गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

स्वच्छ किनारे: पर्यटकांचे आकर्षण

Posted On: 31 OCT 2023 10:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 ऑक्‍टोबर 2023

 

शहरी भारतातील समुद्रकिनारे वर्षभर लोकप्रिय पर्यटनस्थळे म्हणून ओळखले जातात. विशाखापट्टणम, मुंबई, चेन्नई, गोवा, केरळ, ओदिशा या किनारपट्टीकडे जगभरातील पर्यटकांचे लक्ष वेधले गेले असून मोठ्या संख्येने  पर्यटक इथे भेट देतात.  हे किनारे किनारपट्टी भागात राहणाऱ्यांसाठी उत्पन्नाचा स्रोत तर आहेच शिवाय  स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. विविध प्रदेशांमधील समुद्रकिनाऱ्यावर प्रदूषण, पर्यटकांची  होणारी गर्दी आणि अपुरी देखभाल यासारख्या समस्या भेडसावतात.  समुद्रावरील  कचऱ्याच्या अस्तित्वामुळे सागरी आणि किनारी परिसंस्थेला मोठा धोका निर्माण होतो आणि परिणामी पर्यटनाला त्याची झळ बसते.  नागरिक आणि नागरी स्थानिक संस्था या धोक्याबद्दल अधिक जागरूक होत आहेत. देशभरातील जॉगर्स प्लॉगिंग पद्धतीचा अवलंब करत आहेत, ज्यामध्ये धावताना ते आजूबाजूचा कचरा उचलतात. यामुळे केवळ समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यास मदत होत नाही तर निरोगी जीवनशैलीला देखील प्रोत्साहन मिळते.

समुद्रकिनाऱ्यांवरील कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता वाढवण्यासाठी स्थानिक अधिकारी आणि समुदाय गटांकडून प्रयत्न केले जात आहेत. समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता राखण्यासाठी नियमितपणे  समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहेत. याव्यतिरिक्त, शहरी स्थानिक संस्था  लोकांना नैसर्गिक संसाधने आणि सागरी जीवन याचे जतन आणि संवर्धन करण्याच्या महत्त्वाबद्दल शिक्षित करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करत आहेत.

मुंबईच्या वाळूच्या किनार्‍यापासून ते विशाखापट्टणम, चेन्नई आणि ओदिशाच्या किनारपट्टीपर्यंत, समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता राखण्यासाठी तसेच कॉर्पोरेट आणि सामुदाय स्वयंसेवकांना या प्रयत्नांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. युवा टुरिझम क्लब  मुंबईत समुद्र आणि चौपाटी प्लास्टिकपासून मुक्त करण्यासाठी अनेकदा स्वच्छता मोहीम आयोजित करत असते, अफरोज शाह फाऊंडेशनचा  देखील विविध भागात अनेक समुद्रकिनारे स्वच्छता उपक्रमांमध्ये सहभाग असतो. अलिकडेच त्यांनी 900 स्वच्छता  स्वयंसेवकांसह वर्सोवा समुद्रकिनारी स्वच्छता उपक्रमात सहभाग नोंदवला आणि त्यांनी 80,000 किलो कचरा आणि 7000 हून अधिक गणेश मूर्ती बाहेर काढल्या.

एन्व्हायर्नमेंटलिस्ट फाउंडेशन ऑफ इंडिया मुंबई, चेन्नई,सह विविध  किनारपट्टीवर स्वच्छता मोहीम राबवते. मुंबई स्थित प्रोजेक्ट मुंबईच्या उपक्रमांमध्ये जल्लोष- किनारे स्वच्छ करा मोहिमेचा समावेश आहेत. या उपक्रमादरम्यान त्यांनी नऊ समुद्रकिनारे , दोन नद्या आणि दोन खारफुटीची जंगले स्वच्छ केली. त्यांनी या ठिकाणांहून 16,000 किलोपेक्षा जास्त कचरा गोळा केला. ते समुदाय-प्रणित  उपक्रम देखील आयोजित करतात.

उदाहरणार्थ, मुंबईचा क्लीन कोस्ट  मुंबई उपक्रम, किनार्‍यावरील प्रदूषणाच्या समस्यांचे प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी प्रगत बीच क्लिनिंग मशीन्सचा वापर करतो.  गोव्याच्या स्वच्छ सागर कार्यक्रमाने तेथील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांचे जतन  करण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर  स्वच्छता यंत्रांचा यशस्वीपणे वापर केला आहे. हे उपक्रम या किनारी प्रदेशांची पर्यावरण संवर्धनप्रति आणि त्यांच्या किनारपट्टीची शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याप्रति वचनबद्धता दर्शवतात.

महाराष्ट्रातील अलिबागमधील 3 किमी लांबीचा किनारा हा पर्यटक आणि शहरातील रहिवाशांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. समुद्रकिनारे अनेकांसाठी उत्पन्नाचे, विश्रांतीचे आणि मनोरंजनाचे साधन म्हणून काम करतात. मात्र, या किनार्‍यांची स्वच्छता आणि देखभाल याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. अलिबाग समुद्रकिनारा स्वच्छ राहील हे सुनिश्चित करण्यासाठी, समुद्रकिनारा स्वच्छ करणारे यंत्र वापरले जाते. हे यंत्र पृष्ठभागावर कोणतीही टाकाऊ वस्तू आणून प्रभावीपणे वाळू साफ करते. ही प्रक्रिया मातीच्या आत अडकलेला कोणताही कचरा काढून टाकण्यास मदत करते, परिणामी समुद्रकिनाऱ्याची संपूर्ण स्वच्छता होते. मुंबईत तरुण, विविध स्वयंसेवी गट शहराच्या किनारपट्टीच्या स्वच्छतेसाठी एकत्र काम करत  आहेत. प्रत्येक आठवड्याच्या शेवटी, ते शहरातील ठराविक  समुद्रकिनाऱ्यांवरील मलबा आणि प्लास्टिक कचरा हटवण्यासाठी एकत्र येतात. समुद्रकिनारे स्वच्छ करणारे स्वयंसेवक आणि मुंबईतील इतर स्वयंसेवी गट अनेकदा या समुद्रकिनाऱ्यांवरील PET बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या यासारखे एकदा वापरण्याचे प्लास्टिक उचलण्यासाठी एकत्र जमतात.

  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक तारीख एक तास  एक साथ' या आवाहनाला प्रतिसाद देत स्वच्छतेसाठी 9 लाखांहून अधिक ठिकाणी तसेच  समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात आली.  टाटा पॉवरच्या कर्मचार्‍यांनी मुंबईतील चिंबई बीचवर 40,000 किलोपेक्षा जास्त कचरा गोळा करून श्रमदान केले. मुंबईतील जुहू आणि वर्सोवा समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी नागरिकांबरोबर सहभागी  झाले.

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1973605) Visitor Counter : 104