दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

विभागीय अधिकाऱ्यांनी देशातील प्रत्येक घर संपर्क व्यवस्थेशी जोडले जाईल याची खातरजमा करत सेवेची गुणवत्ता सुधारली पाहिजे - अश्विनी वैष्णव


दूरसंवाद अधिकाऱ्यांची परिषद: दूरसंवादाची विकासगाथा पुढे नेण्यासाठी विभाग आणि उद्योग आले एकत्र

Posted On: 15 SEP 2022 10:01AM by PIB Mumbai

विभागीय अधिकाऱ्यांनी देशातील प्रत्येक घर, संपर्क व्यवस्थेशी जोडले जाईल याची खातरजमा करत सेवेची गुणवत्ता सुधारली पाहिजे. या समान उद्दिष्टांबाबत नियामक ते विभागीय अधिकाऱ्यांच्या मानसिकतेत जाणीवपूर्वक बदल करण्याची गरज आहे असे दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. ते काल  क्षेत्रीय अधिकारी, विभागीय मुख्यालय अधिकारी आणि उद्योग प्रतिनिधींच्या दोन दिवसीय परिषदेला संबोधित करत होते.  

सकाळच्या सत्रात दळणवळण राज्यमंत्री देविसिंह चौहान यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. दुपारच्या सत्रात दूरसंवाद क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर संबंधित कार्यगटाचे निष्कर्ष आणि शिफारसी दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव तसेच दळणवळण राज्यमंत्री यांच्यासमोर मांडण्यात आल्या.  

जागतिक डिजिटल परिप्रेक्ष्यात, विशेषत: डिजिटल अर्थव्यवस्थेचा विचार करता, दर्जेदार टेलिकॉम संपर्क व्यवस्थेचे महत्व अश्विनी वैष्णव यांनी यावेळी निदर्शनाला आणून दिले. क्षेत्रीय, मुख्यालयातील विभागीय अधिकारी, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्यच दूरसंवाद क्षेत्राला तंत्रज्ञानाच्या बदलत्या स्वरूपासह पुढे नेऊ शकेल, असे ते म्हणाले. विद्यमान जुन्या दूरसंवाद कायद्यांची जागा घेण्यासाठी सक्षम तसेच भविष्यवेधी दूरसंवाद कायद्याची गरज आहे. या संबंधातील मसुदा, जनतेचा सल्ला/मते जाणून घेण्यासाठी लवकरच प्रसिद्ध केला जाईल, असेही ते म्हणाले.

***


Gopal C/Vinayak/CYadav 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1859472) Visitor Counter : 168