कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय

स्टार्ट-अप ग्राम उद्योजकता कार्यक्रमाचा (SVEP) प्रभाव वाढवण्यासाठी भारतीय उद्योजकता संस्थेने ग्रामीण विकास मंत्रालयासोबत केला सामंजस्य करार

Posted On: 25 MAR 2022 11:24AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेनुसार, ग्रामीण तरुणांमध्ये स्थानिक पातळीवर उद्योजकतेला चालना देण्यासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या  (MSDE) अधिपत्याखालील भारतीय उद्योजकता संस्थेने (IIE) ग्रामीण विकास मंत्रालयासोबत (MoRD) सामंजस्य करार केला.

या करारांतर्गत, ग्रामीण भारतातील रोजगाराच्या संधींना चालना देण्याच्या, विशेषत: बेरोजगार ग्रामीण लोकांसाठी स्वयंरोजगाराच्या मार्गांचा विकास करण्याच्या मुख्य उद्देशाने, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाची (NRLM) उप योजना असलेला स्टार्ट-अप ग्राम उद्योजकता कार्यक्रम (SVEP) राबवला जाणार आहे.

भारतीय उद्योजकता संस्थेचे संचालक डॉ. ललित शर्मा आणि ग्रामीण विकास मंत्रालयाचे संचालक राघवेंद्र प्रताप सिंह, यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव राजेश अग्रवाल, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या सहसचिव अनुराधा वेमुरी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाचे सहसचिव चरणजित सिंह यावेळी उपस्थित होते.

आसाम मधील गुवाहाटी येथील भारतीय उद्योजकता संस्था (IIE) ही स्टार्ट-अप  ग्राम उद्योजकता कार्यक्रमासाठी  (SVEP) राष्ट्रीय संसाधन संस्था (NRO) म्हणून काम करेल आणि योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाला (SRLM) सहाय्य प्रदान करेल.

स्टार्ट-अप ग्राम उद्योजकता कार्यक्रम (SVEP) चे मुख्य उद्दिष्ट हे आहे की गाव पातळीवरील समुदाय संसाधन व्यक्ती-उद्योजक प्रोत्साहन (CRP-EP) संवर्गाला प्रशिक्षण देऊन स्थानिक संसाधने विकसित करणे आणि राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान आणि स्वयंसहायता गट महासंघाची देखरेख करण्याची क्षमता तयार करणे.  तसेच  समुदाय संसाधन व्यक्ती-उद्योजक प्रोत्साहन संवर्गाचे काम निर्देशित करणे. हा कार्यक्रम ग्रामीण उद्योजकांना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान आणि स्वयंसहायता गट महासंघ आणि मुद्रायोजने सह बँकिंग प्रणालींकडून त्यांचे उद्योग सुरू करण्यासाठी वित्त उपलब्ध करून देण्यास मदत करेल.

या सामंजस्य करारावर भाष्य करताना, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव राजेश अग्रवाल म्हणाले, "भारतीय उद्योजकता संस्थेद्वारे राबविण्यात येत असलेला स्टार्ट-अप ग्राम उद्योजकता कार्यक्रम (SVEP) हा संबंधित कौशल्य आणि स्थानिक पातळीवर उद्योजकतेला चालना देत ग्रामीण भारतातील तरुणांना सक्षम करण्याचा उत्तम मार्ग आहे.”

***

Jaydevi PS/VJ/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1809553) Visitor Counter : 244