पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

के.के. पटेल सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या लोकार्पण कार्यक्रमात  पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 15 APR 2022 10:36PM by PIB Mumbai

 

नमस्कार

तुम्हा सर्वांना माझा जय स्वामीनारायण.माझ्या कच्छी बंधू भगिनींनो कसे आहात? मजेत ना ? आज के.के. पटेल सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे आपल्या सेवेसाठी लोकार्पण होत आहे.

तुम्हा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा.

गुजरातचे लोकप्रिय, मृदू आणि खंबीर आपले मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल,महंत स्वामी पूज्य धर्मानंदन दास जी, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया जी, गुजरात विधानसभेच्या अध्यक्ष निमाबेन आचार्य, गुजरात सरकारचे इतर मंत्री, संसदेतील माझे सहकारी ,विनोद छाबरा, अन्य लोकप्रतिनिधी,येथे उपस्थित असलेले पूज्य संत, कछीय लेवा पटेल शिक्षण आणि वैद्यकीय विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष गोपालभाई गोरछिया जी, अन्य सर्व विश्वस्त, समाजातील प्रमुख सहकारी  , देशभरातील आणि जगभरातील सर्व दानशूर व्यक्ती , वैद्यकीय कर्मचारी आणि सर्व सेवारती आणि कर्मचारी आणि कच्छच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.

आरोग्याशी संबंधित इतक्या मोठ्या कार्यक्रमासाठी कच्छवासीयांचे खूप खूप अभिनंदन.गुजरातचेही अभिनंदन. भूकंपामुळे झालेला  विध्वंस मागे टाकून भूज आणि कच्छमधील लोक आता आपल्या मेहनतीने या प्रदेशाचे नवे भाग्य लिहीत आहेत.आज या भागात अनेक आधुनिक वैद्यकीय सेवा अस्तित्वात आहेत. याच मालिकेत आता   भूजला आज आधुनिक सुपर स्पेशालिटी रुग्णालय उपलब्ध होत आहे. हे कच्छचे पहिले धर्मादाय सुपर स्पेशालिटी रुग्णालय आहे.या आधुनिक आरोग्य सुविधेसाठी कच्छचे खूप खूप अभिनंदन. हे 200 खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय कच्छमधील लाखो लोकांना परवडणाऱ्या दरात  आणि सर्वोत्तम उपचार प्रदान करणार आहे.हे आपल्या सैनिकांच्या आणि निमलष्करी दलाच्या कुटुंबियांना आणि व्यापार  जगतातल्या अनेक लोकांसाठी सर्वोत्तम उपचाराची हमी म्हणून पुढे येणार आहे.

 

मित्रांनो,

उत्तम आरोग्य सुविधा केवळ आजारांवर उपचार करण्यापुरत्या मर्यादित नाहीत. या सुविधा  सामाजिक न्यायाला प्रोत्साहित करतात, सन्मानित करतात. जेव्हा गरीब व्यक्तीला परवडणाऱ्या दरात  आणि उत्तम उपचार मिळतात, तेव्हा त्यांचा  व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होतो.गरीबाला उपचाराच्या खर्चाच्या चिंतेतून मुक्तता मिळाली, तर तो निश्चिंत होऊन गरिबीतून बाहेर येण्यासाठी परिश्रम करतो. गेल्या काही वर्षांमध्ये  आरोग्य क्षेत्रात राबवलेल्या सर्व योजनांची प्रेरणा हाच विचार आहे. आयुष्मान भारत योजना आणि जनऔषधी योजनेमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या  उपचारासाठी खर्च होणाऱ्या लाखो रुपयांची दरवर्षी  बचत होत आहे.आरोग्य आणि निरामयता केंद्रे, आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा योजना यांसारखी अभियाने  सर्वांना  उपचार सहज उपलब्ध करून देण्यात मदत करत आहेत.

