गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची बिहार इथं भारत-नेपाळ सीमेवरील फतेहपूर बीओपी ला भेट, स्तंभ 151 आणि 152 चे केले निरीक्षण तसेच सशस्त्र सीमा दलासोबत सीमाभागातल्या विविध घडामोडींचा घेतला आढावा
“पंतप्रधान पद स्वीकारल्यानंतर, नरेंद्र मोदी यांनी सीमाभागात आधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी करत आपल्या सीमा सुरक्षित करण्याची कटिबद्धता कृतीतून केली व्यक्त”-गृहमंत्री
“देशाची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासह, आपत्तीच्या काळात मदत व बचावकार्य आणि निष्पक्ष निवडणुका यामध्ये आपल्या सुरक्षा दलांची महत्वपूर्ण भूमिका”
“सशस्त्र सीमा दलाच्या शूर जवानांनी, एक दीर्घकालीन लढा हिमतीने आणि शौर्याने यशस्वी करत देशाच्या पूर्व भागातून डाव्या कट्टरपंथी कारवाया समूळ नष्ट करण्यात अमूल्य योगदान दिले”
“सैन्यदलांचा त्याग, समर्पण आणि बलिदान हे कृतज्ञ राष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल”
“खुल्या सीमा प्रदेशाच्या सुरक्षिततेसाठी तंत्रज्ञानाचा वापर अतिशय आवश्यक, बीएसएफ आणि इतर सुरक्षा दलांच्या उत्तम पद्धतींचा अवलंब करत, सशस्त्र सीमा दलानेही अशा तंत्रज्ञान वापराला प्राधान्य द्यावे” -अमित शाह
Posted On:
24 SEP 2022 6:32PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज बिहार इथल्या भारत-नेपाळ सीमेजवळील, फतेहपूर बीओपी -म्हणजेच सीमेवरील निरीक्षण चौक्याना भेट दिली आणि स्तंभ 151 तसेच 152 चे निरीक्षण केले, तसेच, सशस्त्र सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी सीमाभागातील सुरक्षाविषयक घडामोडींचा आढावा घेतला. फतेहपुर पेकटोला, बेरिया, आमगाछी आणि रानीगंज इथल्या बीओपीच्या इमारतींचे उद्घाटनही त्यांनी केले. तसेच यावेळी त्यांनी सशस्त्र सीमा दलाच्या जवानांशी संवाद साधत त्यांच्यासोबत अल्पोपहारही घेतला. त्यानंतर अमित शाह यांनी, तिथल्या बूढ़ी काली माता मंदिरात देवीचे दर्शन आणि प्रार्थना केली.
![https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001D8GC.jpg](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001D8GC.jpg)
यावेळी, बिहार सीमेवरच्या पांच चौक्याच्या इमारतींच्या उद्घाटनप्रसंगी बोलतांना ते म्हणाले, की देशाचे सैनिकच देशाच्या सीमा सुरक्षित राहतील याची काळजी कोणत्याही कठीण प्रसंगात घेत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा दलांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत, असे सांगत त्यापैकी काही सुविधांचे आज उद्घाटन झाले असं अमित शाह म्हणाले. देशांत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच, आपत्ती व्यवस्थापन काळात मदत आणि बचावकार्य तसेच, देशांत निर्भय आणि मुक्त वातावरणात निष्पक्ष निवडणुका होतील, यासाठीची जबाबदारी पार पाडण्यात सुरक्षा दलांची महत्वपूर्ण भूमिका असते, असे अमित शाह म्हणाले.
![https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0028SHU.jpg](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0028SHU.jpg)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार, सुरक्षा दलाच्या सीमाभागातील सर्व कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कालबद्ध स्वरुपात आणि टप्प्याटप्याने निवासी सुविधा देण्यासाठी गेल्या आठ वर्षांपासून काम करत आहे, असे शाह यांनी सांगितले.
![https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003KIRK.jpg](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003KIRK.jpg)
सशस्त्र सीमा दलाला एक इतिहास आहे, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात जेव्हा भारत सरकारने ‘एक राष्ट्र आणि एक सीमा सुरक्षा दल’ हे धोरण स्वीकारले होते, तेव्हापासून भारत-नेपाळ आणि भारत-भूतानच्या खुल्या सीमांच्या सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी सशस्त्र सीमा बलकडे देण्यात आली असून या दलाने आपली जबाबदारी चोख पार पाडली आहे, असे गृहमंत्री पुढे म्हणाले.खुल्या सीमांचे संरक्षण अधिक कौशल्याने आणि काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे आणि हे काम सक्षमपणे करत एसएसबी सर्व प्रकारच्या बेकायदेशीर कारवायांना रोखण्यात यशस्वी झाले आहे, असे शाह म्हणाले. अशा परिस्थितीत गावांशी आपला संवाद, माहितीचे जाळे आणि सेवेच्या माध्यमातून गावकऱ्यांशी आपली वागणूक ह्या सगळ्या गोष्टी, सीमा सुरक्षित करण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात, असे त्यांनी सांगितले.
![https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004DA39.jpg](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004DA39.jpg)
बिहार आणि झारखंडमध्ये जेव्हा डाव्या कट्टरपंथी कारवाया शिगेला पोहोचल्या होता, तेव्हा एसएसबीच्या जवानांनी ह्या कट्टरपंथी कारवायांविरुद्धच्या लढ्यात मोठे योगदान दिले आहे, जे देश कधीही विसरू शकत नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. एसएसबीच्या जवानांनी नक्षलवादाच्या विरोधात कठोर लढा दिला आणि सर्वोच्च बलिदान देऊन देशाच्या पूर्वेकडच्या भागातून त्याचे समूळ उच्चाटन केले आणि त्याचाच परिणाम म्हणून आज बिहार आणि झारखंडमधील नक्षलवाद जवळजवळ संपण्याच्या मार्गावर आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. जेव्हा सीमा खुल्या असतात, तेव्हा तंत्रज्ञानाचा वापर खूप महत्त्वाचा ठरतो. सीसीटीव्ही असो की ड्रोन, विविध तंत्रज्ञानांचा अवलंब करून सीमांची सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे अशी सूचना त्यांनी केली.एसएसबीने बीएसएफ आणि इतर सुरक्षा दलांच्या चांगल्या पद्धती स्वीकारून, तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे कारण तंत्रज्ञान हे सीमा सुरक्षित करण्यासाठीचे एक उत्तम माध्यम बनू शकते, असेही ते पुढे म्हणाले.
![https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005MYAT.jpg](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005MYAT.jpg)
जेव्हा केंद्रीय गृह मंत्रालयाने 2019 मध्ये वृक्षारोपण मोहीम सुरू केली तेव्हा त्यांचे लक्ष्य साध्य करणारे सुरक्षा दलांमध्ये एस एस बी हे पहिले होते, असेही केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले.
![https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image006QMUO.jpg](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image006QMUO.jpg)
***
N.Chitale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1861955)
Visitor Counter : 190