मरणीय क्षणाविषयी देखील माहिती दिली ज्यावेळी त्यांनी समुद्रतळाशी असलेल्या द्वारका नगरीमध्ये प्रार्थना करण्यासाठी भेट दिली. पंतप्रधानांनी पुरातत्वशास्त्रीय आणि धार्मिक ग्रंथांमधल्या उल्लेखाचा आधार दिला. भगवान विश्वकर्मा यांनी द्वारका नगरीची उभारणी केली अशी धारणा असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान म्हणाले की द्वारका नगरी म्हणजे नगर नियोजनाचे अतिशय मोठे उदाहरण आहे. “ ज्यावेळी मी पाण्याखाली बुडालेल्या नगरीत उतरलो त्यावेळी एका दिव्यत्वाच्या अनुभूतीने मला व्यापून टाकले. मी प्रार्थना केली आणि माझ्या सोबत नेलेली मोरपिसे अर्पण केली. अनेक वर्षांपासून मनामध्ये असलेल्या इच्छेची ही पूर्तता होती. जेव्हापासून मी पाण्याखाली असलेल्या द्वारका नगरीविषयी ऐकले होते, तेव्हापासून मला नेहमीच तिथे जाण्याची आणि दर्शन घेण्याची इच्छा होती.”, या आध्यात्मिक अनुभवाने अतिशय भारावून गेलेल्या पंतप्रधानांनी सांगितले.
द्वारका इथे प्रार्थना करत असताना, 21 व्या शतकातील भारताच्या सामर्थ्याचे दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर कसे तरळत राहीले यावर भर देत पंतप्रधान म्हणाले की, यामुळे विकसित भारताच्या निर्मितीचा त्यांचा संकल्प अधिक दृढ झाला आहे.
पंतप्रधानांनी आज दिवसाच्या सुरुवातीला केलेल्या सुदर्शन सेतूच्या उद्घाटनाचा उल्लेख केला आणि 6 वर्षांपूर्वी त्याची पायाभरणी केल्याची आठवणही जागवली. हा सेतू ओखाची मुख्य भूमी आणि द्वारका बेटाला जोडेल, ज्यामुळे द्वारकाधीशाच्या दर्शनासाठी दळणवळण वाढेल आणि या क्षेत्राच्या पावित्र्यातही भर पडेल, अशी माहिती त्यांनी दिली. स्वतः पायाभरणी केलेल्या प्रकल्पांचे उद्घाटनही आपणच करु हा आत्मविश्वास अधोरेखित करून ते म्हणाले, “ही मोदींची हमी आहे.” सुदर्शन सेतू म्हणजे एक अभियांत्रिकी आश्चर्य असल्याचे सांगून, पंतप्रधानांनी अभियंते मंडळींना पुलाचे आणि त्याबाबतच्या तांत्रिक बाबींचे विश्लेषण करण्याचे आवाहन केले आणि उद्घाटनाबद्दल नागरिकांचे अभिनंदन केले.
द्वारका आणि बेट द्वारका येथील नागरिकांना, समुद्र फेरी आणि लांब रस्त्यांमार्गे कराव्या लागणाऱ्या प्रवासामुळे, तसेच मोठ्या भरतीच्या वेळी फेरी सेवा बंद ठेवावी लागत असल्यामुळे येणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकत, पंतप्रधानांनी ते गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या काळात, पुलासाठी जनतेने केलेल्या विनंतीची आठवण केली. गुजरातचे विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी हाती घेतलेले काम पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि त्यांच्या संकल्पाचे कौतुक केले.
तत्कालीन केंद्र सरकारला पूल मंजूर करण्यासाठी, त्यांनी सातत्याने केलेल्या विनंत्या नाकारल्या गेल्या, हे पंतप्रधान मोदी यांनी निदर्शनास आणून दिलं आणि अखेर आज काम पूर्ण झाल्याच्या भाग्याबद्दल आभार मानले. "भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने, मी त्यांच्या निर्देशांचे पालन केले आणि माझी जबाबदारी पार पाडली", असे पंतप्रधान कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने म्हणाले. पुलावर बसवण्यात आलेल्या सौर तबकड्यां मधून (सोलर पॅनल) या पुलावर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सुदर्शन सेतूमध्ये, समुद्राचे विस्तीर्ण आणि विहंगम दृश्य दिसू शकणारे एकूण 12 पर्यटक सज्जे आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. “मी आज या सज्ज्यांना भेट दिली आणि ते खरोखरच सुदर्शनीय आहेत,” असे पंतप्रधान पुढे म्हणाले.