आयुष्मान भारत डिजिटल आरोग्य अभियानामुळे रुग्णांच्या सुविधांमध्ये अधिक  वाढ होणार आहे. आयुष्मान आरोग्य पायाभूत सुविधा अभियानाच्या  माध्यमातून आधुनिक आणि महत्वपूर्ण आरोग्य सेवा पायाभूत सुविधांचा विस्तार, जिल्हा आणि तालुका स्तरापर्यंत केला जात आहे.आज डझनभर एम्स सोबतच अनेक सुपर स्पेशालिटी रूग्णालयेही  देशात उभारली जात आहेत. देशातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे उद्दिष्ट असो किंवा वैद्यकीय शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असो, येत्या दहा वर्षांत देशाला विक्रमी संख्येने नवे डॉक्टर मिळणार आहेत. आणि याचा लाभ  आपल्या  कच्छलाच मिळणार आहे.  गोपाळभाई मला इथे सांगत होते, मी लाल किल्ल्यावर सांगितले होते  की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात  प्रत्येकाने काहीतरी योगदान दिले पाहिजे आणि आज तो संकल्प पूर्ण होत आहे.त्याच्यासाठी खरोखर ही कर्तव्याची भावना, समाजाप्रती निष्ठेची भावना, समाजाप्रती सद्भावना - संवेदना , ही त्याची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि हे कच्छचे वैशिष्ट्य आहे. तुम्ही कुठेही जा,कुठेही भेटा, कच्छी असल्याचे सांगा  त्यानंतर तुम्ही कोणत्या गावचे आहात, कोणत्या जातीचे आहात, असे कोणीही विचारणार नाही. तुम्ही लगेचच त्यांचे होता. हे कच्छचे वैशिष्ट्य आहे आणि कच्छचे कर्तव्य म्हणून ओळख प्राप्त करण्याच्या दिशेने  आपण पाऊल टाकत आहात, आणि म्हणून तुम्ही सर्व आणि इथेच नाही आणि भूपेंद्रभाईंनी म्हटल्याप्रमाणे, पंतप्रधानांना हा  सर्वात प्रिय असलेला  जिल्हा, खरे तर संकटकाळात जेव्हा आपल्याला संकटाच्या वेळी जे कोणी  आवडते, तेव्हा ते नाते अधिक अतूट होते.आणि कच्छमध्‍ये भूकंपामुळे जी वेदनादायक परिस्थिती होती , त्या  परिस्थितीत माझे  तुमच्याशी जे घनिष्ठ संबंध निर्माण झाले , त्याचाच हा परिणाम आहे.मी कच्छला  सोडू शकत नाही आणि कच्छ मला सोडू शकत नाही.आणि सार्वजनिक जीवनात असे भाग्य फार कमी लोकांना मिळते  आणि ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज गुजरात चहू  दिशांना  प्रगती करत आहे.

गुजरातच्या विकासाची गोष्ट  केवळ गुजरातमध्येच नव्हे तर देशभरात याची दखल घेतली जाते. तुम्ही विचार करा, दोन दशकांपूर्वी गुजरातमध्ये फक्त 9 वैद्यकीय महाविद्यालये होती. दोन दशके, केवळ  9 वैद्यकीय महाविद्यालये, आणि  गुजरातच्या तरुणांना डॉक्टर व्हायचे असेल तर अकराशे जागा होत्या.आज एक एम्स आहे, आणि तीन डझनहून अधिक वैद्यकीय महाविद्यालये आहेत.आणि जेव्हा दोन दशकांपूर्वी  हजार मुलांसाठीच   वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा होत्या. आज सहा हजार मुले  डॉक्टर होऊ शकतील अशी  व्यवस्था आहे आणि  2021 मध्ये राजकोटमध्ये 50 जागांसह एम्स सुरू झाले आहे.अहमदाबाद, राजकोट येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या  आधुनिकीकरणाचे   काम सुरू आहे. भावनगर वैद्यकीय महाविद्यालयाच्या  आधुनिकीकरणाचे  काम जवळपास पूर्ण झाले आहे.अहमदाबादचे सिव्हिल रुग्णालय 1500 खाटांचे, आणि माझ्या दृष्टिकोनातून हे एक मोठे काम आहे.माता आणि शिशु , आई आणि बालकांसाठी  खर्‍या अर्थाने उत्तम व्यवस्था असलेली संपूर्ण संरचना  इथे उभारण्यात आली आहे. हृदयरोगशास्त्र आणि संशोधनासाठी 800 खाटांचे स्वतंत्र रुग्णालय असून तेथे संशोधनाचे कामही केले जाते. गुजरातमध्ये कर्करोग संशोधनाचे कामही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.इतके की, संपूर्ण देशात   मूत्रपिंडाच्या आजाराचे रुग्ण आणि डायलिसिसची गरज हे  मोठे संकट होतेजिथे आठवड्यातून दोनदा डायलिसिस करावे लागते, मात्र महिन्यातून दोनदा सुद्धा ते मिळत नाही , तिथे त्याच्या शरीराचे काय होत असेल ? आज आम्ही जिल्हा-जिल्ह्यात विनामूल्य डायलिसिस सेवा सुरू केली आहे. त्यामुळे एक प्रकारे मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे.

