दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

5जी चा वेगवान विस्तार

5जी च्या 2,00,000 व्या साईटची गंगोत्री इथे सुरुवात

गेल्या आठ महिन्यात, 700 जिल्ह्यांमध्ये 2,00,000 साईट स्थापन करण्यात आली आता देशातील सर्व 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशात 5-जी नेटवर्क सेवा सुरु झाली आहे.

चार धाम स्थळी फायबर दूरसंचार जोडणीचे लोकार्पण बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री अशा चारधाम स्थळी फायबर दूरसंचार जोडणीच्या माध्यमातून 5-जी मोबाईल सेवा सुनिश्चित

चार धामला जाणाऱ्या यात्रेकरूंना निर्वेध इंटरनेट सेवा मिळावी यासाठी उच्च इंटरनेट बैंडविड्थ भारतीय 4 जी/ 5 जी तंत्रज्ञानात अमेरिकेने दाखविला रस

Posted On: 24 MAY 2023 10:27PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या माणा इथे, विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करतांना, असे म्हटले होते. “एकविसाव्या शतकातील विकसित भारताचे दोन प्रमुख स्तंभ असतील.  पहिला स्तंभ म्हणजे आपल्या समृद्ध वारशाविषयीचा अभिमान आणि दूसरा स्तंभ म्हणजे, विकासासाठी सर्वतोपरी  प्रयत्न आणि उत्तराखंड आपले हे दोन्ही स्तंभ बळकट करत आहे.”

पंतप्रधानांचा हाच दृष्टिकोन पुढे नेत आणि विकासाचा स्तंभ बळकट करत, केंद्रीय दूरसंचार, रेल्वे तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आज गंगोत्री इथे, 5-जी नेटवर्कच्या 2,00,000 व्या साईटचा प्रारंभ केला आणि उत्तराखंडच्या डेहराडून  इथे चारधामसाठीच्या   फायबर दूरसंचार जोडणीचे राष्ट्रार्पण केले. केंद्र आणि राज्य सरकारमधील विविध अधिकारी देखील या कार्यक्रमाला प्रत्यक्ष अथवा, ऑनलाईन माध्यमातून उपस्थित होते.

पंतप्रधानांनी 1 ऑक्टोबर 2022 रोजी, देशात 5जी तंत्रज्ञानाची सुरुवात केली होती, आणि त्यानंतर 8 महिन्यातच, 700 जिल्ह्यात, 2,00,000 ठिकाणी, ह्या तंत्रज्ञानाची स्थापना करण्यात आली. 5-जी तंत्रज्ञान आता देशातील सर्व 28 राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशात सुरु करण्यात आले आहे. जगातील 5-जी तंत्रज्ञानाचा हा सर्वाधिक वेगाने झालेला विस्तार आहे.

बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री अशा चार धाम तीर्थस्थळी देखील 5जी मोबाईल नेटवर्क उपलब्ध करण्यात आले आहे. चारधाम यात्रा मार्गावरील बहुतांश टॉवर्सची जोडणी देखील पूर्ण झाली आहे.