स्वच्छता मोहिमेप्रती असलेल्या द्वारकेच्या लोकांच्या वचनबद्धतेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली आणि जगभरातून लक्ष वेधून घेतलेल्या इथल्या स्वच्छतेची पातळी तशीच कायम राखण्याची विनंती केली.
नवभारताच्या त्यांनी दिलेल्या हमीला झालेल्या विरोधाची आठवण करून देताना पंतप्रधान म्हणाले की, लोक आता आपल्या डोळ्यासमोर नवभारताचा उदय होताना पाहत आहेत. ते म्हणाले की, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि घराणेशाहीच्या राजकारणाच्या स्वार्थी विचारांमुळे गरीबांना मदत करण्याची इच्छा नसल्याने, यापूर्वी कधी हे शक्य झाले नाही. विकसित भारताच्या भव्य उद्दिष्टांच्या दृष्टीने अर्थव्यवस्थेचा आवाका यामुळेच लहान राहिला, असे त्यांनी सांगितले. यापूर्वीच्या राजवटीत वारंवार होत राहिलेल्या घोटाळ्यांवरही त्यांनी टीका केली.
2014 मध्ये सत्तेवर निवडून आल्यावर कुणालाही देशाची लूट करू देणार नाही या आपल्या वचनाचे स्मरण त्यांनी केले. “मागील सरकारच्या काळात हजारो कोटींचे घोटाळे होत होते, ते आता थांबले आहेत”, अशी टिप्पणी त्यांनी केली. 10 वर्षात देशाने 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून झेप घेतली आहे, असेही त्यांनी नमूद केले.याचा परिणाम म्हणून आपल्याला एकीकडे दैवी श्रद्धा असलेली स्थळे आणि तीर्थक्षेत्रे पुन्हा उभी राहीलेली दिसत आहेत तर दुसरीकडे मेगा प्रकल्पांद्वारे नवीन भारताचा विकास होत असल्याचे पाहायला मिळते आहे, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी गुजरातमधील भारतातील सर्वात लांब केबल आधारित सुदर्शन सेतू, मुंबईतील देशातील सर्वात लांब सागरी पूल, जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर बांधलेला भव्य पूल, निर्माणाधीन असलेला भारतातील पहिला वर्टिकल लिफ्ट पूल असलेला तामिळनाडूमधील न्यू पंबन ब्रिज आणि आसाममधील भारतातील नदीवरील सर्वात लांब पूल यांची उदाहरणे दिली. "अशा आधुनिक संपर्क सुविधा हा एक समृद्ध आणि मजबूत राष्ट्र निर्माण करण्याचा मार्ग आहे", असे ते म्हणाले.
देशातील पर्यटन वाढीसाठी संपर्क सुविधेचे महत्त्व अधोरेखित करताना, सुधारित संपर्क सुविधेमुळे गुजरात हे पर्यटनाचे केंद्र बनले असल्याचे सांगत पंतप्रधानांनी हा मुद्दा स्पष्ट केला. गुजरातच्या नवीन आकर्षणाबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, आज गुजरातमध्ये 22 अभयारण्ये आणि 4 राष्ट्रीय उद्याने आहेत. हजारो वर्षे जुने बंदर असलेल्या लोथल शहराची जगभरात चर्चा होते आहे, असेही ते म्हणाले. आज अहमदाबाद शहर, राणी की वाव, चंपानेर आणि धोलावीरा जागतिक वारसा बनले आहेत, असे त्यांनी सांगितले. शिवराजपुरी हा द्वारकेतील निळा ध्वज किनारा आहे तर आशियातील सर्वात लांब रोपवे गिरनारमध्ये आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आशियाई सिंहाचा एकमेव अधिवास म्हणजे गीरचे जंगल असल्याचे त्यांनी सांगितले. जगातील सर्वात उंच पुतळा, सरदार साहेबांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी एकता नगर येथे आहे, यांची त्यांनी आठवण करून दिली. आज रणोत्सवादरम्यान जगभरातील पर्यटकांचा मेळा जमतो. कच्छमधील धोर्डो गावाची गणना जगातील सर्वोत्तम पर्यटन गावांमध्ये केली जाते. नडाबेट हे देशभक्तीचे आणि पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र बनत आहे, असेही ते म्हणाले.