पण मला तुम्हा सर्व बंधू भगिनींशी बोलायचे आहे. हा स्वातंत्र्याचा अमृतोत्सव आहे, आपण कितीही रुग्णालये बांधली, कितीही, लाखो नवीन खाटा उपलब्ध केल्या,पण त्यामुळेच  केवळ समस्या कधीच सुटू शकत नाहीत.पण आपण  समाजात अशाप्रकारची  जागृती करून ,आपण सर्वांनी आपापल्या कर्तव्याचे पालन करून , आणि असे वातावरण निर्माण करूया की आपल्याला रुग्णालयात जावे लागणार नाही.. या सर्व समस्यांवर उपाय म्हणजे रुग्णालयात जावेच लागणार नाही आणि आज एका अतिशय सुंदर रुग्णालयाचे उद्घाटन होत आहे.पण मला जर शुभेच्छा द्यायच्या असतील तर मी कोणत्या देऊ ? मी तुम्हाला शुभेच्छा देतो की, आपल्या के. के. पटेल विश्वस्त संस्थेने  इतक्या कोटी रुपयांची गुंतवणूक केली, सुंदर रुग्णालय बांधले पण देव करो कुणालाही रुग्णालयात यावे लागू नये आणि रुग्णालय रिकामेच राहावे.मला तर असेच  दिवस पाहायचे आहेत.  आणि रुग्णालय  कधी रिकामे राहू शकते,जेव्हा आपण स्वच्छतेकडे लक्ष देतो.स्वच्छतेसाठी धडधाकट लोकांमध्ये आग्रह असावा ,घरात आणि घराबाहेर कुठेही घाणीचे नामोनिशाण नसावे, घाणीचा तिरस्कार असावा , त्यातून निर्माण होणाऱ्या वातावरणात रोगांच्या प्रवेशाला मार्ग मिळेल? नाही मिळणार.  त्याचप्रमाणे आपल्या देशात पाणी, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतेची मोहीम राबवण्यात आली.  शौचालये बांधण्याची मोहीम राबवण्यात आली. हागणदारीपासून मुक्तीसाठी मोहीम राबवण्यात आली. आणि संपूर्ण देशात समाजानेही सहकार्य केले. आणि सर्वांना माहीत आहे की, कोरोनाच्या लढाईत आपण जिंकू लागलो कारण मूळ शरीर बळकट  असेल तर लढाई जिंकता येते. इतके मोठे  वादळ आले, , तरीही आपण  लढतोय पण  कोरोना अजूनही गेलेला नाही, आपल्याला चूक करायची नाही, मात्र अन्य देखभाल आणि जल जीवन अभियानाच्या माध्यमातून नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे काम देशभर सुरू आहे. ज्याप्रमाणे  शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे , त्याचप्रमाणे पोषणही.  त्यातही जंक फूड खात राहिलात , टपाल कार्यलयात ज्याप्रमाणे  सर्व काही टाकले जाते त्याचप्रमाणे पोटात टाकत राहिलात , तर ना शरीराला फायदा होईल ना आरोग्याला फायदा होईल.आणि यासाठी, जे डॉक्टर बसले आहेत, ते माझे म्हणणे ऐकून हसत आहेत, कारण, आहारात आपल्या  शास्त्रातदेखील  सांगितले आहे की , आहारातील नियमितता, संयम अत्यंत महत्वाचा आहे. आणि आचार्य विनोबा जी, त्यांनी लिहिलेले ज्यांनी वाचले आहे, त्यांनी खूप चांगली गोष्ट सांगितली आहे,आचार्य विनोबाजींनी सांगितले आहे की, उपवास करणे सोपे आहे, तुम्ही उपवास सहज करू शकता, परंतु माफक प्रमाणात भोजन करणे कठीण आहे. तुम्ही टेबलावर बसलात आणि चार गोष्टी आल्या, तर खाण्याचे मन तर  होणारच. आज मोठी चिंतेची बाब म्हणजे शरीराचे वजन वाढत आहे. आता तिथे बसलेल्या जास्त  वजनाच्या लोकांनी लाजू नका, वजन वाढत आहे, मधुमेहाचा आजार घरोघरी पोहोचत आहे. या अशा गोष्टी आहेत आणि मधुमेह हा देखील असाच आजार आहे, जो दुनियाभरच्या आजारांना  आमंत्रण देतो. आता वजन कमी करण्यासाठी एखाद्या  के. के रुग्णालयाची वाट बघावी लागते, मधुमेह टाळायचा असेल तर सकाळी फिरायला जावे  , चालावे फिरावे लागेल, जर आपण हे सर्व केले तर ज्या गोष्टी आरोग्यासाठी मूलभूत आहेत त्या आपल्याला रुग्णालयात जाऊ देणार नाहीत.त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून आपण जगभरात योगाचा प्रसार  करत आहोत.संपूर्ण जगाने योगाभ्यासाचा  स्वीकार केला आहे. यावेळी तुम्ही बघितलेच असेल, कोरोना काळातील  आपला योगाभ्यास  आणि आपल्या  आयुर्वेदाकडे जगाचे लक्ष वेधले आहे.

जगातील प्रत्येक देशातली कुठली ना कुठली वस्तू तुम्ही पहा, आपल्या हळदीची सर्वाधिक निर्यात झाली आहे.  कोरोना काळात जनतेला हे का समजले की भारताच्या ज्या प्राचीन वनौषधी आहेत, त्या आरोग्यासाठी लाभदायक आहेत. मात्र आपल्याच लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले म्हणून आपण तिकडे वळलो. मी माझ्या कच्छच्या लोकांना विचारू इच्छितो की  यावर्षी जून महिन्यात आंतरराष्ट्रीय योग दिनी कच्छ विश्वविक्रम करू शकेल का ? एवढ्या  विशाल कच्छ मध्ये योगसंबंधी कार्यक्रम होऊ शकतो का ? कच्छमधील असे एकही गाव नको, अजून दीड-दोन महिने बाकी आहेत. एवढी मेहनत करा, एवढी मेहनत करा, की सर्वात उत्तम योग कार्यक्रम आपण करू. तुम्ही बघा, कधीही रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही.आणि माझी जी  इच्छा आहे की कुणालाही  के. के. रुग्णालयात जावे लागू नये. तंदुरुस्त राहून तुम्ही माझी  इच्छा  पूर्ण करा. अपघातामुळे जावे लागले तर ते आपल्या हातात नाही , मात्र माझे हे मत आहे की आपण या सर्व गोष्टी काटेकोरपणे पाळूया.

आता कच्छ मधील बांधवांना भेटत आहे तर  मला  अधिकार आहे, तुमच्याकडे काही ना काहीतरी मागण्याचा आणि तुम्हाला द्यावेच लागेल.अधिकाराने सांगतो, आता बघा, जगातील इतक्या देशांमध्ये आपले कच्छी बांधव राहतात. आपला कच्छचा  रणोत्सव पाहण्यासाठी देशभरातून लोक स्वतः येऊ लागले आहेत. कच्छचा गौरव वाढवत आहेत.  कच्छच्या अर्थव्यवस्थेला चालना देत आहेत. याहून मोठी गोष्ट ही आहे की  कच्छच्या पाहुणचाराची संपूर्ण भारतात  प्रशंसा होत आहे. कच्छ म्हणजे  कच्छच असे जनता म्हणू लागली आहे.आता मला सांगा की कच्छ रणोत्सव साठी एवढी सारी मेहनत  सरकार करते, कच्छचे लोक पाहुणचार करतात, त्याची एवढी वाहवा होते.  मात्र परदेशी पाहुणे  कच्छच्या रणात दिसणार नाहीत, हे कसे चालेल . आपण आरोग्य पर्यटनासाठी लोक यावेत यासाठी रुग्णालये बांधतो, मात्र |पर्यटनासाठी येतील याची सुरुवात तर करा.माझी कच्छच्या बांधवांना विनंती आहे , आणि विशेषतः आपल्या  पटेल समाजातील बांधव इथे बसले आहेत, ते भारतात देखील आढळतात , जगात देखील अनेक ठिकाणी आहेत. दर वर्षी आणि माझी इच्छा आहे, तुम्ही हिशोब ठेवा, आणि आपले  गोपालभाऊ तर हिशोब ठेवणारे आहेत. ते नक्की करतील, माझी तुम्हा सर्वाना विनंती आहे की दरवर्षी परदेशात राहणाऱ्या प्रत्येक   कच्छी कुटुंबाने किमान पाच परदेशी नागरिकाना आपले  कच्छचे  रण पाहण्यासाठी इथे पाठवावे. तुम्ही मला सांगा आपले  कच्छ चे रण कसे भरलेले वाटेल आणि जगभरात खऱ्या अर्थाने  कच्छची ओळख तयार होईल की नाही ? हे काही खूप मोठे  काम नाही तुमच्यासाठी , तुम्हाला तिथे शिंक आली तरी तुम्ही भूजला याल असे लोक आहेत. परदेशात आजारी पडले तर म्हणतात, कच्छ मधल्या  भूज इथे जाऊन एक आठवडा हवापाणी बदल करून आलात तर एकदम बरे वाटेल.  हे आपले कच्छसाठी प्रेम आहे, आणि जेव्हा असे प्रेम असते तेव्हा तुम्ही किमान 5 परदेशी नागरिक , भारतीय नाही, त्यांना कच्छच्या रणात घेऊन या, आणि यावर्षी डिसेंबर महिन्यात त्यांना पाठवायचे आहे. आणि दुसरेसरदार पटेल साहेबांना स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी एवढी मोठी  श्रद्धांजली , सरदार साहेबांचे एवढे मोठे स्मारक उभारले आहे त्याचा तुम्हाला अभिमान आहे की नाही. तुम्ही माझी प्रशंसा करत रहाल, मला शाबासकी देत राहाल की मोदी साहेब तुम्ही तर चांगले काम केले आहे.  गुजरात सरकारचेही अभिनंदन करत रहाल की  खूप चांगले काम केले आहे, मात्र एवढेच पुरेसे नाही.

बांधवांनो, माझी  इच्छा आहे की जगभरातून जसे  कच्छच्या रणात  5 लोक येतील , तसेच ते  5 लोक स्टॅच्यू ऑफ युनिटी देखील बघायला जातील. तुम्ही बघाल,   गुजरातचा, पर्यटनाचा खूप  विकास होईल आणि पर्यटन असा  व्यापार आहे  जो  गरीब लोकांना रोज़गार देतो. कमीतकमी भांडवलात जास्तीत जास्त नफा मिळतो.तुम्ही बघा, कच्छच्या रणात तुम्ही पाहिले की छोट्यातील छोटी वस्तू बनवून विकल्यामुळे बारा महिन्यांचे काम दोन महिन्यात होते. पर्यटक येतो तेव्हा रिक्षावाला कमावतो, टॅक्सीवाला कमावतो, आणि चहा विकणारा देखील कमावतो. म्हणूनच माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की आपल्याला कच्छला पर्यटनाचे मोठे केंद्र बनवायचे आहे.  आणि यासाठी माझी अपेक्षा आहे की परदेशात राहणाऱ्या माझ्या  कच्छी बंधू आणि भगिनींनी यावेळी ठरवावे की प्रत्येक कुटुंब दरवेळी   5 लोकांना व्यवस्थित समजावेल आणि भारतात पाठवण्यासाठी आग्रह धरेल. आणि त्यांना समजावेल की कुठे जायचे आहे, कसे जायचे आहे, तुमचे तिथे कसे आदरातिथ्य होईल , चला.

