ग्रामीण विकास मंत्रालय

दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजने अंतर्गत 31,000 हून अधिक रोजगार निर्मिती मार्गावर असल्याने ग्रामीण रोजगाराला मोठी चालना मिळणार

Posted On: 27 MAR 2023 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 मार्च 2023

 

ग्रामीण रोजगाराला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालय 19 कॅप्टिव्ह अर्थात स्वतःच्या आस्थापनेत रोजगार देणाऱ्या आणि त्यासाठी प्रशिक्षण सुविधा असणाऱ्या  नियोक्त्यांसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणार आहे. या सामंजस्य करारानुसार या नियोक्त्यांना दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजने (डीडीयु- जीकेवाय) अंतर्गत 31,067 ग्रामीण गरीब तरुणांना प्रशिक्षण आणि किमान 6 महिन्यांसाठी दरमहा किमान 10,000 रुपये पगारासह फायदेशीर रोजगार उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य प्रदान करण्यात येणार आहे. 

केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह उद्या नवी दिल्ली येथे सामंजस्य करार स्वाक्षरी समारंभात प्रमुख पाहुणे असतील. या प्रसंगी, ते दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजने अंतर्गत अशा प्रकारचे प्रशिक्षण घेतलेल्या आणि कॅप्टिव्ह नियोक्त्यांकडे  रोजगार उपलब्ध झालेल्या काही उमेदवारांना नियुक्ती पत्रे देखील प्रदान करतील.

गिरीराज सिंह यांच्या निर्देशानुसार ग्रामीण विकास मंत्रालयाने दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजने (डीडीयु- जीकेवाय) अंतर्गत यासंदर्भात रोजगार मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, जेणेकरून उमेदवारांना उद्योगाच्या गरजेनुसार प्रशिक्षित केले जाईल आणि त्यांना रोजगारही मिळेल. कॅप्टिव्ह  रोजगार प्रणाली नियोक्त्याला ग्रामीण युवकांची निवड करण्याची, कौशल्याची आणि त्यांच्या स्वतःच्या आस्थापना / त्यांच्या मालकीच्या इतर आस्थापना / उपकंपन्यांपैकी एकामध्ये रोजगार देण्याची परवानगी देते.

भरती, प्रशिक्षण आणि तैनाती (RTD) प्रणाली एकीकडे उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि दुसरीकडे ग्रामीण तरुणांसाठी शाश्वत रोजगार सुनिश्चित करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. ही प्रणाली उद्योग, सरकार आणि ग्रामीण गरीब तरुणांसाठीही फायद्याची ठरेल. उद्योग त्यांच्या गरजेनुसार नोकरीच्या ठिकाणीच उच्च प्रशिक्षण प्रदान करण्यास सक्षम असेल तर सरकार ग्रामीण गरीब तरुण उमेदवारांसाठी दीर्घ रोजगार (किमान सहा महिने) सुनिश्चित करेल.

दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेचे मूळ उद्दिष्ट ग्रामीण युवकांना कौशल्य प्रशिक्षणानंतर शाश्वत पद्धतीने कॅप्टिव्ह रोजगार प्रदान करणे हाच आहे. म्हणूनच 2020 मध्ये अंत्योदय दिवसाच्या निमित्ताने विशिष्ट रोजगाराची संकल्पना मांडण्यात आली आणि याचा प्रारंभ देखील करण्यात आला.

 

 

 

 

 

N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1911167) Visitor Counter : 214