गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे 'मेरी माटी-मेरा देश' मोहिमेअंतर्गत अमृत कलश यात्रेला प्रारंभ


'मेरी माटी - मेरा देश' हा केवळ एक कार्यक्रम नसून देशाच्या भवितव्याशी स्वतःला जोडून देशाला महान बनविण्याच्या प्रक्रियेचा एक भाग बनण्यासाठी माध्यम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान 2 लाखांहून अधिक कार्यक्रमांच्या आयोजनाद्वारे संपूर्ण देशात पुन्हा एकदा देशभक्तीची भावना जागृत झाली

Posted On: 01 SEP 2023 10:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2023

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे 'मेरी माटी-मेरा देश' मोहिमेअंतर्गत अमृत कलश यात्रेला सुरुवात केली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर, केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्रीमीनाक्षी लेखी आणि सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आपल्या भाषणात अमित शहा म्हणाले की, आजची घटना काहीशी सांजवेळेसारखी (दिवेलागणीसारखी) आहे, कारण भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होताना ती साकार होत आहे. ते म्हणाले की,  आगामी अमृतकाल आणि "संकल्प से सिद्धी" 15 ऑगस्ट 2047 पर्यंत भारताला जागतिक स्तरावर प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर नेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षात प्रत्येक भारतीयाला एकत्र येऊन महान भारत घडवण्यात योगदान देण्याची संधी देण्यात आली आहे.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, मेरी माटी-मेरा देश कार्यक्रमाचा मतितार्थ त्याच्या नावातूनच उधृत होतो. ते म्हणाले की, आता आपण स्वतंत्र भारतात राहत आहोत आणि त्यासाठी लाखो लोकांनी बलिदान दिले आहे. ते म्हणाले की, देशभक्तीने भारावलेल्या केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या व्यक्ती हातात ‘मिट्टी’ घेऊन प्रतिज्ञा करून ‘संकल्प से सिद्धी’ या प्रवासाची संकल्पना मांडू शकतात आणि बलिदान देणाऱ्यांप्रति आदरांजली अर्पण करतात.

केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले की, 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत प्रत्येक घर, वॉर्ड आणि गाव एका भांड्यात 'मिट्टी' किंवा धान्य गोळा करतील, त्यानंतर 1 ते 13 ऑक्टोबर या कालावधीत ब्लॉक आणि नंतर 22-27 ऑक्टोबर दरम्यान राज्य स्तरावर आणि शेवटी, 28-30 ऑक्टोबर या काळात ही 7,500 भांडी देशाची राजधानी नवी दिल्ली येथे पोहोचतील. केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी या अमृत कलशातील माती आपल्या महान वीरांच्या सन्मानार्थ नवी दिल्ली येथे तयार करण्यात आलेल्या अमृत वाटिकेत पसरतील. जेणे करून प्रत्येक भारतीयाला याचे स्मरण होत राहील की, अमृत काळात आपल्याला भारताला एक महान देश बनवायचे आहे.

केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, स्वतःला देशासाठी पुन्हा समर्पित करण्याच्या उद्देशाने 5 कार्यक्रमांची एक नवीन मालिका तयार करण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत देशातील प्रत्येक गावात शिलालेख बसवण्यात आले असून, देशातील कोट्यवधी नागरिकांनी ‘पंच प्रण’ची प्रतिज्ञा घेतली आहे, जे भारताला महान बनवण्याचा मार्ग सुकर करेल, वसुधा वंदन कार्यक्रमांतर्गत अमृत महोत्सवा निमित्त आयोजित कार्यक्रमात 75 झाडे लावण्यात आली असून वीरांचा सन्मान करण्यासाठी भारताचा राष्ट्रध्वज फडकावण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा दरम्यान, आयोजित करण्यात आलेल्या 2 लाखांहून अधिक कार्यक्रमांनी संपूर्ण देशात पुन्हा एकदा देशभक्तीची भावना जागृत केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा  आणि याच देशभक्तीच्या भावनेचा परिणाम म्हणजे नुकतेच आपले चांद्रयान चंद्रावरील शिवशक्ती बिंदूवर पोहोचले, हा क्षण सर्व देशवासियांसाठी अतिशय अभिमानास्पद आहे.

केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, आज आपली अर्थव्यवस्था जगात 11 व्या स्थानावरून 5 व्या स्थानावर गेली आहे आणि लवकरच आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू. ते म्हणाले की, भारतातील प्रत्येक नागरिकाच्या मनात जागृत झालेला आत्मविश्वास अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून घडला आहे. ते म्हणाले की, अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात निर्माण झालेला आत्मविश्वास, सर्जिकल स्ट्राइक करण्यासाठी आपल्या धाडसी सैनिकांना प्रेरणा देतो, आपल्या देशाच्या शास्त्रज्ञांना कोविड-19 लस विकसित करण्याचे सामर्थ्य देतो, आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांना चंद्र आणि सूर्याच्या कक्षेत पोहोचण्याचे धैर्य प्रदान करतो.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, ‘मेरी माटी-मेरा देश’, हा केवळ एक कार्यक्रम नसून, देशाच्या भवितव्याशी स्वतःला जोडण्याचे माध्यम आहे. ते म्हणाले की, हा कार्यक्रम स्वतःला देशाला महान बनवण्याच्या प्रक्रियेचा एक भाग बनवण्याचे माध्यम बनू शकतो, आणि 25 वर्षांनंतर जेव्हा आजची पिढी महान भारताचे नेतृत्व करेल, तेव्हा त्यांच्या मनाला समाधान वाटेल की, मागील पिढीने सामर्थ्यवान भारताच्या निर्मितीमध्ये योगदान दिले होते. 

 

S.Bedekar/R.Agashe/V.Joshi/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1954240) Visitor Counter : 125