आणि मी 100 टक्के सांगतो  की आता पर्यटनासाठी भारताबद्दल लोकांमध्ये  आकर्षण निर्माण झाले आहे. इथे कोरोना पूर्वी मोठ्या प्रमाणात पर्यटक यायचे मात्र  कोरोनामुळे निर्बंध लागले. पण आता पुन्हा सुरु झाले आहे, आणि तुम्ही माझी मदत केली  तर चारही दिशांनी आपला जयजयकार होईल. आणि माझी इच्छा आहे  की तुम्ही हे काम करावे. दुसरे आणखी एक काम आहे, कच्छच्या बांधवांप्रति माझी ही  अपेक्षा आहे , आता बघा, आपले  मालधारी भाई  कच्छ मध्ये दोन चार महिने थांबतात आणि मग सहा आठ महिने आपली गुरे घेऊन रस्त्यावर जातात. कित्येक मैल चालतात, हे आपल्या कच्छसाठी शोभनीय आहे का ? ज्या काळात  कच्छ तुम्हाला सोडावे लागले, जगभरात कच्छी लोकांना का जावे लागले, पाण्याच्या कमतरतेमुळे कच्छ मध्ये राहणे कठीण झाले होते. मुले दुःखी होतील अशी स्थिती निर्माण झाली होती. म्हणूनच जगभरात जाऊन मेहनत करून उपजीविका मिळवून स्वतःचा चरितार्थ चालवला. त्यांनी कोणासमोर हात पसरले नाहीतते आपल्या पायावर उभे राहिले आणि जिथे-जिथे गेले आपल्या समाजाचे  त्यांनी कल्याण केले. कोणी शाळा चालवत आहे , तर  कोणी गोशाळा चालवत आहे.  जिथे जातील कच्छीमांडु  कुठल्या ना कुठल्या प्रकारचे काम करतात . आता जेव्हा आपण एवढी सगळी कामे करता तेव्हा माझी तुम्हाला विनंती आहे विशेषता मालधारी यांना विनंती करतो की पूर्वीच्या काळी ठीक होतं की तुम्ही आपली गुरे घेऊन बाहेर पडायचातमात्र आता कच्छमध्ये पाणी आले  आहे. आता कच्छमध्ये हिरवळ देखील दिसू लागली आहे . आता कच्छमध्ये जिऱ्याचे पीक येतं.  ऐकून आनंद होईल की कच्छमध्ये जिरे पिकते. कच्छचे  आंबे परदेशांत जातात किती आनंद होतो . आपल्या कच्छने  तर कमलमची  ओळख  निर्माण केली आहे. कच्छमध्ये आपले खजूर काही कमी नाहीत, मात्र तरीही आपल्या   मालधारी  बांधवांना स्थलांतर करावे लागणे  हे आता चालणार नाही . आता  तिथे देखील चारा उपलब्ध आहे . आपल्याला  तिथे स्थिरस्थावर व्हावेच लागेल.  आता तिथे दुग्धशाळा देखील उभारली  आहे आणि तुमच्यासाठी तर आता पाचही  बोटं तुपात आहेत  असे दिवस आले आहेत.  म्हणूनच आपल्या मालधारी  बांधवांना भेटा आणि त्याना  समजवा  की आता गुरांना घेऊन स्थलांतर करणं बंद करा आणि इथेच रहा.  तुम्हाला इथे कुठलाही त्रास होणार नाही . तुम्ही इथे राहा आणि आपल्या मुलांना शिकवा . कारण स्थलांतर करणाऱ्या लोकांची मुले शिकत  नाहीत . या गोष्टीचे  मला खूप दुःख आहे . यात मला तुमची मदत हवी आहे आणि एक महत्त्वाचे काम तुम्ही कराल अशी माझी अपेक्षा आहे . आम्ही स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव काळात प्रत्येक जिल्ह्यात 75 तलाव  बांधायला सांगितले  आहेत. आपल्या कच्छ मध्ये  दोन तीन वर्षांत तलाव भरतील असा पाऊस पडतो. अनेकदा तर पाच वर्षात देखील येत नाही . अनेकदा तर मी पाहिले आहे की मुलं जन्माला येतात तेव्हा ती  चार वर्षांची  होतात मात्र त्यांनी कधीही पाऊस पाहिलेला नसतो असे  दिवस आपल्या कच्छच्या लोकांनी पाहिले आहेत. आता माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की 75 असे मोठे तलाव , ऐतिहासिक तलाव कच्छमध्ये आपण बनवू शकतो आणि यासाठी भारतभरातील कच्छी  बांधव आहेतमुंबईत तुम्ही मोठ्या प्रमाणात राहताकेरळ मध्ये राहता , आसाममध्ये मोठ्या प्रमाणात तुम्ही राहता , कुठेही तुम्ही कमी नाही.  भारतातील अर्ध्याहून अधिक जिल्ह्यात कच्छी बांधव पोहोचले आहेत . 75 तलाव, तुम्ही असे समजा की छत्तीसगडमध्ये कच्छी  समाज आहे, तो एक तलाव  सांभाळेल मुंबईमध्ये कच्छी समाज आहे तो पाच  तलावांची जबाबदारी घेईल आणि तलाव छोटे नकोतआपल्या निमाबेनचे  50 ट्रक आत असतील तरी ते दिसणार नाहीत  इतके खोल असायला हवेत.  तुम्ही बघाल पाण्याचा साठा होईल , दोन वर्षानंतर पाणी येईलतीन वर्षानंतर पाऊस पडेल. दोन इंच पाऊस पडेल, मात्र तरीही जेव्हा तलाव भरेल तेव्हा कच्छची खूप मोठी ताकद बनेल. आणि कच्छसाठी मी जे केलं त्यापेक्षा अधिक कच्छने माझं म्हणणं मानून केले आहे.  जेव्हा तुम्ही अधिक काम  करत असतात तेव्हा तुम्हालाच त्याहून अधिक काम करण्याची इच्छा होते.  जर तुम्ही काहीच करत नसाल तर नमस्ते म्हणून मी निघून गेलो असतो . मात्र तुम्ही करता म्हणून सांगण्याची इच्छा होते आणि म्हणूनच माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की आपल्या कच्छला , कर्तव्यभाव  जपणाऱ्या कच्छच्या गौरवाला नवा आयाम द्या आणि पर्यटन असेल किंवा जलसंचयदोन्ही मध्ये जगात राहणारा कच्छी असेल किंवा भारताच्या कानाकोपऱ्यात राहणारा कच्छी असेल , आपण सर्वांनी मिळून भूपेंद्रभाई यांच्या नेतृत्वाखाली गुजरातला ज्या जलद गतीने पुढे नेले  आहे त्यात आपण आपलं कर्तव्य देखील पार पाडूया , याच अपेक्षेसह  सर्वांना जय स्वामीनारायण, माझ्या खूप खूप शुभेच्छाधन्यवाद!

***

S.Patil/S.Chavan/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1817291) अभ्यागत कक्ष : 311