‘विकास भी विरासत भी’ या मंत्राला अनुसरून अनेक श्रद्धा केंद्रे अद्ययावत करण्यात येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. द्वारका, सोमनाथ, पावागड, मोढेरा आणि अंबाजी या सर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांमध्ये विविध सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. भारतात आलेला प्रत्येक पाचवा पर्यटक गुजरातला भेट देत असल्याचे ते म्हणाले. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत सुमारे 15.5 लाख पर्यटक गुजरातमध्ये आले होते, अशी माहिती त्यांनी दिली. ई-व्हिसा सुविधा देखील पर्यटकांना गुजरातकडे आकर्षित करत आहे, असे ते म्हणाले.
“सौराष्ट्राची भूमी ही संकल्पाच्या माध्यमातून उद्दिष्ट साध्य करण्याचे एक मोठे उदाहरण आहे”, असे पंतप्रधानांनी या प्रदेशाला दिलेल्या प्रत्येक भेटीत कशी नवीन ऊर्जा निर्माण होते यावर भर देताना सांगितले. सौराष्ट्रातील लोक जेव्हा पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तळमळत होते आणि त्यामुळे त्यांना स्थलांतर करणे भाग पडत होते, तेव्हाच्या कठीण काळाची आठवण करून देत पंतप्रधानांनी सौनी योजनेवर प्रकाश टाकला. या योजनेअंतर्गत सौराष्ट्रातील शेकडो गावांना सिंचनासाठी आणि पाणीपुरवठा करण्यासाठी 1300 किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. गुजरातसह सौराष्ट्राचा संपूर्ण प्रदेश येत्या काही वर्षांत यशाची नवी उंची गाठेल, असा विश्वास भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी व्यक्त केला. द्वारकाधीशांचे आशीर्वाद आपल्यावर सदैव आहेत. आपण सर्वजण मिळून विकसित सौराष्ट्र आणि विकसित गुजरात बनवू”, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाचा समारोप केला.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि खासदार सी आर पाटील यावेळी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पंतप्रधानांनी ओखा मुख्य भूमी आणि बेट द्वारका यांना जोडणाऱ्या सुमारे 980 कोटी रुपये खर्चाच्या सुदर्शन सेतूचे आज राष्ट्रार्पण केले. हा सुमारे 2.32 किमी लांबीचा देशातील सर्वात लांब केबल आधारित पूल आहे.
सुदर्शन सेतू एक अनोखी रचना असून यात दोन्ही बाजूंना श्रीमदभगवद्गीतेतील श्लोक आणि भगवान कृष्णाच्या प्रतिमांनी सुशोभित केलेला पदपथ आहे. यात पदपथाच्या वरील भागावर एक मेगा वॅट इतकी वीजनिर्मिती करणारे सौर पॅनल बसवले आहेत. या पुलामुळे वाहतूक सुलभ होईल आणि द्वारका आणि बेट द्वारका दरम्यान प्रवास करणाऱ्या भाविकांचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. पूल बांधण्यापूर्वी यात्रेकरूंना बेट द्वारकेला जाण्यासाठी बोटीच्या वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत होते. देवभूमी द्वारकेतील पर्यटकांसाठीही हा आगळा पूल मुख्य आकर्षण ठरणार आहे.
पंतप्रधानांनी वाडीनार इथे पाइपलाइन प्रकल्पाचे राष्ट्रार्पण केले ज्यामध्ये किनारपट्टी लगतच्या सध्या अस्तित्वात असलेल्या मार्गिका बदलणे, विद्यमान पाइपलाइन एंड मॅनिफोल्ड विलग करणे आणि संपूर्ण प्रणाली
जवळच्या नवीन ठिकाणी स्थानांतरित करणे या कामांचा समावेश आहे.
पंतप्रधानांनी राजकोट-ओखा, राजकोट-जेतलसर-सोमनाथ आणि जेतलसर-वांसजालिया रेल्वे विद्युतीकरण प्रकल्पाचेही राष्ट्रार्पण केले.
पंतप्रधानांनी राष्ट्रीय महामार्ग - 927D च्या धोराजी - जामकंदोर्ना - कालावाड विभागाचा रुंदीकरण प्रकल्प तसेच जामनगर येथील प्रादेशिक विज्ञान केंद्र; जामनगरच्या सिक्का औष्णिक ऊर्जा केंद्र येथे फ्लू गॅस डिसल्फरायझेशन प्रणालीची स्थापना यासह इतर प्रकल्पांचीही पायाभरणी केली.
***
N.Chitale/S.Patil/A.Save/S.Mukhedkar/S.Naik/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2008870)
आगंतुक पटल : 165
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada