श्रम आणि रोजगार मंत्रालय
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त वीटभट्टी कामगार आणि विडी कामगार महिलांसाठी आयोजित केलेल्या आरोग्य आणि पोषणविषयक तपासणी शिबिराचे यजमानपद केंद्रीय श्रम मंत्र्यांनी भूषविले
व्यावसायिक कारणांमुळे होणाऱ्या आजारांच्या निदानासाठी आयोजित सहा महिने कालावधीच्या प्रायोगिक तत्वावरील तपासणी शिबीर उपक्रमात केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री तसेच केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री यांचा सहभाग
Posted On:
08 MAR 2022 4:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 मार्च 2022
केंद्रीय श्रम, रोजगार आणि पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य आणि पोषणविषयक तपासणी शिबिराचे यजमानपद भूषविले. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती झुबीन इराणी यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. केंद्रीय श्रम आणि रोजगार तसेच नैसर्गिक वायू मंत्री रामेश्वर तेली देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
महिला कामगारांमध्ये ‘निरोगी भारता’ची संकल्पना रुजविण्यासाठी तसेच राष्ट्रउभारणीतील त्यांच्या योगदानाची पोचपावती देण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हा आरोग्य आणि पोषणविषयक तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कामगारांमध्ये त्यांच्या व्यवसायाच्या स्वरूपामुळे निर्माण होणाऱ्या आजारांचे निदान करण्यावर भर दिला. धोकादायक कार्य पर्यावरणात काम करणाऱ्या महिला व्यवसायिक कारणांमुळे होणाऱ्या अनेक रोगांना तसेच अनेक सूक्ष्म तसेच मोठ्या प्रमाणात आवश्यक पोषण मूल्यांच्या कमतरतेला बळी पडतात. वीट भट्ट्यांमध्ये तसेच विडीच्या कारखान्यात काम करणाऱ्या महिलांमध्ये लोहाची कमतरता मोठ्या प्रमाणात दिसू शकते, आणि म्हणून बराच काळ हे काम केल्यानंतर त्यांच्यात रक्ताल्पता (ऍनेमिया) दिसून येते.
भारतात रक्ताल्पता ही प्रमुख आरोग्यविषयक समस्या आहे, विशेषतः सामाजिक-आर्थिक दृष्ट्या खालच्या पातळीवरील समाजातील महिलांमध्ये रक्ताची कमतरता होण्याचा धोका अधिक असतो.
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या या उपक्रमांची दखल घेत, केंद्रीय मंत्री स्मृती झुबीन इराणी यांनी देखील केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने हाती घेतलेल्या उपक्रमांचा पुनरुच्चार केला. ‘समान कामासाठी समान वेतन’ या संकल्पनेवर आधारित धोरणे आखण्याची गरज त्यांनी विषद केली. या दोन मंत्रालयांतील सहकारी संबंधांमुळे आपल्या देशातील महिला कार्यबळाच्या अडचणी सोडविण्याचा मार्ग निघू शकेल. महिला कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या अनेक महत्त्वाच्या महिला-केंद्रित योजनांची त्यांनी उजळणी केली. देशभरातील 704 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत असलेल्या ‘वन स्टॉप सेंटर’ योजनेच्या माध्यमातून असंघटीत क्षेत्रातील महिलांना करण्यात येत असलेल्या मदतीसाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळाशी सहकारी संबंध प्रथापित करण्याची कल्पना देखील त्यांनी यावेळी मांडली.
* * *
S.Thakur/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1803962)
Visitor Counter : 190