संरक्षण मंत्रालय

दिल्ली येथे राजघाटाजवळ गांधी दर्शन येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महात्मा गांधी यांच्या दहा फूट उंच पुतळ्याचे केले अनावरण

Posted On: 10 DEC 2023 3:42PM by PIB Mumbai

 

दिल्लीमध्ये  राजघाटा जवळ गांधी दर्शन येथे दहा डिसेंबर 2023 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी  महात्मा गांधी यांच्या दहा फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले. आपल्या संबोधनात संरक्षण मंत्री यांनी सांगितले की भारताला परकीय सत्तेपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि समाजातल्या दुर्बल घटकांच्या उत्थानाचे कार्य करत त्यांना एक सन्मानाचे आयुष्य देण्यात मध्यवर्ती भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रपित्यासाठी ही समर्पक आदरांजली ठरेल.

गांधीजी हे सशक्त, समृद्ध आणि स्वच्छ भारताची कल्पना मांडणारे महान स्वातंत्र्यसेनानी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपलं सरकार हे राष्ट्रपित्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मार्गक्रमण करत आहे. महात्मा गांधी  यांनी कायमच प्रत्येक भारतीयाच्या हृदयात स्थान मिळवले होते, तसेच मार्टिन ल्युथर किंग जूनियर आणि नेल्सन मंडेला यांच्यासारख्या महान नेत्यांनी त्यांच्या देशातल्या जनतेच्या उन्नतीसाठी गांधीजी यांच्या कल्पना आणि दृष्टिकोनातून प्रेरणा घेतली होती असे सिंह यांनी निक्षून सांगितले.

देशभक्ती आणि वचनबद्धतेच्या माध्यमातून उपेक्षित घटकांच्या उत्थानासाठी कार्य केलेल्या महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्यासारख्या क्रांतिकारकांचे संरक्षण मंत्र्यांनी स्मरण केले.  हे महान नेते आपल्या सरकारसाठी दीपस्तंभाची भूमिका बजावत असल्याचे ते म्हणाले. शांतता, सामाजिक सलोखा, एकता आणि विकासाधारित बदल घडवणे ही आपली विचारसरणी असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारचे उद्दिष्ट हे कायमच योजनाबद्ध प्रगतीचे राहिले असून याच्या परिणामस्वरूप भारत हा जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे हे राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केले. गांधीजी हे केवळ स्वातंत्र्य सेनानी नव्हते तर एक अर्थतज्ञ होते ज्यांनी जग हे प्रत्येकाच्या गरजेसाठी पुरेसे पण प्रत्येकाची लालसा शमवण्यासाठी अपूरे असल्याचे मानले असे सिंह यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुरुष सहकाऱ्यांच्या बरोबरीनेचं महिलांचे सबलीकरण करत असून राष्ट्र उभारणीसाठी त्यांचे  योगदान सुनिश्चित करत असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

लोकांची सेवा प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने करून देशाला नवीन उंची गाठून देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा संरक्षण मंत्र्यांनी पुनरुच्चार केला. हीच महात्मा गांधी यांना खरी आदरांजली ठरेल असे ते म्हणाले.

***

S.Kane/S.Naik/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1984738) Visitor Counter : 88