फायबर कनेक्टीव्हिटीमुळे अत्यंत उच्च दर्जाची बैंडविड्थ सेवा मिळू शकते, ज्यामुळे तीर्थक्षेत्री  जाणाऱ्या सर्व लोकांना इंटरनेट सेवा निर्वेधपणे मिळू शकेल. सरकारच्या नागरिक -केंद्री धोरणाचा भाग म्हणून, या सर्व ठिकाणी पोहोचलेल्या इंटरनेट सेवेमुळे, लोकांचे जीवनमान अधिक सुखकर व्हायला मदत होईल. या सर्व ठिकाणच्या मंदिर परिसरात, तसेच यात्रा मार्गावर, कितीही यात्रेकरू असले, तरी त्यांच्या मोबाइलसाठी  आवाज  आणि व्हिडिओ कॉलचा दर्जा उत्तमच असेल. त्याशिवाय, पुढे, घांगरिया ते हेमकुंड साहिब हा संपूर्ण ट्रेकिंग मार्गावर  (6 किमी) देखील मोबाईल सेवा प्राप्त होईल.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अश्विनी वैष्णव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत दूरसंचार क्रांतीचा साक्षीदार बनतो आहे. 5G नेटवर्क सेवेचा विस्तार हा  जगातील सर्वात जलद नेटवर्क विस्तारापैकी एक आहे. यात दर मिनिटाला एक साइट स्थापित केली जात आहे. आज चार धामांपैकी एक असलेल्या गंगोत्री इथे, 2,00,000 वी 5जी नेटवर्क सेवा सुरु होणे, ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे, असेही ते पुढे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीनुसार, देशाने 6जी तंत्रज्ञानातही पुढाकार घेतला असून, आपल्याकडे 6जी तंत्रज्ञानाचे 100 हून अधिक पेटंट्स आहेत, ज्यावरुन आपल्या कुशल अभियंते आणि संशोधकांच्या  प्रतिभेचे दर्शन घडते, असेही वैष्णव म्हणाले. अमेरिकेसारख्या विकसित देशांनीही भारताच्या 4जी/5जी तंत्रज्ञानात रस दाखवला आहे, असेही त्यांनी संगितले.  ही सेवा सुरु करण्यात आणि त्यासाठीच्या मंजुऱ्या लवकरात लवकर देण्यासाठी उत्तराखंड सरकारने केलेल्या मदतीबद्दल, त्यांनी उत्तराखंड सरकारचे आभार मानले.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री  पुष्कर सिंह धामी यांनी राज्यातील दुर्गम भागात दूरसंचार सेवा सुरू करण्यासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल नेटवर्क सेवा प्रदात्यांचे आभार मानले. चारधाममधील कनेक्टिव्हिटीमुळे  यात्रेकरूंना त्यांचे नातेवाईक आणि जगाच्या संपर्कात राहणे शक्य होईल, असे सांगत, ह्या संचार क्रांतीमध्ये अतिदुर्गम गावांचाही समावेश करण्यात येत आहे, हे विशेष असल्याचे ते म्हणाले.  एकविसाव्या शतकातील तिसरे दशक हे उत्तराखंडचे दशक असेल, असे पंतप्रधानांनी म्हटले होते असे सांगत  भारत आज तंत्रज्ञानात आघाडीवर आहे, असे ते म्हणाले. आता पर्वतरांगांमध्ये मिळणाऱ्या उच्च जलदगती नेटवर्कमुळे आपत्ती व्यवस्थापन आणि प्रत्येक क्षणी देखरेख ठेवणे देखील शक्य होईल. जगात होत असलेल्या डिजिटल व्यवहारांपैकी 40 टक्के व्यवहार भारतात होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. भारत 5 जी मध्ये जागतिक मापदंड स्थापन करत असून, मोबाईल उत्पादनात देखील, भारत आघाडीवर आहे, असे ते म्हणाले. त्यांनी आपल्या भाषणात, डिव्हाईस, डिजिटल जोडणी, डेटा रेट आणि डिजिटल फर्स्ट अशा महत्वाच्या बाबींवर भर दिला. अंत्योदयाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शेवटच्या टोकापर्यंत नेटवर्क जोडणी पोहोचवण्याच्या उद्देशाने,  केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित काम करत आहे, असे त्यांनी सांगितले.

देशातील दुर्गम भागात आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत, जागतिक दर्जाची दूरसंचार जोडणी सेवा पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार अथकपणे काम करत आहे.

उत्तराखंड मधील दूरसंचार जोडणीसाठी राबवण्यात आलेले विविध उपक्रम:

दूरसंचार मंत्रालयाने या राज्याच्या अगदी दुर्गम कानाकोपऱ्यातही अतिशय मजबूत आणि परवडणारी दूरसंचार सेवा जलद गतीने पोहोचवण्यासाठी अनेक कार्यक्रम आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला आहे .

सध्या उत्तराखंड राज्यातील दूरसंचार सेवा खालीलप्रमाणे आहेतः

92.5 टक्के ग्रामीण लोकसंख्या असलेल्या भागात 4G मोबाइल सेवा पोहोचली आहे. (30.एप्रिल 2023 पर्यंत, उत्तराखंड राज्यात 1.4 कोटी मोबाइल ग्राहक आणि 3.2 लाख वायरलाइन ग्राहक आहेत).
33,000 BTS असलेल्या 9,000 मोबाईल टॉवर्सद्वारे ही सेवा देण्यात येते.  
उत्तराखंडमध्ये अनेक टॉवर्समध्ये  5G क्षमता अपग्रेड करण्यात आली आहेत.
गेल्या काही वर्षात उत्तराखंडमध्ये, खालील विशेष कार्यक्रम राबवण्यात आले आहेत:

उत्तराखंड राज्यात 354 USOF योजना 56 टॉवर्सची योजना आखण्यात आली आहे, त्यापैकी 41 साईट्स कार्यान्वित करण्यात आल्या आहेत, उर्वरित साईट्सवरील कामे प्रगतीपथावर आहेत.

...       4G चा सर्वत्र प्रसार करण्याच्या योजनेअंतर्गत एकूण 1236 गावे समाविष्ट करण्याचे नियोजित आहे, 360 गावांच्या ठिकाणी नवीन टॉवर्सना अंतिम रूप देण्यात आले आहेत, अतिरिक्त 382 गावे देखील प्रस्तावित करण्यात आली आहेत आणि 77 ठिकाणी विद्यमान टॉवर्स 4G नेटवर्कमध्ये अपग्रेड केले जात आहेत. राज्यातील सर्व गावांत 4G मोबाईल सेवा पुरवठा करण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे.

...    भारतनेट प्रकल्प: या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील प्रकल्पांतर्गत, एकूण योजना 1849 ग्रामपंचायतींना (बीएचक्यूसह) समाविष्ट करण्याची होती; त्यांपैकी 1816 गावे/ग्रामपंचायती  आधीच एकत्रित केली गेली आहेत (22 मे 2023 पर्यंत). उर्वरित 33 ग्रामपंचायतींमध्ये हे काम आता जून 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

***

Nilima C/Radhika A/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1927093) Visitor Counter : 159