वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारताला पॉवर ऑफ 30 पुढे नेत असून, 30 वर्षांखालील लोकसंख्येच्या प्रयत्नांनी 30 वर्षांमध्ये भारताची अर्थव्यवस्था 30 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सवर नेण्याचे स्वप्न असल्याचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन


5Gs, म्हणजेच growth (विकास), good governance (सुशासन), grit (निश्चय), genuine trust (खरा विश्वास) आणि green technologies (हरित तंत्रज्ञान) भारताला विकासाच्या वाटेवर पुढे नेत आहे: पीयूष गोयल

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी बहरीन येथील इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (भारतीय सनदी लेखापाल संस्था) परिषदेला संबोधित केले

Posted On: 01 DEC 2023 2:06PM by PIB Mumbai

 

भारताला आज पॉवर ऑफ 30 पुढे नेत असून, 30 वर्षांखालील लोकसंख्येच्या प्रयत्नांनी 30 वर्षांमध्ये भारताची अर्थव्यवस्था 30 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सवर नेण्याचे स्वप्न आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज बहरीन येथील इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (भारतीय सनदी लेखापाल संस्था) परिषदेला संबोधित करताना सांगितले. ते पुढे म्हणाले की, भारताचे बाजार भांडवल नुकतेच, 2 दिवसांपूर्वी 4 ट्रिलियन डॉलरवर पोहोचले असून, गुंतवणूकदारांसाठी ते जगातील सर्वोत्तम ठिकाण आहे. भारत आज जगाशी आत्मविश्वासाच्या अदम्य आणि अतुलनीय भावनेने संबंध ठेवतो, अहंकाराने नव्हे, असे गोयल यांनी निदर्शनास आणून दिले. ते म्हणाले की, भारत एक अशी अर्थव्यवस्था आहे जिथे बंदराची क्षमता 10 वर्षात दुप्पट झाली आहे, जिथे कार्यक्षम व्यावसायिक विमानतळांची संख्या गेल्या नऊ वर्षांत दुप्पट म्हणजेच 74 वरून 150 पर्यंत झाली आहेत आणि पुढील पाच वर्षांत 225 पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, जेथे आधुनिक उच्च दर्जाच्या रेल्वे आणि महामार्गांच्या मोठ्या नेटवर्कला पूरक ठरतील असे 140 नवीन अंतर्देशीय जलमार्ग सुरू करण्यात आले आहेत. जगाच्या इतर भागात जी सुंदर पायाभूत सुविधा आपण पाहतो, ती आता भारतात निर्माण होत आहे, असे त्यांनी नमूद केले.

उपस्थितांनी नवी दिल्ली येथे येऊन थोडा वेळ घालवावा, आणि नवीन संसद भवन पहावे किंवा उच्च दर्जाची आंतरराष्ट्रीय प्रदर्शने आयोजित केली जातात, त्या भारत मंडपमला त्यांनी भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. भारतात येऊन त्यांनी एक समृद्ध, गतिमान अर्थव्यवस्था पहावी, भारताच्या नागरिकांची काळजी घेणारी, जगण्यामध्ये सुलभता आणणाऱ्या संधी देऊन चांगल्या दर्जाचे जीवन, चांगले भविष्य प्रदान करणारी व्यवस्था पहावी, असे ते म्हणाले. ते म्हणाले की भारत आज 5Gs, म्हणजेच growth (विकास), good governance (सुशासन), grit (निश्चय), genuine trust (खरा विश्वास) आणि शाश्वतता प्रतिबिंबित करणारे green technologies (हरित तंत्रज्ञान) यामध्ये आघाडीवर आहे.

केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले की चार्टर्ड अकाउंटंट्स (सनदी लेखापाल) ही बहरीनमधील भारतीयांची सर्वात मोठी संघटित व्यावसायिक संस्था असून, त्याचे 450 हून अधिक सदस्य आहेत. ते म्हणाले की, उच्च दर्जाची एकता, उच्च नैतिकता आणि कठोर परिश्रम याच्या अतूट वचनबद्धतेसह ते बहरीनच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. ते पुढे म्हणाले की चार्टर्ड अकाउंटंट हे भारताचे जगभरातील आणि बहरीनमधील प्रतिनिधी आहेत. त्यांचे उत्तम काम आणि ज्ञानाचे योगदान याबद्दल गोयल यांनी त्यांचे आभार मानले.

बहरीनमधील भारताचे प्रतिनिधी म्हणून ते दाखवत असलेली वचनबद्धता, समर्पण, एकता, कठोर परिश्रम आणि उत्कटता, याचा भारताला अभिमान आहे. नेतृत्व, शाश्वतता, भू-राजकारण, मानवी क्षमता, निरोगी जीवन यासारख्या आजच्या काळाला साजेशा आणि आवश्यक विषयांवर  त्यांनी चर्चा आयोजित केल्याबद्दल गोयल यांनी प्रशंसा केली.

***

S.Patil/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1981606) Visitor Counter : 85


Read this release in: Hindi , Tamil , English , Urdu , Telugu